॥ मित्रसम्प्राप्तिः ॥ (कथामुख)
॥
मित्रसम्प्राप्तिः ॥ (कथामुख)
या परा ब्रह्मणः शक्तिः परावागनपायिनी ।
चिदानन्दस्वरूपा या सा शिवा पातु सर्वतः ।।
( परावागनपायिनी – परा + वाक् + अनपायिनी.
परा वाक् – वैखरी, मध्यमा, पश्यन्ती ह्या तीन वाणींच्या पलीकडची जी मूलाधार चक्राचे ठायी नांदणारी परा वाणी. अनपायिनी
– अत्यंत स्थिर, निश्चल, स्थायी, शाश्वत. )
विष्णुशर्मा त्याच्या
जवळ विद्या शिकण्यासाठी राहणार्या राजपुत्रांना म्हणाला, ‘‘अशाप्रकारे मित्रसम्प्राप्ति
(मैत्री संपादन करणे) हे दुसरं तंत्र सुरू होत आहे. त्यातील पहिला श्लोक पुढीलप्रमाणे
आहे.
एखादं क्लिष्ट, अवघड,
महत्त्वपूर्ण काम करताना, चांगल्यापैकी शिक्षण घेतलेले हुशार, तरबेज, विविध प्रकारचा
अनुभव असलेले तज्ज्ञ लोक साधनांची कमी आहे म्हणून अडून बसत नाहीत. कसही करून सर्व कमतरतांवर
मात करत ते आपलं काम पूर्णत्वाला नेतातच! पूर्वी एक कावळा, उंदीर, हरिण आणि कासव ह्यांनी
असाध्य वाटणारं काम साध्य करून दाखवलं होतं. कसं ते आपण पाहू. (1)
असाधना अपि प्राज्ञा बुद्धिमन्तो बहुश्रुताः।
साधयन्त्याशु कार्याणि काकाखुमृगकूर्मवत्
।। 1 ।।
जरी साधन-सामग्री । योग्य ना लाभली
तरी ।
अशक्यप्राय कामेही । जाणते करती पुरी
।। 1.1
काक मूषक, कूर्माने । हरिणाने मिळून
त्या
जसे दुष्कर कर्मासी । करुनी दाविले
जगा ।। 1.2
कसं ते ऐका! भारतात दक्षिणेकडे
महिलारोप्य नावाचं एक नगर होतं. त्याच्या जवळच एक विशाल गर्द सावली
देणारं वडाचं झाड होतं. अनेक पक्षी त्या झाडाची फळं खाऊन, झाडाच्या फांद्यांवर, ढोल्यांमधे
रहात असत. असंख्य कीटक त्या झाडाभोवती सतत रुंजी घालत. तर अनेक थकले भागले वाटसरू त्याच्या
छायेत बसून विश्राम करत. जे म्हटलं आहे ते खरच आहे,
ज्या झाडाच्या छायेत
थकले भागलेले प्राणीमात्र शांतपणे विश्रांती घेतात; ज्याच्या पानाफुलांवर पक्ष्यांचे
थवे आनंदाने विहरत राहतात; ज्याच्या गोड फळाचा आस्वाद घेत गुंजन करतात; ज्याच्या ढोल्यांमधे
अनेक जिवजंतु निवास करतात, ज्याच्या फांद्यांवर माकडं खेळतात, राहतात; ज्याच्या फुलांचा
मध घेण्यासाठी असंख्य भुंगे त्याच्यावर गुंजारव करत असतात; आपली पानं, फुलं, खोड, फांद्या---
अशा आपल्या सर्वांगानी जो त्याच्या जवळ आलेल्या जीवांना भरभरून आनंद देत राहतो अशा
तरुवराचं संपूर्ण आयुष्य प्रशंसनीय आहे. त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
बाकीची झाडं म्हणजे फक्त भुईला भार समजली पाहिजेत. (2)
छायासुप्तमृगः शकुन्तनिवहैर्विष्वग्विलुप्तच्छदः,
कीटैरावृतकोटरः कपिकुलैः स्कन्धे कृतप्रश्रयः।
विश्रब्धं मधुपैर्निपीतकसुमः श्लाघ्यः स एव द्रुमः,
सर्वाङ्गैर्बहुसत्त्वसङ्गसुखदो भूभारभूतोऽपरः ।। 2 ।।
(शकुन्तनिवहैः – पक्षी समूहांनी. विष्वक् - चहुबाजूंनी. विलुप्त – विनष्ट, छद – पाने.)
प्राणी झोपति सावलीत जयिच्या, पक्षी
सुखे राहती
सौख्ये नांदति जीवही कितितरी, ढोलीत,
फांद्यांतुनी ।
घेती आश्रय माकडे तरुवरी, स्वादिष्ट
खाती फळे
भुंगे सोडति ना फुलांस क्षणही, गोडी
मधाची कळे ।।
सर्वांगे सुख देतसे तरु महा, तो कौतुकाचा
धनी
ज्यांचा ना उपयोग जीव-जगता, ते भार
भूमीवरी ।।2
अशा त्या वृक्षाच्या
एका फांदीवर लघुपतनक नावाचा एक कावळा रहात असे. एक दिवस पोटासाठी काही अन्न मिळण्याच्या
शोधात तो इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक कुरूप, काळाकभिन्न, केसांना तेलपाणी न मिळाल्यामुळे
रखरखीत, राठ, पिंजारलेल्या केसाचा, (तांबारलेल्या डोळ्यांचा), जणु काही यमदूताप्रमाणे
दिसणारा एक माणूस हातात जाळं घेऊन येताना दिसला.
त्याला पाहून तो कावळा
अत्यंत काळजीत पडला. विचार करू लागला, ‘‘हा दुष्ट पारधी जर आज ह्या वटवृक्षाच्याच दिशेने
येत असेल तर काय भयंकर आपत्ती कोसळेल ह्याची मी कल्पना करू शकत नाही. आज ह्या झाडावर
राहणार्या पक्ष्यांचा विनाश ओढवणार आहे का हे ह्या संकटातून जिवंत राहून तरून जातील
हे काही सांगता येत नाही.’’
जागल्याचं काम करणारा
तो कावळा अत्यंत काळजीने अर्ध्या वाटेतूनच तातडीने परत फिरला आणि परत आपल्या झाडावर
आला. झाडावर राहणार्या सर्व पक्षीगणांना त्याने एकत्र बोलावलं आणि त्यांना सतर्क करत
तो म्हणाला, ‘‘मित्रांनो, एक दुष्ट पारधी एका हातात जाळं आणि दुसर्या हातात धान्य
घेऊन आपल्या वटवृक्षाच्या दिशेने येतांना मी पाहिला. मित्रांनो, तुम्ही त्याच्यावर
विश्वास ठेऊ नका. तो जमिनिवर जाळं पसरून त्यावर धान्य पसरेल. तुम्ही त्या सहज मिळणार्या
धान्याच्या लोभात पडू नका. ते आपल्यासाठी कालकूट विषासाखं प्राणघातक आहे हे जाणून त्याच्यावर
दृष्टिक्षेपही टाकू नका. त्याच्याकडे ढुंकूनही बघू नका.’’
कावळा आपल्या मित्रांना
हे सर्व समजाऊन सागेसांगेपर्यंत तो पारधी त्या झाडाच्या खालीच येऊन पोचला. त्याने जाळं
पसरून त्यावर जाईजुईच्या कळ्यांप्रमाणे अत्यंत पांढरेशुभ्र आकर्षक तांदूळ पसरले. आणि
फार दूर न जाता जवळच एका झाडाच्या मागे लपून बसला. (मूळ संस्कृत पुस्तकात ‘सिन्दुवारसदृशं’ म्हणजे सिंदुवाराप्रमाणे
लिहिले आहे. निर्गुन्डी (वानस्पतिक नाम : Vitex negundo) एक औषधीय गुणों वाली क्षुप (झाड़ी) है।[1] हिन्दी में इसे संभालू/सम्मालू, शिवारी, निसिन्दा शेफाली, तथा संस्कृत में इसे सिन्दुवार के नाम से जाना जाता है।
इसके क्षुप १० फीट तक ऊंचे पाए जाते हैं। संस्कृत में इसे इन्द्राणी, नीलपुष्पा, श्वेत सुरसा,
सुबाहा भी कहते हैं। राजस्थान में यह निनगंड नाम से जाना जाता है।)
लघुपतनकाने वेळीच सावध
केल्याने त्या झाडावरचे पक्षी त्या तांदळाच्या दाण्यांना हालाहलाप्रमाणे समजून जराही
न बधता शांतपणे बघत राहिले. कोणीही ते दाणे खाण्यासाठी झाडावरून खाली उतरला नाही.
तेवढ्यात चित्रग्रीव
नावाचा एक कबुतरांचा राजा आपल्या हजारो अनुयायायंसह तेथे आला. लघुपतनक कावळ्याने ‘‘अरे
नको अरे नको--- हे तांदूळ खाऊ नकोस’’ असं वारंवार सांगून, त्याला सावध करूनही,
तो त्या प्रलोभनाला बळी पडला. आणि सर्वच्या सर्व थव्यासह कळ्यांप्रमाणे पांढर्या शुभ्र तांदूळांकडे आकृष्ट
होऊन, जरा ही विचार न करता, जिव्हालौल्यामुळे खाली झेप घेऊन, तांदूळांवर तुटून पडला.
ते सगळेच पक्षी आपल्या परिवारासहित नेमके त्या जाळ्यात अडकले.
खोल पाण्यात राहणारे
चपळ मासे कधी कोणाच्या हाती तरी गवसतील का? पण आमिषाला भुलून जसे गळाला लागतात त्याप्रमाणे, ज्यांचा आपल्या जिभेवर ताबा नाही अशा मूर्खांचा विनाशही
अत्यंत अतर्क्य रीतीने होतो. (3)
जिह्वालौल्यप्रसक्तानां जलमध्यनिवासिनाम्।
अचिन्तितो वधोऽज्ञानां मीनानामिव जायते
।। 3
खोल पाण्यातले मासे । लोभाने गिळती
गळा
जिह्वालौल्य तसा देई । अतर्क्य नाश
तो नरा ।। 3
किंवा कधी कधी त्यांनाही
दोष देता येत नाही कारण कधी दैवाचे फासे उलट
पडले तर त्याला तशीच बुद्धी होते. बघा नं!
दुसर्याच्या पत्नीचं
अपहरण करणे हा अपराध आहे हे का रावणाला माहित नव्हतं? सोन्याचं हरीण अस्तित्त्वात असू
शकणार नाही हे का श्रीरामाला कळत नव्हतं? पण लक्ष्मणानी वारंवार सांगूनही तो त्या हरणाचा
पाठलाग करत गेलाच नं! धर्म-अधर्माचं योग्य ज्ञान असलेल्या राजनीतीतज्ज्ञ धर्मराजाला,
द्य़ूत हे अधर्म म्हणजे नीतीनियमांच्या विरुद्ध आहे हे का समजत नव्हतं? पण शकुनीच्या
जाळ्यात सापडून त्यालाही महान आपत्ती भोगावी लागली ! ह्या सर्व उदाहरणांवरून हेच सिदध
होतं की संकटकाळ आला की माणसाची विचारशक्ती काम करेनाशी होते. बुद्धी क्षीण होते.
पौलस्त्यः कथमन्यदारहरणे, दोषं न विज्ञातवान्,
रामेणाऽपि कथं न हेमहरिणस्याऽ सम्भवो
लक्षितः ।
अक्षैश्चापि युधिष्ठिरेण सहसा प्राप्तो
ह्यनर्थः कथं,
प्रत्यासन्न विपत्तिमूढमनसां प्रायो
मतिः क्षीयते ।। 4
का लंकापतिसी
न माहित असे, नेणे परस्त्री
गुन्हा
ना अस्तित्व असेचि कांचनमृगा, जाणे
कसा राम ना ।
आहे द्यूत अधर्म हे कळुनही, कैसा फसे
धर्म हा
येता संकटकाळ तो समिपची, जाते सुबुद्धी
लया ।। 4
अजुनही सांगावसं वाटतं
की, यमपाश गळ्याभोवती पडला किंवा दैवाचा फेरा फिरला तर माणसाला नेमकं जे उलट असतं तेच
योग्य वाटायला लागतं. मनुष्य किती का महान असेना, आपत्ती आली की माणूस सरळ विचार करू
शकत नाही. त्याची बुद्धी स्थिर राहू शकत नाही. तो गडबडून जातो आणि नेमके नको ते निर्णय
घेऊन आपल्याच जाळ्यात फसत जातो. (5)
कृतान्तपाशबद्धानां दैवोपहतचेसाम्
बुद्धयः कुब्जगामिन्यो भवन्ति महतामपि
।। 5
दुर्दैव लागता पाठी । काळ ही पाश आवळी
थोरांचीही अशावेळी । विपरीत घडे मती
।। 5
त्या फासेपारध्याने भला
मोठा कबुतरांचा थवा जाळ्यात अडकलेला पाहिला. त्याला जणु आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या.
आपल्या योजनेप्रमाणे सर्व घडत असलेलं पाहून, तो मनात सुखावला आणि आपला सोटा वर करून त्या
सर्व कबूतरांना मारण्यासाठी धावला. त्या फासेपारध्याला धावत येतांना पाहिल्यावर चित्रग्रीव
हया कबुतरांच्या राजाच्या लक्षात आलं की, आपण सारेचजण ह्या जाळ्यात चांगलेच अडकलो आहोत.
पण जराही गडबडून न जाता, कबुतरांचा राजा आपल्या सर्व अनुयायांचं सात्वन करत, त्यांना
उभारी देत म्हणाला, मित्रांनो ह्या येणार्या पारध्याला पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका.
अशी संकटं तर येतच राहतात.
पण सर्व प्रकारच्या संकटांनी घेरलेलं असताना ज्याची बुद्धी क्षीण होत नाही, तलवारीच्या
धारेसारखी तळपत राहते, तो आपल्या बुद्धीप्रभावाने त्या आपत्तीतून सहज तरून जातो. पार
होतो. म्हणून माणसाने कधीही आपली बुद्धी आणि साहसावरील विश्वास सोडू नये.(6)
व्यसनेष्वेव सर्वेषु यस्य बुद्धिर्न
हीयते ।
स तेषां पारमभ्येति तत्प्रभावादसंशयम्
।। 6
कोसळो संकटे सारी । विघ्ने नानाविधा
शिरी
धैर्य ना सुटते ज्याचे । विचलीत न हो
मनी ।।
बुद्धी तळपती राहे । साहसी वृत्ति ना
ढळे
आपत्तीवर तो सार्या । सदा मात करीतसे
।। 6
कबुतरांचा राजा चित्रग्रीव
पुढे म्हणाला, भगवान
सूर्य उदय समयी ही आरक्त असतात आणि अस्त समयीही लाल-केशरी रक्तवर्णी आणि तेवढेच तजःपुंज
असतात. त्याप्रमाणे सज्जन, धैर्यशील व्यक्ती ऐश्वर्याच्या शिखरावर असो अथवा संकटाच्या
गर्तेत पडलेली असो; डगमगत नाही. सम्पत्ती आणि विपत्तीत म्हणजे त्याचा अभ्युदय होत असतांना,
भरभराटीच्या काळात असो की संकटांनी घेरलेले असताना असो, ती व्यक्ती कायम सारखीच स्थिरमति
असते. धैर्य धरून असते. ती दुःखी होत नाही.(7)
सम्पतौ च विपत्तौ च महतामेकरूपता ।
उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमये तथा
।। 7
होवो उदय वा अस्त । आदित्य वर्ण अद्भुत
केशरी, लाल तेजस्वी । दोन्ही वेळा सदोदित
।।
तैसेच सज्जनांचे ह्या । वागणे ते अलौकिक
असो ऐश्वर्य दारिद्र्य । समवृत्ति अबाधित
।। 7
कबुतरांचा राजा चित्रग्रीव म्हणाला, म्हणून म्हणतो की आपण सर्वजण मिळून जर खेळखेळ खेळल्याप्रमाणे ह्या पारध्याच्या जाळ्यासकट एकाच वेळी उडालो आणि ह्या पारध्याच्या नजरेच्या टप्प्याबाहेर पोचण्यात यशस्वी झालो तर ह्या बंधनातून सुटण्याचा कुठलातरी पर्याय आपल्याला सापडू शकेल. पण अत्यंत भयाने घाबरून, आत्ताच हातपाय गाळून बसलो आणि सर्वांच्या संघटनात्मक शक्तिनिशी जर उडालो नाही तर, मात्र आपल्या सर्वांचा विनाश नक्की आहे. म्हटलेलच आहे की,
‘‘छोटे छोटे तंतू भले
कितीही कच्चे आणि सहज तुटण्यासारखे असले तरी ते एकत्र वळून त्यांची एकदा का पीळदार
दोरी बनली की ते मोठी मोठी वजनदार ओझीही सहज उचलू शकतात. सज्जन व्यक्तीही एकएकटे असताना
त्यांच्या नम्रपणामुळे भले प्रभावहीन, निरुपयोगी, कुचकामी, ह्यांच्यात काही दम नाही
असे वाटले तरी ते जर संघटित झाले तर कितीही मोठ्या संकटांना सहज तोंड देऊ शकतात.(8)
तनवोऽप्यायता नित्यं तन्तवो बहुलाः
समाः।
बहून् बहुत्वादायासान् सहन्तीत्युपमा
सताम् ।। 8
नाजूक, लांब तंतू ते । कच्चे पातळ वाटती
रज्जू बनविता त्यांची । जड भारास पेलती
प्रभावहीन एकाकी । तसे सज्जन वाटती
संघटीत परी होता । आपत्ती दृढ झेलती
।। 8 ।।
आपल्या पक्षीनायकाच्या सांगण्याप्रमाणे सारे पक्षी जाळ्यासहित उडाले. त्यांना जाळ्यासकट उडताना पाहून तो फासेपारधीही त्याच्या मागे मागे जमिनीवरून धावू लागला. ते पक्षी उडून थोडे दूर गेले आहेत पाहून तो म्हणाला,
‘‘आत्ता जरी हे पक्षी एकमेकांमधल्या सामजस्यामुळे माझ्या
जाळ्यासकट भले उडत चालले असले तरी त्यांच्यातील हे सामजस्य फार काळ टिकणार नाही. ते
जरा दमले की त्यांच्यात आपापसात वादविवाद सुरू होऊन ते नक्की जमिनीवर कोसळतील. (9)
जालमादाय गच्छन्ति संहताः पक्षिणोऽप्यमी ।
यावच्च विवदिष्यन्ति पतिष्यन्ति न संशयः ।। 9
पक्ष्यांचा हा थवा मोठा । जरी जाळ्यासवे उडे ।
संघटीत जरी भासे । अल्पकाळ तरी असे ।।
दमतील परी जेव्हा । तंटतील परस्परे ।
तेव्हा जाळ्यासवे सारे । भूवरी पडतील ते ।। 9 ।।
तो लघुपतनक कावळा ही सर्व घटना मोठ्या आश्चर्याने पहात होता. पुढे ह्या कबुतरांच्या थव्याचं काय होईल ह्या कुतुहलाने त्या पक्ष्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे मागे उडू लागला. इकडे पक्षी आपलं जाळं घेऊन नजरेच्या टप्प्यापलिकडे जात अदृश्य झालेले पाहून अत्यंत निराश झालेला तो फासेपारधी म्हणू लागला,
‘‘ज्या कोणी म्हटलं आहे
ते बरोबरच आहे. जे भाग्यात नसेल ते नसतच. आणि जे भाग्यात असेल ते काही प्रयत्न न करताही
प्राप्त होतं. ज्या माणसाचं भाग्य अनुकूल नसतं, त्याच्या अगदी हातात आली आली अशी वाटणारी
वस्तूही हातून निसटून जाते. वा नष्ट होते.(10)
नहि भवति यन्न भाव्यं भवति च भाव्यं विनापि यत्नेन ।
करतलगतमपि नश्यति यस्य हि भवितव्यता नास्ति ।। 10 ।।
असे भाग्यात जे जे ते । विना सायास लाभते ।
नशिबी नसते ते ते । हातचे जातसे कसे ।। 10 ।।
‘‘अजूनही असं म्हटलं जातं की, एकदा
का माणूस दुर्दैवाच्या फेर्यात अडकला की कधितरी थोडीशी झालेली धनप्राप्ती शंखनिधी
प्रमाणे पूर्वी मिळवलेल्या थोड्याफार धनासहित निघून जाते. (11)
(असं म्हणतात की कुबेराकडे नऊ प्रकारचे निधी आहेत. त्यांची नावे 1 पद्म निधी, 2 महा पद्मनिधी, 3 नील निधी, 4 मुकुंद निधी, 5 नंद निधी, 6 मकर निधी, 7 कच्छप निधी, 8 शंख निधी, 9 खर्व/मिश्र निधी. त्यातील पहिले सात निधी मानवाला क्वचितच प्राप्त होतात. मिश्र निधी मानवाला मिळतो. शंखनिधी माणसाकडे थोडाकाळ टिकतो पण पूर्वी मिळवलेल्या सर्व धनासहित हातून निघून जातो )
पराङ्मुखे विधौ चेत्स्यात्कथंचिद् द्रविणोदयः ।
तत्सोऽन्यदपि संगृह्य याति शङ्खनिधिर्यथा ।। 11 ।।
कधी शंखनिधी जैसा । टिकतो ना कुणाकडे
घेऊन जाय सारेची । पूर्वीचेही स्वतःसवे
नशीब फुटके ज्याचे । जरी दौलत त्या मिळे
पूर्वप्राप्त धनाही ती । घेऊनी जातसे तसे ।। 11 ।।
पक्ष्यांचं मांस मिळणं तर दूरच पण माझी उपजीवीका ज्यावर अवलंबून होती असं, माझ्या कुटुंबाचं पोटापाण्याचं साधन असलेलं जाळंही पक्ष्यांबरोबर निघून गेलं. (असं म्हून फासेपारधी पश्चात्ताप करू लागला)
इकडे तो फासेपारधी पार मागे राहिलेला पाहून कबुतरांचा राजा चित्रग्रीव आपल्या अनुयायांना म्हणाला, मित्रांनो, तो दुष्ट फासेपारधी आता मागे फिरला आहे. आता तुम्ही सर्वजण जरा स्वस्थ मनाने ईशान्य दिशेला चला. तिथे हिरण्यक नावाचा एक उंदीर राहतो. तो माझा मित्र आहे. तो हे जाळं कुरतडून आपल्या सर्वांची ह्या बंधनातून मुक्तता करेल. जे म्हणतात ते खरच आहे,
माणूस एकदा का संकटात
सापडला की कोणी तोंडदेखलं ही मदतीला येत नाहीत. मदत सोडाच पण तुमच्याविषयी त्यांना
अनुकंपा, कळवळाही वाटत नाही. एक खरा मित्रच फक्त तुमच्या सहाय्याला धावून येतो. (12)
सर्वेषामेव मर्त्यानां व्यसने समुपस्थिते ।
वाङ्गमात्रेणाऽपि साहाय्यं मित्रादन्यो न संदधे ।। 12 ।।
दुर्निवार अशी येता । आपत्ती माणसावरी
मित्र सोडून कोणीही । ना येती तोंडदेखली ।।12
असे बोलणे चालले असता, चित्रग्रीवाच्या आदेशानुसार सर्व कबुतरांचा थवा महिलारोप्य नगराच्या जवळ असलेल्या टेकडीजवळील हिरण्यकाच्या हजार मुख असलेल्या विवर-दुर्गापाशी येऊन पोचला.
हजार प्रवेशद्वारं असलेल्या ह्या बिळ-दुर्गात हिरण्यक उंदीर अत्यंत निःशंकपणे, निर्भयपणे, मोठ्या सुखात राहात होता. जे कोणी म्हटलं आहे ते बरोबरच आहे.
आपत्ती जोवर आली नाही
तोवरच त्या न पाहिलेल्या संकटांचं स्वरूप जाणून घ्यायचा प्रयत्न करावा, कुठली व कशी
आपत्ती येईल, ती किती गंभीर स्वरूपाची असेल, ह्याचा विचार करून त्याचं योग्य नियोजन
करून ठेवावं. संकट काही सांगून येत नाही. त्यामुळे माणसाने कायम सुसज्ज असले पाहिजे.
अचानक कोसळलेल्या संकटाचा सामना तयारीविना, विना साधन-सामग्री सहजपणे करता येत नाही.
अनागतं भयं दृष्ट्वा नीतिशास्त्रविशारदः ।
अवसन्मूषकस्तत्र कृत्वा शतमुखं बिलम् ।। 13 ।।
भविष्यातील आपत्ती । आधी जाणून चांगली
नीतिशास्त्रात जो तज्ज्ञ । निर्णायक कृती करी ।
ऐशा हिरण्यकाने त्या । शत्रूपासून वाचण्या
बीळ केले खुबीने ज्या । शत दारे पळावया ।। 13 ।।
आणि म्हणून नीतीशास्त्रात
कुशल असलेल्या हिरण्यक उंदराने आपल्या (शत्रूला चकविण्यासाठी आणि वेळ आली तर कुठल्याही
दिशेने पळून जाता येईल अशी) बीळाला आतबाहेर करण्यासाठी शेकडो रस्ते व द्वारे बनवली.
अशा प्रकारे तो त्यात शत्रूपासून सुरक्षित व सुखाने राहत होता.
(प्रत्येकाला स्वसंरक्षणासाठी
देवाने काही विशेष शक्ती दिली आहे. सापाला विषारी दात असतील, घोड्याला वेग असेल, गायी
बैलांना शिंग असतील. त्या साधनाविना ते अगदीच निर्बळ होऊन जातात.) विषारी दात काढलेल्या सापावर, मदहीन,
अशक्त झालेल्या हत्तीवर कोणीही वर्चस्व गाजवून त्याला आपल्या लहरीप्रमाणे वागायला भाग
पाडतो. त्याचप्रमाणे किल्ल्यात म्हणजे दुर्गात न राहणार्या किंवा ज्याच्याकडे दुर्गच
(कुठलेही सुरक्षा कवच नाही) नाही अशा राजाची दुर्दशा काही विचारायला नको. तो शत्रूला
प्रतिकारही न करताच सहजपणे शत्रूच्या तावडीत सापडून शत्रूचा बंदिवान होतो. (14)
दंष्ट्राविरहितं सर्पो मदहीनो यथा गजः ।
सर्वेषां जायते वश्यो दुर्गहीनस्तथा नृपः ।। 14 ।।
दंतहीन जसा सर्प । मदहीन जसा गज
होय तैसा पराधीन । दुर्गहीन रणी नृप ।। 14
म्हणून, राजाचे जे काम
हजारो हत्तींनी साध्य होत नाही, जे काम लाखो अत्यंत वेगवान घोडे करू शकत नाहीत ते काम
सहजपणे एका दुर्गाने साधले जाते. (15)
न गजानां सहस्रेण न च लक्षेण वाजिनाम् ।
तत्कर्म साध्यते राज्ञां दुर्गेणैकेन यद्रणे ।। 15 ।।
सहस्र गज जे काम । अश्व लक्षासवे करे
तडीस जाय ते काम । एका दुर्गामुळे त्वरे ।। 15
अहो, शिवाय किल्ल्याच्या
तटबंदीवर असलेला एक धनुर्धर योद्धा शेकडो योद्ध्यांना धूळ चारू शकतो. म्हणून युद्धशास्त्र
आणि यु्द्धाच्या वेगवेगळ्या नीतींमधे पारंगत असलेल्या प्रज्ञावंतांनीही राजासाठी किल्ले
किती आवश्यक आहेत ह्याचा पुरस्कारच केला आहे. उत्तम किल्ल्यांची प्रशंसाही केली आहे.
(16)
शतमेकोऽपि संधत्ते प्राकारस्थो धनुर्धरः ।
तस्माद्दुर्गं प्रशंसन्ति नीतिशास्त्रविदो जनाः ।। 16
बाणांची करुनी वर्षा । शत्रूसैन्यावरी पुरी ।
प्राकारावरुनी योद्धा । शत्रूची फोडतो फळी ।।
धूळ चारीतसे एक । शेकडोंना करे क्षति ।
शत्रु सैन्या करे थोडी । पळण्या सर्व ही भुई ।।
म्हणुनी नीतिशास्त्राचे । जाणकार प्रशंसति
महत्त्व योग्य दुर्गाचे । रणनीतीत ते किती ।। 16
( आज दुर्गांची जागा ड्रोन व बाकी गोष्टींनी घेतली आहे. आता )
असो! अशाप्रकारे तो चित्रग्रीव कबुतरांचा राजा हिरण्यक उंदराच्या बिळापााशी पोचला आणि त्याने आपल्या मित्राला तारस्वरात हाळी घातली, ‘‘अरे, मित्रा, हिरण्यका! लवकर बाहेर ये बाबा! मी मोठ्या संकटात सापडलो आहे.’’
ते ऐकून बिळातूनच हिरण्यक म्हणाला, ‘‘आपण कोण आहात? आपला काय परिचय? आपल्या येण्याचे काय प्रयोजन आहे? आपण कोठल्या संकटात फसला आहात? सर्व नीट स्पष्टपणे सांगा.’’
हिरण्यकाचे सर्व प्रश्न ऐकून त्यावर चित्रग्रीव म्हणाला, ‘‘मित्रा! मी तुझा अगदी जवळचा मित्र चित्रग्रीव बोलतोय! लवकर बाहेर ये मी मोठ्या कठीण संकटात सापडलो आहे. तुझ्याकडून फार मोठी अपेक्षा ठेऊन आलो आहे.’’
ते ऐकल्यावर आनंदानी तो उंदीर मोहरून गेला. मित्राला भेटण्यासाठी, अत्यंत प्रसन्न मनाने, घाईघाईने बिळातून बाहेर आला. कोणी अज्ञात व्यक्तीने म्हटलं असलं तरी योग्यच म्हटलं आहे,
सज्जनांकडे कायमच हितचितक,
प्रेमळ, मनाला आनंद देणार्या, नेत्रांना निवविणार्या अशा चांगल्या मित्रांची वर्दळ
चालू राहते. दुर्जनांकडे कोण जाईल? (17)
सुहृदः स्नेहसम्पन्ना लोचनानन्ददायिनः ।
गृहे गृहवतां नित्यमागच्छन्ति महात्मनाम् ।। 17
जगी मोठ्या मनाचे जे । उदार असती भले ।
ये जा त्यांच्या घरी राहे । सुहृदांची सदा सुखे ।।
येती प्रेमळ ते मित्र । लाघवी, हित चिंतक ।
नेत्रा आनंद देती जे । अत्यंत सुखदायक ।। 17
रोज होणारा सूर्योदय,
ताम्बूल, महाभारताची कथा वाचन, सुयोग्य पत्नी आणि चांगला मित्र ह्यांची खुमारी दिवसेंदिवस
वाढतच जाते. ह्या गोष्टी नित्याच्या आपल्या
नेहमीच्या सहवासात असल्या तरी त्यांची गोडी कधी कमी होत नाही उलट वाढतच जाते. (18)
आदित्यस्योदयस्तात! ताम्बूलं भारती कथा ।
इष्टा भार्या सुमित्रं च अपूर्वाणि दिने दिने ।।18
महाभारत गोष्टीने । वा सूर्योदयदर्शने
हितचिंतक पत्नीने। तैसेची तांबुलामुळे
मिळे सन्मित्र भेटीने । सुख जे रोज रोज ते
अपूर्व वाटते चित्ता । त्याचा उबग ना चि ये ।। 18
ज्याचा घरी असे प्रेमळ
मित्र कायम येत राहतात, त्याला त्या मित्रांना भेटून परम सौख्याचा लाभ होतो. असं सुखं, असा आनंद त्याला अन्य कुठलीही वस्तू लाभली
तरी होत नाही. खरच! सज्जन मित्रांमुळे मिळणार्या सुखाची तुलनाच होऊ शकत नाही.
(19)
सुहृदो भवने यस्य समागच्छन्ति नित्यशः ।
चित्ते च तस्य सौख्यस्य न किञ्चित्प्रतिमं सुखम् ।। 19 ।।
गृही ज्याच्या सदा येती । स्नेही सात्विक रोज ते ।
मित्रांना भेटुनी त्यासी । सुख अत्यंत लाभते ।।
कशानेही न लाभे त्या । अपूर्व सुख ते असे ।
जे लाभे मित्र भेटीने । त्याची सर कुणा न ये ।।19
असो!
चित्रग्रीव कबूतर आपल्या सर्व आप्तजनांसकट जाळ्यात अडकलेला पाहून दुःखाने हळहळत त्याचा जिगरी दोस्त हिरण्यक उंदीर म्हणाला, हे रे काय? तुमची ही दुर्दशा कशी काय झाली?
चित्रग्रीव म्हणाला, अरे मित्रा! समजून उमजून सुद्धा तू मला परत विचारत आहेस? अरे बाबा म्हणतात ते काही खोटं नाही --
माणसाच्या नशिबात जे जे चांगले वाईट भोग लिहिलेले असतील ते ते त्याला भोगावेच लागतात. मग ते ज्या व्यक्तिमुळे वा ज्या वस्तूमुळे असतील, ज्या स्वरूपात, ज्या ठिकाणी, ज्या वेळी, जितक्या कमी अधिक प्रमाणात भोगावे लागणार असतील तितके भागावेच लागतात. वेळ आली की आपले भोग आपल्या कर्मफळाच्या रूपात आपल्या समोर दत्त म्हणून उभे ठाकतात. (20)
( वृत्त – वसन्ततिलका, अक्षरे 14, गण - त, भ, ज, ज, ग )
यस्माच्च येन च यदा च यथा च यच्च,
यावच्च यत्र च शुभाऽशुभमात्मकर्म ।
तस्माच्च तेन च तदा च तथा च तच्च,
तावच्च तत्र च कृतान्तवशादुपैति ।। 20 ।।
जैसी शुभाशुभ फळे असती नशिबी
जेव्हा, जिथेच, जितकीच, जशा स्वरूपी ।
काळानुसार बदलेच परिस्थिति ही
होई उपस्थित नियोजित वस्तु तैशी ।।
भोगावया सकल लावितसे नरासी
तैसे तिथेच तितुकेच तशास्वरूपी ।। 20 ।।
मित्रा! मी माझ्या जिव्हालौल्यामुळे ह्या बंधनात अडकलो आहे. आता अजून वेळ वाया न घालवता तू हे पाश कुरतडून आम्हाला त्यातून मुक्त कर.
त्यावर हिरण्यक उंदीर म्हणाला, अरेरे! काय दैवगती आहे पहा! पक्ष्यांची नजर अत्यंत तीक्ष्ण असते. शेकडो योजने ते अचूक पाहू शकतात. असं असतानाही जर दैव प्रतिकूल असेल तर त्यांना दाणे दिसतात पण, त्यामागचं जाळं दिसत नाही. कसलीतरी लालूच देऊन आपल्याला मोठ्या संकटात घेरण्याचा प्रयत्न भल्याभल्यांच्या लक्षात येत नाही आणि ते तात्पुरत्या लहानशा फायद्याच्या लोभाने मोठा तोटा वा संकट पदरात घेतात. (21)
अर्धार्धाद्योजनशतादमिषं वीक्षते खगः ।
सोऽपि पार्श्वस्थितं दैवाद्बन्धनं न च पश्यति ।। 21 ।।
शेकडो योजने पक्षी । अचूक पाहती जरी
पाहती मांसखंडांसी । जाळे ना पाहती परी ।।
दैवाचा फिरता फेरा । प्रतिकूलचि हो घडी
बंधने पाहि ना दृष्टी । आमिषा पडते बळी ।। 21
दुसरही आहे म्हणा! चंद्र सूर्य तर स्वतःच ग्रह तारे आहेत असं असूनही त्यांना राहू, केतूची पीडा सहन करावीच लागते. गजासारखा बलवान प्राणी नसेल, भुजंगासारखा महा विषारी कोणी नसेल तर पक्ष्यांसारखा अत्यंत चपळ, उडणारा कोणी नसेल पण; तेही सहजपणे बंदी होतात. हे सर्व अत्यंत शक्तिमान, अत्यंत चाणाक्ष, अत्यंत हुशार, थोर बुद्धिमान असूनही संकटात सापडून त्यांची ही अशी दुर्दशा झालेली पाहून मला तर असं वाटतं की, हेच तर्कसंगत वाटतं की, दैव हे सर्वांपेक्षा बलवान आहे. आपल्या कपाळावर लिहीलेल्या भाग्यापुढे सर्वकाही तुच्छ आहे. (22)
( वृत्त- द्रुतविलंबित. अक्षरे- 12. गण - न भ भ र )
रविनिशाकरयोर्ग्रहपीडनं,
गजभुजङ्गविहङ्गमबन्धनम् ।
मतिमतां च निरीक्ष्य दरिद्रतां,
विधिरहो बलवान् इति मे मतिः ।। 22
रवि सुधांशु जरी ग्रहतारका । ग्रहदशा नच सोडितसे तया
गज, भुजंग, विहंगम दुर्धरा । अति कलंदर ते निपुणा वरा ।।
परि कसे पडती दृढ बंधनी । मज गमे बघुनीच दशा तशी
न बलवान कुणी जगती असे । जगति दैवचि एक समर्थ ते ।। 22
त्याचप्रमाणे,
ह्या जगात संकटच कोसळणार नाही अशी एकही जागा
नाही. आणि ज्याच्यावर संकट कोसळणार
नाही असाही कोणी जीव जन्माला आलेला नाही. प्रत्येक भूतमात्रावर संकटं ही येतातच. तो
कितीही सुरक्षित जागेवर बसला तरी संकटांना अगम्य अशी कुठली जागा नाही. आणि संकट ज्याला
हात लावणार नाही, स्पर्श करायलाही कचरेल असा संकटांसाठी अस्पृश्यही कोणी नाही. आकाशात
स्वच्छंद विहरणार्या ज्यांच्या भरारीवर नजर ठरणार नाही अशा पक्ष्यांवरही संकटं झडप घालतात. एरवी समुद्रात अत्यंत चपळपणे
वावरणारे मासे कधी कुणाच्या हातालाही लागणार नाहीत. काही मासे तर इतके खोल समुद्रात
राहतात की त्यांच्या पर्यंत पोचणंही अवघड. पण कधी गळ टाकून, कधी जाळं टाकून तेही पकडले
जातात. त्यामुळे हे स्थान सुरक्षित आहे. ते नाही असं काही म्हणता येत नाही. ह्या येणार्या
आपत्तीच्या भुजा(हात) इतक्या लांब आणि इतक्या आक्राळविक्राळ असतात की त्या कधीही कोणालाही
त्यांच्या भुजांमधे जखडून टाकतात. पाप-पुण्य, लाभ-हानी, योग्य- अयोग्य हे शब्द फक्त
शब्दच राहतात. त्यांना काही अर्थ उरत नाही. (23)
( वृत्त – शार्दूलविक्रीडित )
व्योमैकान्तविहारिणोऽपि
विहगाः
सम्प्राप्नुवन्त्यापदं,
बध्यन्ते
निपुणैरगाधसलिलान्मीनाः
समुद्रादपि ।
दुर्नीतं
किमिहास्ति
किं च सुकृतं
कः स्थानलाभे
गुणः
कालो हि व्यसने
प्रसारितकरो
गृह्णाति
दूरादपि ।। 23 ।।
आपत्ती
नच सोडते विहरत्या
स्वच्छंद
पक्षासही
ना राहे सुखरूप मीन लपुनी
विस्तीर्ण त्या सागरी
कौशल्ये गळ टाकुनी पकडती
कोळी अती खोलही
जाळे फेकुन वा तया पकडती
जो ये करी ना कधी ।। 23.1
आहे काय अयोग्य,
योग्य न कळे नीती अनीती कशी
लाभे स्थान कुठे सुरक्षित
भले ठावे कुणाला
जगी ?
होतेची नुकसान लाभ कधि
ह्या स्थानी कुठे वा कधी
आहे कायचि पापपुण्य
जगती ह्याची नसे निश्चिती ।। 23.2
आहे काळ उभा भयानक अती सार्या जगा घेरण्या
आपत्ती
स्वरुपी
भुजा पसरुनी विक्राळ ह्या केवढ्या ।
त्यासी ना असते अगम्य कुठली जागाच विश्वात ह्या
बाहूपाशिच घेतसे जखडुनी अस्पृश्य कोणी न त्या
।। 23.3
त्यांच्यात असा संवाद
चालू असताना हिरण्यक उंदीर आपल्या मित्राचे चित्रग्रीवाचे जाळे तोडण्यासाठी पुढे सरसावला.
तेव्हा चित्रग्रीव म्हणाला, ‘‘ मित्रा! थांब थांब! पहिल्यांदा तू माझे पाश तोडू नकोस.
पहिल्यांदा माझ्या ह्या सेवकांचे, माझ्या अनुयायांचे पाश तोडून त्यांना पूर्णपणे बंधमुक्त
केल्यावरच तू माझे पाश तोड.’’
ते ऐकून रागाने हिरण्यक म्हणाला, ‘‘छे छे! हे तू सांगतोएस ते बरोबर नाही. आधी राजा आणि नंतर
सेवक! .’’
त्यावर चित्रग्रीव म्हणाला, ‘‘मित्रा! असं बोलू नकोस हे
सर्व बिचारे माझ्या आश्रयाला आलेले आहेत. माझ्यावर
विश्वास ठेऊन आपल्या आपल्या मुलाबाळांना, परिवारातील जवळच्यांना सोडून माझ्याबरोबर
आले आहेत. मी त्यांचा इतकाही आदर ठेऊ नये? अरे बाबा जो राजा आपल्या सहचर्यांचा कायम आदर ठेवतो,
त्यांच्याशी यथायोग्य व्यवहार करतो ते सहचर, ते सेवक कायम त्या चांगल्या वागण्याची जाण ठेवतात. तुमच्या वागण्याबद्दल
समाधानी असतात. नंतर कधी धन्याच्या संकटकाळी, वा राजाला धनाची कमतरता भासत असली तरी
त्याला सोडून जात नाहीत. .’’ (24)
यः सम्मानं सदा धत्ते भृत्यानां क्षितिपोऽधिकम्
।
वित्ताऽभावेऽपि तं हृष्टास्ते त्यजन्ति
न कर्हिचित् ।। 24 ।।
सन्मान सेवकांचा जो । यथायोग्य करे सदा
अर्थसंकटि भूपा त्या । भृत्य ना सोडती कदा ।।24
‘‘मित्रा, खरं सांगू का? विश्वास हा सर्व ऐश्वर्याचा भक्कम पाया आहे. म्हणूनच एखादा हत्ती त्याच्या कळपाचा नायक झाला
तरी, बाकी इतर सर्व लहान, मोठ्या हत्तींसोबत छान परिवार बनवून राहतो. त्याच्या उलट
सिंह ह्या सर्व वन्यजीवांचा राजा आहे हे कोणाला सांगायलाही लागत नाही, सर्व जंगल त्याच्या
ताब्यात असतं. पण! इतक असूनही त्याच्यावर कोणाचाच विश्वास नसल्याने, कोणी वन्य जीव
तर त्याच्या सोबतीने रहात नाहीतच पण सिंह परिवारातील इतर सिंह, सिंहिणी वा छावेही त्याच्या
आश्रयाने रहात नाहीत. त्याला वनात एकट्यानेच रहावे लागते. ’’(25)
विश्वासं सम्पदा मूलं तेन यूथपतिर्गजः ।
सिंहो मृगाऽधिपत्येऽपि न मृगैः परिवार्यते ।। 25 ।।
असे विश्वास हे मूळ । ऐश्वर्याचेच भक्कम
सहवासतच हत्तींच्या । गजमुख्य असे रत ।।
असे सिंह जरी राजा । पशूंचा सर्व जंगली
विश्वासाच्या अभावाने । राहतो एकटा वनी ।। 25
मित्रा! त्यातूनही एक शंका माझ्या मनात आली. हे अत्यंत दडस जाळं तोडताना जर तुझे दात तुटले तर! किंवा जाळं घेऊन उडालेल्या पक्षांचा शोध घेत जर तो फासेपारधी येथे पोचला तर? तर मग तो माझा नर्कवासच ठरेल. कारण,
जो आपल्या अत्यंत विश्वासू, सदाचारी अनुयायांना संकटात वार्यावर सोडतो, त्यांच्या यातनांनीही तो द्रवत नाही उलट आनंद मानतो; त्याला हयाची देही ह्याची डोळा ह्याच पृथ्वीवर अत्यंत कष्ट भोगायला लागतात शिवाय मरणाच्या पश्चातही त्याचा नर्कवास सुटत नाही. (26)
सदाचारेषु भृत्येषु संसीदत्सु च यः प्रभुः ।
सुखी स्यान्नरकं याति परत्रेह च सीदति ।। 26
आज्ञाधारी सदाचारी । भृत्यांचे हाल पाहुनी
द्रवेना भूप जो चित्ती । घेई आनंद वा मनी ।
भोगे दुःखचि ह्या लोकी । मृत्युपश्चात रौरवी
पडे तो निर्दयी मोठा; । मिळे ना सुख त्या कधी ।। 26
चित्रग्रीवाचे ते बोलणे ऐकून त्या मित्र हिरण्यक उंदीर म्हणाला, ‘‘मित्रा, मी राजधर्म चांगला जाणतो. मी तुझी परीक्षा पहिली. आता मी प्रथम ह्या सर्वांचे पाश तोडतो. तुझ्या मनात तुझ्या अनुयायांच्या विषयी असलेली ही भावना आणि त्याप्रमाणे असलेलं तुझं आचरण ह्यामुळे तुझा कायम उत्कर्षच होत राहील. कोणीतरी योग्यच म्हटलं आहे,
जो राजा आपल्या सेवकांसोबत कायम दयाळूपणे वागतो, सर्वांशी समतेने व्यवहार करतो. कोणावर अन्याय करत नाही; तो राजा त्रैलोक्याचं रक्षणही सहज करू शकतो.’’ (27)
कारुण्यं संविभागश्च यस्य भृत्येषु सर्वदा ।
संभवेत्स महीपालस्त्रैलोक्यस्याऽपि रक्षणे ’’।। 27 ।।
आपुल्या सेवकांसंगे । व्यवहार कृपामयी
असे ज्या भूमिपालचा । त्रैलोक्याचाच तो धनी ।। 27 ।।
इतकं बोलून हिरण्यक उंदराने
सर्व पक्ष्यांचे पाश कुरतडून त्यांना बंधमुक्त केलं. आणि तो चित्रग्रीव ह्या कबुतरांच्या राजाला
म्हणाला, ``मित्रा आता तू सहज आपल्या घरी जाऊ शकतोस. परत जरी तुझ्यावर संकट
आलं तरी तू माझ्याकडे ये.’’ अशाप्रकारे कबुतराला निरोप देऊन हिरण्यक
उंदीर परत त्याच्या हजार दारं असलेल्या बिळात परतला.
चित्रग्रीवही आपल्या
विशाल थव्यासह स्वतःच्या घरी परतला. ज्या कोणी म्हटलं आहे, बरोबरच म्हटलं आहे,
‘‘सन्मित्रांमुळे, चांगल्या मित्रांमुळे
माणूस अत्यंत
कठीण कामंही
सहज करू शकतो.
म्हणून
माणसानी
आपल्या
समविचारी
असे मित्र जोडणं आवश्यक
आहे.’’ (28)
मित्रवान् साधयत्यर्थान्
दुःसाध्यानपि वै यतः ।
तस्मान्मित्राणि कुर्वीत
समानान्येव चात्मनः ।। 28 ।।
असाध्य
कामही होते । साध्य मित्रांमुळे
भल्या
जोडी समविचारी
ते । म्हणोनी
मित्र माणसा ।। 28
चित्रग्रीव कबुतराचं
त्याच्या
थव्यासह
जाळ्यात
अडकणं आणि हिरण्यक
उंदराने
त्यांना
सोडवणं
हे सगळ थरार नाट्य लघुपतनक
कावळा मोठ्या
आश्चर्याने
बघत होता.
ही सर्व घटना पाहत असलेला
प्रत्यक्षदर्शी लघुपतनक कावळा मनाशी म्हणाला,
हा हिरण्यक
उंदीर मोठा बुद्धिमान
आहे.
त्याचं
हे हजार प्रवेशद्वारं
असलेलं
बीळ म्हणजे
एक अजिंक्य
दुर्गच दिसतो आहे. ह्याच्या
जवळ शक्ती आणि सामग्री
दोन्ही
पुरेपुर
आहेत.
पक्षी जर असे बंधनात,
जाळ्यात
अडकलेच
तर त्यावर हिरण्यक हा एक चांगला
उपाय आहे.
खर तर मी पटकन कोणावर
विश्वास
ठेवत नाही.
माझा स्वभावही
काहीसा
चंचल आहे पण तरीही ह्या हिरण्यकाशी
मैत्री
करायलाच
हवी.
मी ह्याला
माझा मित्र करीन.
कारण,
माणूस कितीही
गुणी असला,
बुद्धिमान
असला,
सर्व साधन सम्पत्तीनी
समृद्ध
असला तरी त्यालाही
योग्य मित्रांबरोबर
मैत्री
हवीशी असतेच.
समुद्राला
रत्नाकर
म्हणतात.
सर्व नद्या त्याला
येऊन मिळतात.
त्याच्याजवळ
कशाची कमी नसतानाही
तो चंद्राच्या
आकाशात
येण्याची,
चंद्रोदयाची
वाट बघत असतोच की! ’’ (29)
अपि सम्पूर्णतायुक्तैः
कर्तव्याः
सुहृदो
बुधैः ।
नदीशः परिपूर्णोऽपि
चन्द्रोदयमपेक्षते
।। 29
सर्व साधन सम्पत्ती
। विद्वत्ता
ती असूनही
दुजा मित्र असावासे
। प्रत्येका वाटते मनी ।। 29.1
मिळतीच
नद्या सार्या
। कमी रत्नाकरा
नसे
परी चंद्रोदयाची
त्या । अपेक्षा
मानसी असे।। 29.2
असा विचार करून तो झाडावरून
उतरून हिरण्यकाच्या
बिळापाशी
आला आणि कबुतरांचा
राजा चित्रग्रीव
जसा अत्यंत मधाळ स्वरात, स्नेहाने हाका मारत होता तशा हाका मारत हिरण्यकाला
बोलावू
लागला-
``मित्रा हिरण्यका बाहेर ये. लौकर बाहेर ये.’’
त्याची हाक ऐकल्यावर
हिरण्यक
मनात विचार करू लागला, `काय झालं असेल बरं? एखादं कबूतर जाळ्यात
अडकलेलं
तसच राहिलं
की काय?
माझ्या
लक्षात
कसं आलं नाही?
त्याला
सोडवायला
तर हा चित्रग्रीव
परत मला बोलवत
नसेल?’
तरीही सावधपणे
कानोसा
घेत त्याने
विचारले.
महाशय आपण कोण आहात?’’
कावळा बोलला,
``मी लघुपतनक नावाचा एक कावळा आहे.’’
कावळा आहे हे ऐकताच हिरण्यक
अंग अजून चोरून घेत बिळात अजूनच आत शिरत म्हणाला,
``आपण ताबडतोब इथून निघून जा.’’
``मी एका महत्त्वाच्या कामासाठी
आपल्याकडे
आलो आहे.
आपण माझी भेट का नाकारत
आहात?’’
– कावळा
म्हणाला.
``मला आपल्याला भेटण्याची
काही आवश्यकता वाटत
नाही.’’-
हिरण्यक
``महाशय,
मी आपल्याला
चित्रग्रीव
आणि त्याच्या
साथी पक्ष्यांचे
जाळे तोडून त्यांना
बंधमुक्त
करतांना
पाहिले
आहे.
आपण केलेले ते असाधारण
काम पाहून माझ्या
मनात आपल्याला
भेटण्याची
तीव्र इच्छा उत्पन्न
झाली.
अत्यंत
आदर आणि प्रेमाने
मी आपल्या
भेटीला
आलो आहे.
कधी एखादेवेळी
मीही असाच बंधनात
अडकलो तर आपणच मला सहीसलामत
सोडवू शकाल.
म्हणून
आपली कृपा संपादन
करावी,
आपल्याबरोबर
मैत्री
करावी ह्या उद्देश्याने
मी आपल्याजवळ
आलो आहे.
आपण कृपा करून माझ्याबरोबर
मैत्री
ठेवायला
सम्मती
द्या.’’ - लघुपतनक कावळा
हिरण्यक म्हणाला,
``हे कसं शक्य आहे? तू भक्षक आहेस
आणि मी तुझं भक्ष्य म्हणजे तुझं अन्न आहे. आणि तरी तुझ्याबरोबर मैत्री करू म्हणत
असशील तर ते शक्य नाही. तू निघून जा. दोन विरोधी
स्वभावाच्या
माणसांमधे
मैत्रीची
शक्यता
नसते.
म्हटलच
आहे-
ज्यांचं कुळ आणि आर्थिक स्थिती समान असते त्यांच्यामधेच
मैत्री वा वैर योग्य आहे.
एक सबळ एक निर्बळ, एक उच्च कुळीचा दुसरा निम्न कुळीचा वा एक आर्थिक
दृष्ट्या अत्यंत सम्पन्न तर दुसरा दरिद्री ह्याच्यात मैत्री वा वैर संभवत नाही. (30)
ययोरेव
समं वित्तं
ययोरेव
समं कुलम् ।
तयोर्मैत्री
विवादश्च
न तु पुष्टविपुष्टयोः
।। 30
समान धनसम्पत्ती । समान कुळ ही असे
वैर मैत्री तयांमध्ये । योग्य वाटेच निश्चये ।। 30.1
निर्बळा सबळांमध्ये । मैत्री ना संभवे कघी
वैरही योग्य ना त्यांचे । निरर्थकच
दोन्हिही ।। 30.2
समान दर्जाचे,
तोलामोलाचे
कुळ आणि एकसारखी
आर्थिक
परिस्थिती
असेल त्याच्यांत
मैत्री
किंवा शत्रुत्त्व
ह्या दोन्हीही
गोष्टी
जोमदारपणे
वाढू शकतात.
पण एक जण दोन्ही
गोष्टीत
दुसर्यापेक्षा
सरस आहे आहे आणि दुसरा मात्र त्याच्या
पेक्षा
दोन्ही
गोष्टीत
दरिद्री,
खूप कमी दर्जाचा
असेल तर त्यांच्यात
ना दोस्ती
संभवते
ना वैर.
आणि तरीही एखाद्या
व्यक्तीने
मूर्खपणाने
आपल्या
बरोबरीच्या
नसलेल्या
व्यक्तीशी
मैत्री
केली अथवा शत्रुत्व
ओढवून घेतले
तर तो कमी अधिक प्रमाणात
लोकांच्या
उपहासाचा,
हास्याचा
विषय होतो.
(31)
यो मित्रं
कुरुते
मूढ आत्मनोऽसदृशं
कुधीः ।
हीन वाऽप्यधिकं
वाऽपि । हास्यतां
यात्यसौ
जनः ।। 31
धन,मानात
नाही जो । समान आपुल्यापरी
लहरी मूर्ख सवे त्याच्या । मैत्री वा वैरही
धरी
त्याने तो उपहासाचा । विषय होतसे जनी
जनी सर्वत्र हो त्याची । निंदा टिंगल मस्करी
।। 31 ।।
तरी तू येथून तातडीने
निघून जावं हे बरं.’’
त्यावर कावळा म्हणाला,
``हिरण्यका, तुझ्या ह्या बिळाच्या
बाहेर मी बसलो आहे.
तू जर माझ्याशी
मैत्री
नाही केली तर मी मी येथेच प्राणत्याग
करीन वा प्रायोपवेशन
(मरेपर्यंत अन्नत्याग) करीन.’’
हिरण्यक उंदिर म्हणाला, - ``महाशय एक तर तुम्ही माझे
कट्टर शत्रू आहात वैर्यासोबत मी मैत्री करू शकत नाही. सांगितलच आहे,
शत्रूशी अगदी घनिष्ठ मैत्री झाली तरी
त्याच्याबरोबर संधी/ सलोखा कधीही करू नये. पाणी कितीही जरी गरम
असलं तरी ते अग्नीला विझवूनच टाकतं.(32)
वैरिणा नहि सन्दध्यात्सुश्लिष्टेनाऽपि
सन्धिना
सुतप्तमपि पानीयं शमयत्येव
पावकम् ।। 32
जरी घनिष्ठ मैत्री ती
। झाली शत्रूबरोबरी
संधी प्रस्ताव केव्हाही
। शत्रूसंगे न तो करी
अग्नीसी विझवे पाणी । असो उकळले जरी
परिवर्तन ना होई । गुणधर्मात ते कधी
।। 32
कावळा हुशार होता. तो म्हणाला,
``अरे बाबा, ना तुझी माझी तोंडओळख
झाली आहे ना तुझं दर्शन! मग अजून वैर कुठून होणार? काहीतरी तोंडाला येईल ते असंबद्ध बोलू नकोस.’’
त्यावर हिरण्यक म्हणाला, ``दोन प्रकारे वैर संभवतं; एक म्हणजे स्वाभाविक वैरभाव आणि दुसरं म्हनजे कृत्रिम, अस्वाभाविक
वा प्रसंगोपात्त वैरभाव. आपण माझे जन्मजात, निसर्गतःच स्वाभाविक शत्रू आहात. एकवेळ काही प्रसंगामुळे
निर्माण झालेलं वैर मिटूही शकतं; पण जन्मजात वैर एका पक्षाच्या
सर्वनाशाशिवाय संपत नाही. ’’ (33)
कृत्रिमं नाशमभ्येति
वैरं द्राक् कृत्रिमैर्गुणैः ।
प्राणदानं विना वैरं
सहजं याति न क्षयम् ।। 33
कधी कधी मिटे वैर । प्रसंगोपात्त
जे असे
कारण संपता संपे । वैर
कृत्रिम सर्व ते ।। 33.1
जन्मजातचि वैराचे । परी
नाचि तसे असे
उच्छेद करून एकाचा ।
संपते वैर ते पुरे ।।33.2
कुतुहलाने कावळा म्हणाला, ``अहो हे दोन प्रकारचे वैरभाव कसले हे
जाणून घेण्यास मी फार उत्सुक आहे. कृपया सांगाल का?’’
हिरण्यक म्हणाला; अहो, काही कारणांमुळे निर्माण होतं ते कृत्रिम वैर. कारणच
संपलं की वैरही संपतं. एका पक्षानी दुसर्या पक्षाला दिलदारपणे
मदत केली वा क्षमा केली की हे वैर संपते. जन्मजात शत्रुत्त्व
मात्र कधीही संपत नाही पिढ्यानु पिढ्या ते चालूच राहते. ज्याप्रमाणे
अहिनकुल (साप आणि मुंगूस); कुत्र आणि मांजर;
सिंह आणि हत्ती; शिकारी आणि हरिण वा जंगली प्राणी, कावळा आणि घुबड वा
शाकाहारी आणि मांसाहारी ; पाणी आणि अग्नी, देव आणि दैत्य; वा सवती-सवतींमधील वैर, धनिक आणि दरिद्री ; मूर्ख आणि पंडित; श्रोत्रीय आणि अश्रोत्रीय; पतिव्रता आणि कुलटा;
सज्जन आणि दुर्जन ह्यांच्याती वैर हे स्वाभाविक म्हणजेच नैसर्गिक वा
हाडवैर म्हणावं लागेल. ह्याच्यातील एकानी दुसर्याला मारून टाकलं
आहे असं होत नाही पण, हे दोघे कायम एकमेकावर कुरघोडी करायचा,
एक दुसर्याच्या विनाशाचा प्रयत्न करत राहतात.
कावळा म्हणाला, हे बरोबर नाही.
सयुक्तिक नाही. कारण, परस्परांमधे शत्रुत्व निर्माण व्हायला काही कारण तर
पाहिजे. दोन्ही बाजूंना मनातून पराकोटीचं वैर खदखदत रहायला काही तरी घटना घडलेली असावी
लागते. त्याचप्रमाणे एकमेकांचे मनाचे धागे
जुळून एकमेकांना एकमेकांबद्दल प्रेम वाटायला, गाढ मित्रता निर्माण व्हायलाही काही सकारात्मक
चांगली घटना घडलेली असणं अपेक्षित आहे. एकेकांना एकमेकांची माहितीही नसताना कारणाविनाच
एकमेकांमधे वैचारिक दरी कशी निर्माण होईल? किंवा अचानक एकमेकांना माहित नसलेली कोणी
दोन माणसं प्रेमाने गळाभेटही करणार नाहीत. (34) अरे बाबा,
कारणान्मित्रतां याति
कारणादेति शत्रुताम् ।
तस्मान्मित्रत्वमेवाऽत्र
योज्यं वैरं न धीमता ।। 34
कारणाने घडे मैत्री । कारणानेच वैरही
विनाकारण वैरासी । शाहणा न करे कधी ।। 34
म्हणून एकदातरी तू बिळाबाहेर येऊन माझ्याशी
मैत्री करायची मुत्सदेगिरी तरी दाखव.’’
हिरण्यक उंदीर म्हणाला, तुझ्याबरोबर कसली आलिए मैत्री? मी तुला नीतीचं सारच सांगतो,
एकदा तुटलेली मैत्री
जोडायचा जो प्रयत्न करतो तो गर्भ धारण करणार्या खेचरासारखा त्याच्यामुळे स्वतःच नष्ट
होतो. (35)
सकृद्दुष्टं
च यो मित्र पुनः सन्धातुमिच्छति
।
स मृत्युमुपगृह्णाति
गर्भमश्वतरी
यथा ।। 35
तुटल्या दृढ
मैत्रीसी
। जोडाया
जातसे पुन्हा
गर्भामुळे
घडे मृत्यू
। खेचराचा
मरे तसा ।।35
वा, अहो मी तर सर्वगुणसम्पन्न आहे. मी मोठा जगन्मित्र आहे. माझ्याबरोबर कोण वैर करणार, किंवा माझ्यासोबत वैर करण्यासाठी
कोण कशसाठी वा कुठचं खुचपट काढेल? अशा भ्रामक समजुतीत कोणी राहू
नये. जे व्याकरण
प्रवीण असे पाणिनी ऋषी होते त्यांनी कोणाचं वाईट केलं होतं? पण सिंहानी त्यांच्यावर
हल्ला करून त्यांना खाऊन टाकलं. ऋषी जैमिनी, ते तर मिमांसा तज्ज्ञ होते. मदोन्मत्त
हत्तीने त्यांना आपल्या पायाखाली चिरडून टाकलं. छंद आणि वृत्ते ह्यांचं अगाध ज्ञान
असलेले ऋषी पिंगल, त्यांची काही वेगळी गोष्ट नाही. ते समुद्र किनारी लाटांची मजा घेत
सहज फिरत असताना अचानक एका मगराने त्यांना पाण्यात ओढून नेले आणि खाऊन टाकले. हे प्राणी
स्वभावतःच रागीट असतात. त्यांना हा महा ज्ञानी आहे, गुणसम्पन्न आहे हयाच्याशी काय देणघेणं?. बोलून चालून ते न माणसाळणारे, अज्ञानी, अत्यंत रागीट,
आणि मनात आलं की हल्ला करणारे जंगली प्राणीच
असतात. त्यांना वैर करण्यासाठी काहीही कारणाची आवश्यकता नसते.’’ (36)
सिंहो व्याकरणस्य
कर्तुरहरत्प्राणान्
प्रियान्
पाणिनेः
मीमांसाकृतमुन्ममाथ
सहसा हस्ती मुनि जैमिनिम्
।
छ्न्दोज्ञाननिधिं
जघान मकरो वेलातटे
पिङ्गलम्
अज्ञानावृतचेतसामतिरुषां कोऽर्थस्तिरश्चां गुणैः ? ।। 36
होते व्याकरणी
प्रवीण
अति जे, तेची ऋषी पाणिनी
सिंहाने
वधिले तयांस करुनी हल्ला तयांच्यावरी
मीमांसेत
असे अती कुशल जे, तेची ऋषी जैमिनी
त्यांना
पायदळी
असे तुडविले
उन्मत्त
त्या हत्तिनी
।।
छंदज्ञानप्रवीण
पिंगल ऋषी,
जाता समुद्रातटी
नक्राने
गिळलेच
त्यांस
सहजी नाही दया त्या मनी
अज्ञानीच,
विवेकशून्य
पशुसी हा थोर ज्ञानी
असे
ना ऐसे असते प्रयोजन
कधी रागीट तोची असे ।। 36
कावळा म्हणाला, ‘‘आपलं म्हणणं बरोबर
आहे. पण तरीही माझंही ऐकून घ्या. प्राण्यापक्ष्यांमधे
वैर वा मैत्री कुठल्याही कारणाने होते. वा बिघडते. त्यासाठी
काही खास कारण लागत नाही. मनुष्यांमधे परस्परांवर होणार्या उपकारांमुळे,
दोघांनाही मिळणार्या लाभामुळे मैत्री, संधी होते.
मूर्खांमधे लोभ वा भय ही दोन कारणे मैत्री वा वैरासाठी पुरे आहेत.
पण डोळ्यामधून पाझरणारी दया व सत्य हे सज्जन लोक एकमेकांना भेटताच ओळखतात.
त्यामुळे सज्जनांमधली मैत्री एकमेकांना पाहताक्षणीच होते.’’ (37)
उपकारच्च लोकानां निमित्तान्मृगपक्षिणाम् ।
भयाल्लोभाच्च मूर्खाणां मैत्री स्याद्दर्शनात्सताम्।। 37
निमित्त पुरते काही । पक्षी प्राण्यांस मैत्रिसी
वैरासही नसे त्यांच्या । निमित्त एक खासची ।। 37.1
सामान्य मानवांमध्ये । उपकार परस्परी
लाभ दोघांसही व्हावा । हेची कारण मैत्रिसी ।। 37.2
हाव, भीतीच मूर्खांची । मैत्री घडविते जगी
सज्जनांची घडे मैत्री । दुजासी पाहताक्षणी ।। 37.3
कावळा अजून म्हणाला, ‘‘दुष्ट दुर्जन लोक
मातीच्या घड्याप्रमाणे असतात. त्यांच्याशी झालली मैत्रीही तितकी तकलादू असते.
काही कारणाविनाच वा छोट्याशा कारणाने ती सहज तुटून जाते आणि परत
सांधताही येत नाही. सज्जन व्यक्ती ह्या सोन्याच्या घड्याप्रमाणे
सहजासहजी तुटणार्या नसतात. आणि समजा तुटल्या तर त्यांच्याशी
सरळपणे परत मैत्री जोडताही येते.(38)
मृद्घट इव सुखभेद्यो दुःसन्धानश्च दुर्जनो भवति ।
सुजनस्तु कनकघट इव दुर्भेदः सुकरसन्धिश्च ।। 38
फुटे घडाचि मातीचा । विनासायास तो जसा
पुन्हा न सांधता येतो । खळ मैत्री तशी तर्हा ।।
38.1
सालसासह मैत्री ही । असे स्वर्णघटासमा
काही केल्या तुटेना ती । तुटता येचि सांधता ।। 38.2
( लघुपतनक आपल्या विचारांच्या समर्थनार्थ अजून
म्हणाला,) ‘‘जसा उसातला गोडवा पेरापेरानी वाढत
जातो त्याप्रमाणे सज्जनांमधील मैत्री ही दिवसेंदिवस, क्षणोक्षणी
वाढतच जाते. ह्याउलट दुष्टांमधे असलेली प्रगाढ मैत्री ही काही
कारणाने झाली असल्याने काही काळानंतर प्रत्येक क्षणी घसरणीला लागते. त्यांच्या मैत्रीचा पायाच
काही डळमळीत कारणांवर आधारीत असल्याने. तया कारणाला जरा जरी धक्का लागला तरी त्यांची
मैत्री एकमेकांच्या जीवावर उठते. (39)
इक्षोरग्रात्क्रमशः पर्वणि पर्वणि यथा रसविशेषः ।
तद्वत्सज्जनमैत्री विपरीतांनां तु विपरीता ।। 39
उसाची वाढते गोडी । पेरागणिक ती जशी
प्रगाढ होतसे मैत्री । सुजनांची सदा तशी ।।39.1
परी दुर्जन मैत्रीची । असे तर्हा चि वेगळी
बिनसे घट्ट मैत्रीही । कधिही कुठल्या क्षणी ।। 39.2
त्याच प्रमाणे दुर्जनांची मैत्री ही
सकाळच्या कोवळ्या उन्हातील सावलीप्रमाणे प्रथम मोठी असते; पण जसजसा सूर्य माथ्यावर
यायला लागतो आणि उन्हातील कोवळीक संपून कडाका वाढतो तशी सावली जशी पायतळी जाते
त्याप्रमाणे कालांतराने परिस्थिती पालटताच दुष्ट लोकांची मैत्री इतकी आक्रसते की ती
पायदळी तुडवायलाही ते मागेपुढे बघत नाहीत. हयाउलट सज्जनांची मैत्री
मात्र पहिल्यांदा दुपारच्या उन्हात पडणार्या सावलीसारखी छोटीशी असली तरी नंतर मात्र ती संध्याकाळच्या सावलीसारखी वाढतच जाते.
जीवनाच्या संध्याकाळीही दिलासा देणारी असते. (40)
आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण,
लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात् ।
दिनस्य पूर्वार्ध- परार्धभिन्ना,
छायेव मैत्री खलसज्जनानाम् ।।40
लांब छाया प्रभातीची
। मध्याह्नी हो लहानशी
मैत्री दुष्टांसवे तैशी
। कमी होतेच नंतरी ।। 40.1
सावली सान मध्याह्नी
। सांजेस लांबते जशी
मैत्री भल्यांसवे तैशी
। जाते वाढत निश्चिती ।। 40.2
लघुपतनक कावळा म्हणाला,
‘‘म्हणून तू विश्वास ठेव. मी एक सज्जन व्यक्ती आहे. पण म्हणत असशील तर शपथ घेऊन वा
इतर कृतीने तुला आश्वस्त करतो.’’
हिरण्यक उंदीर म्हणाला, छे छे!!! तुझ्या शपथेबिपथेवर माझा थोडाही विश्वास नाही. असल्या
शपथा बिपथा घेऊन मैत्री करु पाहणार्या शत्रूवर थोडापण विश्वास टाकू
नये. इंद्राने सुद्धा मोठ्या शपथपूर्वक
विश्वास संपादन करून मगच वृत्रासुराचा समूळ काटा काढला.(41)
शपथैः सन्धितस्याऽपि
न विश्वासं व्रजेद्रिपोः ।
श्रूयते शपथं कृत्वा
वृत्रः शक्रेण सूदितः ।। 41
करे शत्रू जरी संधी
। प्रेमे शपथपूर्वक
विसंबावे न ऐशा त्या
। शत्रूवरी भयानक
ऐकण्यात असे आहे । शपथेने दिती वश
करुनी, इंद्र मारे तो । वृत्रासुर दितीसुत
।। 41 ।।
हिरण्यक उंदीर अजून संदर्भ
देत म्हणाला, ‘‘अहो!
शत्रूने विश्वासच ठेवला नाही तर, देवसुद्धा त्याचं काहीही बघडवू शकत नाहीत. त्याला
मारू शकत नाहीत. दैत्यमाता दितीने इंद्रांच्या शपथेवर विश्वास ठेवला म्हणूनच इंद्र
दितीगर्भ नष्ट करू शकला.’’
न विश्वासं विना शत्रुर्देवानामपि सिद्ध्यति ।
विश्वासात्त्रिदशन्द्रेण दितेर्गर्भो विदारितः ।। 42 ।।
संपादूनच शत्रूच्या । विश्वासा कार्य साधते
विश्वासावीण शत्रूच्या । होती विवश देव ते ।।
संपादूनचि विश्वासा । दिति गर्भा करे
क्षति
गर्भावस्थेत वृत्रासी । करे खंडित इंद्रही ।। 42 ।।
जर एखाद्याला स्वतःचा विकास साधायचा असेल, आपलं कल्याण व्हावं अशी इच्छा असेल, दीर्घायुष्याची कामना असेल तर त्या शहाण्याने कधी देवांचा गुरू बृहस्पतीवरही विश्वास ठऊ नये. मग बाकींच्यांची तर काय कथा!(43)
बृहस्पतेरपि प्राज्ञस्तस्मान्नैवाऽत्र विश्वसेत् ।
य इच्छेदात्मनो वृद्धिमायुष्यं च सुखानि च ।। 43
कामना करि जो चित्ती । सुख, आयुष्य वृद्धिची
बृहस्पतीवरीही ना । ठेवी विश्वास तो कधी ।।43
शत्रू हा आपल्या प्रतिस्पर्ध्याचं न्यून बरोबर शोधून काढतो. त्याच्या उणीवांचा अभ्यास करतो. आणि प्रतिस्पर्ध्याची कुचराई, दुर्लक्ष, सुस्तता, आळस हेरून बरोबर त्याच्या अंतर्गत व्यवस्थेत शिरून हळुहळु त्याला नामशेष करतो. नौकेला एकादं छोटसं छिद्र जरी असलं तरी त्यातून पाणी हळुहळु
आत येऊन, थोड्यावेळात संपूर्ण नावच पाण्याने भरून जाते. त्याच्यामुळेच भक्कम वाटणारी
नौका सहज पाण्यात बुडते.
सुसूक्ष्मेणाऽपि रन्ध्रेण प्रविश्याभ्यन्तरं रिपुः ।
नाशयेच्च शनैः पश्चात्प्लवं सलिलपूरवत् ।। 44
सूक्ष्म छिद्रही नावेचे
। पुरे बुडविण्यास ती
येता हळुहळू पाणी ।
भरे नौका जले पुरी
सुरक्षेत ढिलाई ती । शत्रुपथ्यावरी
असे
घुसे गाफील पाहूनी । दक्ष शत्रू महा
त्वरे ।। 44 ।।
खोटारड्या व्यक्तीवर
कधिही विश्वास ठेऊ नये. आणि विश्वासू व्यक्तीवरही फार विश्वास ठेऊ नये. कोणावर कधीही
विसंबून राहू नये. असं विसंबून राहणं भय उत्पन्न करणारं, तुमचा मूळापासून नाश करणारं
असतं.(45)
न विश्वसेदविश्वस्तं विश्वस्तं नाऽति विश्वसेत् ।
विश्वासाद्भयमुत्पन्नं मूलान्यपि निकृन्तति ।। 45
अप्रामाणिक व्यक्तीचा । विश्वास कधि ना धरी
प्रामाणिक आसूनीही । पूर्ण विश्वास
ना धरी
विश्वासातून आपत्ती । निर्माण होत जी असे
विश्वासातून होई जे । भय उत्पन्न भीषण
सर्वनाश करे तेची । मुळापासून निश्चित ।। 45 ।।
भले एखादा राजा ताकदवान नसेलही. पण तो जर कोणाच्याही
भरवशावर न राहता, कायम सजगपणे रहात असेल तर त्याचा अत्यंत बलवान असा शत्रूही त्याचं
काही वाकडं करू शकत नाही. त्याउलट एखादा बलवान राजा जर एखाद्यावर विसंबून, कोणावर फार
विश्वास ठेउन राहु लागला तर त्याचा अंतकाळ जवळ आला हे निश्चित!
न वध्यते ह्यविश्वस्तो दुर्बलोऽपि मदोत्कटैः ।
विश्वस्ताश्चाशु वध्यन्ते बलवन्तोऽपि दुर्बलैः ।। 46
भरोसा न धरे जोची, नित्य सावध जो असे
कमजोर असूनीही । बळी त्या ना वधू शके
परी विश्वासुनी राहे । बलवान असूनही
सहजी मारला जातो । शक्तिहीनाकडूनही
।। 46 ।।
आपल्याकडे तीन महत्त्वाच्या नीती मानल्या जातात.
त्यांच्या अनुसार वागण्याने यश प्राप्त होते. एक विष्णुगुप्ताची, दुसरी दैत्यगुरू शुक्राचार्यांची
तर तिसरी देवगुरू बृहस्पतीची! विष्णुगुप्ताच्या
मतानुसार आपल्याला जे काम योग्य आहे असं वाटतं ते सातत्याने, योग्य नियोजन करून, फार
बभ्रा न करता, योजना षट्कर्णी न करता करत रहावं. त्याने हमखस यश मिळतं. दैत्यगुरू शुक्राचार्य
म्हणतात, कुठचंही काम एकट्याने होणं अवघड असतं. त्यामुळे आपल्याला हितावह असतील, मदत
करतील असे मित्र जोडत जावेत. तर बृहस्पतीच्या
म्हणण्यानुसार कोणावरही काडीइतका विश्वास ठेऊ नये. आपण आपली योजना आखून त्यानुसार वागत
राहिलं पाहिजे. (47)
सुकृत्यं विष्णुगुप्तस्य मित्राप्तिर्भार्गवस्य च ।
बृहस्पतेरविश्वासो नीतिसन्धिस्त्रिधा स्थितः ।। 47
निरंतर परी गुप्त । यथोचित कृती करे
असे सांगीतले आहे । विष्णुगुप्ताचिया
मते ।।
मित्र जोडीत जावे ते । शुक्रनीती वदे
अशी
साफल्य मिळण्यासाठी । योग्य आहेच ही
कृती ।।
नीती बृहस्पतीची ती । सांगे विश्वास
ना धरी
योजना गुप्त साकारी । नित्य सावध अंतरी
।।
तीघांच्या तीन नीती ह्या । यशस्वी करती
नरा।
मिळे सफलता त्याने । चिंता ना जाळते
मना ।। 47 ।।
तसेच जो आपल्या
संपत्तीच्या बडेजावातच फार मश्गूल होऊन, गर्वाने फुगून जाऊन आपल्या शत्रूंवरच भरवसां
ठेऊन असतो, किंवा एखाद्या फसव्या नाटकी वरवर
गोड बोलणार्या पण आतून विरुद्ध कारवाया करणारया स्त्रीच्या वागण्या बोलण्यावार
विश्वास ठेवतो; तो तोपर्यंतच सरक्षित राहू
शकतो जोवर तो त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. (148)
महताऽप्यर्थसारेण यो विश्वसिति शत्रुषु ।
भार्यासु च विरक्तासु तदन्तं तस्य जीवितम् ।। 48 ।।
जो निश्चिंतपणे राहे । शत्रूवर विसंबुनी
मिजाशीतचि शक्तीच्या । धनाचा गर्वही
धरी
घातकी स्त्रीवरी राहे । ज्याची आस्था
निरंतरी
येई कह्यात त्याच्या तो । हो अनुकूल
त्या क्षणी ।। 48 ।।
हिरण्यकाचा
युक्तिवाद ऐकून लघुपतनक
निरुत्तर झाला. मनातल्याा मनात विचार करू लागला, हा हिरण्यक नीतीशास्त्रात
चांगलाच निष्णात आहे. आणि म्हणूनच त्याच्याबरोबर मैत्री करण्याची मला आस लागून
राहिली आहे. मग पुन्हा हिरण्यकाला ऐकू येईल असे तो म्हणाला, ‘‘मित्रा हिरण्यका, विद्वान लोक
म्हणतात की, सात पावलं बरोबर चालली किंवा सात वाक्य एकमेकांशी बोलली तर परस्पर
मित्र होतात. म्हणून आपण मित्र झालेलेच आहोत. आपल्यात मैत्रीचे संबंध जोडले गेले
आहेत. आता मी काय म्हणतो ते ऐक. (49)
सख्यं साप्तपदीनं
स्यात् । इत्याहुर्विबुधा जनाः ।
तस्मात्वं मित्रता
प्राप्तो । वचनं ममतच्छृणु ।। 49 ।।
अरे भल्या गृहस्था तू । ऐक माझेच बोलणे
पाऊले चालता सात ।
एकमेकांचिया सवे ।।
अथवा बोलता वाक्ये ।
सात कोणी दुजासवे
विद्वानांच्या मते
होई । मैत्री दोघात त्या बरे ।। 49 ।।
‘‘जर तुझा माझ्यावर
विश्वास नसेल तर तू तुझ्या ह्या किल्ल्यात बसूनच माझ्याशी विविध विषयांवर गप्पा
मारायला काय हरकत आहे? तू माझ्याशी गुण
दोषांवर सर्व बाजुंनी विचार (गुणदोषविवेचन) सुभाषितासंदर्भातील गोष्टी
अशा अनेक विषयावर बोलू शकतोस.’’
लघुपतनकाने पुढे
ठेवलेला प्रस्ताव ऐकून हिरण्यकाने आपल्या मनात विचार केला, ‘अरे ! हा लघुपतनक वादविवादात मोठा निष्णात आहे शिवाय
जे काय बोलतो ते सत्य बोलतो. ह्याच्या सोबत मैत्री करणे योग्य आहे.’
मग परत मोठ्याने कावळ्याला ऐकू येईल असं तो म्हणाला, ‘‘भल्या गृहस्था, ठीक आहे. पण
मैत्री करण्यापूर्वी माझी एक अट राहील की, तू माझ्या ह्या किल्ल्याच्या आत पायही
ठेवणार नाही. असं म्हणतात,
परस्त्रीशी संबंध
ठेवणार्या पुरुषाचा हात पहिल्यांदा भीड चेपे पर्यंत घाबरत घाबरत परस्त्रीला
स्पर्श करतो. थोडा अडखळत तिच्या अंगावरून फिरतो पण थोडा संकोच दूर होताच तो
निर्ढावतो. निर्भय होऊन हवा तसा हवा तिथे फिरायला कचरत नाही. शत्रूचंही तसच आहे.
शत्रूच्या राज्यात शिरण्यापूर्वी तो जरा दबकत सावधपणे हळु हळु अंदाज घेत आत शिरतो. पण एकदा का आत शिरला की
निर्भय होऊन बिनदिक्कतपणे शत्रुराज्यात फिरू लागतो.(50)
भीतभीतः पुरा शत्रुर्मन्द मन्दं विसर्पति ।
भूमौ प्रहेलया पश्चात् जारहस्तोऽङ्गनास्विव ।। 50 ।।
भीत भीत शिरे शत्रू । दक्ष सावधचित्तची
शत्रुराज्यात येताची । फिरे निर्धास्त होऊनी
परस्त्रीशी जसा कोणी । स्पर्श निसटता करी
चेपता भीड थोडीशी । निर्ढावे सर्वतोपरी ।। 50 ।।
ते ऐकून कावळा म्हणाला, ‘‘हे
सद्गृहस्था तू म्हणशील तसच मी वागेन.’’
त्या दिवसापासून ते दोघे गप्पा गोष्टी, उत्तमोत्तम वचने
एकमेकांना सांगत आानंदाने काळ घालवू लागले. दोघे मित्र एकमेकांना आनंद वाटावा असे दुसर्याच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत. लघुपतनक कावळा कधी मांसाचे तुकडे तर कधी पवित्र बली मधे मिळालेले अनेक चांगले चांगले पदार्थ, निरनिराळी पक्वान्न आणून मोठ्या स्नेहाने हिरण्यक उंदराला देऊ लागला तर हिरण्यक सकाळी निरनिराळ्या उत्तमोत्तम कथांद्वारे विचारांचं आदानप्रदान करण्यासाठी आलेल्या कावळ्याला रात्री गोळा केलेले तांदूळ आदि धान्य प्रकार, देऊ करत असे. मैत्रीत ही देवाण घेवाण योग्यच आहे. म्हणतात ना,
एकमेकांमधे असलेला मैत्रभाव सहा लक्षणांनी दिसून येतो. मित्रांमधे एकमेकांना आवडत्या, निरनिराळ्या गोष्टींचं आदानप्रदान होतं. आपल्या मित्राला आवडणारी गोष्ट त्याला देण्याचा दुसरा मित्र हरप्रकारे प्रयत्न करत असतो. व संधी मिळताच ती गोष्ट त्याला भेट देऊन चकित करत असतो. आनंदित करत असतो. आपल्या मनातील गुपितं मित्र आपल्या जिगरी दोस्ताला निःशंकपणे सांगतो तसेच दुसर्याच्या मनात काय रहस्य दडली आहेत, किंवा त्याला कुठच्या गोष्टी मनात सलत आहेत वा ज्या गोष्टी त्याला इतरांसमोर उघड करता येणार नाहीत त्या मोठ्या आस्थेने विचारतो. ऐकतो.
ददाति प्रतिगृह्णाति, गुह्यमाख्याति पृच्छति ।
भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधम् प्रीतिलक्षणम् ।।51
मैत्रीत एकमेकांसी । देती घेती परस्परे
खाती खिलवती दोघे । प्रेमपूर्वक दोस्त ते
सांगती गूज चित्तीचे । आस्थेने पुसती तसे
लक्षणे मैत्रिची ऐसी । सहा सांगति प्राज्ञ ते ।। 51 ।।
दोघांमधे मीत्री तेव्हाच संभव असते जेव्हा, दोघं परस्परांच्या भल्यासाठी काम करत असतील. उपकार आणि त्याची परतफेड ह्याशिवाय मैत्री संभव होत नाही. देवतासुद्धा त्यांच्या आवडती गोष्ट, भेटवस्तू त्यांना दिल्याशिवाय इच्छित फळ देत नाहीत. (52)
नोपकारं विना प्रीतिः कथञ्चित्कस्यचिद्भवेत् ।
उपायाचितदानेन यतो देवा अभीष्टदाः ।। 52 ।।
कशी व्हावीच मैत्री ती । न देता प्रिय वस्तु त्या
देता आवडिचे देवा । फळे उत्तम दे नरा ।। 52 ।।
अहो! ह्या विश्वात कोणी काही दिलं तरच तो दुसर्यावर प्रेम करतो. गायीला दूध येईनासं
झालं की तिचं वासरूही तिच्यासोबत राहत नाही. (53)
तावत्प्रीतिर्भवेल्लोके यावद्दानं प्रदीयते ।
वत्स क्षीरक्षयं दृष्ट्वा परित्यजति मातरम् ।। 53 ।।
पसंतीची मिळे वस्तू । भेटीदाखल जोवरी
तोवरी टिकते मैत्री । प्रेम आपुलकीच ती ।।
ओहोटी भेटवस्तुंची । लावे उतरती कळा
गायीचा आटता पान्हा । वासरू सोडते तिला ।। 53 ।।
अहो! भेटवस्तूंचं महत्त्व तर पहा! जो शत्रू तुमचा इतका रागराग करत असतो, तुमचा तिरस्कार करत असतो,तो देखील क्षणात तुमचा मित्र होतो.
पश्य दानस्य माहात्म्यं सद्यः प्रत्ययकारकम् ।
यत्प्रभावादपि द्वेषी मित्रतां याति तत्क्षणात् ।। 54 ।।
महत्त्व भेटवस्तूंचे । निश्चयाने असे महा
तिरस्कारीच शत्रू जो । होई मित्र क्षणी पहा ।। 54 ।।
फक्त माणसच नाही तर पशूंनाही आपल्या लाडक्या आपत्यापेक्षा आपली आवडती वस्तू मिळली तर जास्त आनंद होतो. म्हशीला चांगली सरकी वा आवडतं खाद्य मिळालं तर ती तिचं सर्व दूध दुसर्याला देऊन टाकते. (55)
पुत्रादपि प्रियतरं खलु तेन दानं
मन्ये पशोरपि विवेकवर्जितस्य ।
दत्ते खले नु निखिलं खलु येन दुग्धं
नित्यं ददाति महिषी ससुताऽपि पश्य ।। 55 ।।
पुत्राहुनी प्रिय गमे बहुमूल्य भेटी
नाही पशू नर कुणी अपवाद ह्यासी
देताच पेंड सरकी कुणि ती म्हशीसी
देईच दूध सगळे दुसर्या नरासी ।। 55 ।।
बोटाची नखं ज्याप्रमाणे बोटाच्या मांसाला कायम धरून वाढतात, मांस आणि नखांना एकमेकांपासून दूर करता येत नाही त्याप्रमाणे त्या उंदरामधे आणि कावळ्यामध्ये काही दिवसातच आगदी घट्ट मैत्री झाली. (56)
प्रीतिं निरन्तरां कृत्वा दुर्भेद्यां नखमांसवत् ।
मूषको वायसश्चैव गतावेकान्तमित्रताम् ।। 56 ।।
बोटावरी नखे मांस । धरुनी राहती जसे
उंदीर कावळा तैसे । गाढ मित्रचि जाहले ।। 56 ।।
अशाप्रकारे, कावळ्यानी दिलेल्या छान छान भेटी, देणग्या, नजराणे ह्यामुळे हिरण्यक उंदीर लघुपतनक कावळ्यावर इतका लट्टू झाला की त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन त्याच्या पंखाखालीही निर्भयपणे जाऊन बसू लागला आणि त्याच्याशी रोज गप्पागोष्टी करू लागला.
एकदिवस कावळा आला तेव्हा कावळ्याचे डोळे पाण्याने भरून आले होते. गळाही भरून येत तो अत्यंत सद्गदित आवाजात म्हणाला, ‘‘ माझ्या भल्या मित्रा हिरण्यका, मी आता ह्या ठिकाणी जास्त राहू शकणर नाही. माझं मन येथे रमणार नाही. मला येथे स्वारस्य वाटत नाही. मी आता कुठेतरी दुसर्या देशात जाउन राहीन असं म्हणतोय.’’
हिरण्यक म्हणाला, ‘‘प्रिय मित्रा, तुला अचानक येथे राहण्यात जराही प्रीती, इच्छा, आपुलकी, आसक्ती, स्वारस्य का राहिलं नाही?’’
त्यावर लघुपतनक कावळा म्हणाला, ‘‘तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो, ह्या देशात खूप काळ पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळ पडला आहे. ह्या अवर्षणामुळे लोकांनाच खाण्याचे फाके पडत आहेत अशावेळेला कावळ्यांना बळी म्हणून पिंड कोण देणार? शिवाय धान्याच्या कमतरतेमुळे लोकांनी घरोघरी पक्षी पकडण्यासाठी जाळी, फास लावून ठेवले आहेत. माझं दैव बलवत्तर म्हणून मी त्यात न सापडता त्यातून कसाबसा जगून वाचून सुटून आलो आहे. त्यामुळे आता इथे राहण्याची मला इच्छा राहिली नाही. म्हणून मोठ्या दुःखाने ही जागा सोडून दुसर्या देशात जाण्याचा निर्णय घेत आहे. ’’
हिरण्यक उंदीर म्हणाला, ‘‘आपण कोठे जायचा विचार करत आहात? ’’
लघुपतनक कावळा म्हणाला, ‘‘ ह्या इथून दक्षिणेकडे जाताना वाटेत एक घनदाट जंगल आहे. त्या जंगलात एक भलं मोठं सरोवर आहे. तेथे मंथरक नावाचं एक कासव राहतं त्याच्यासोबत माझी तुझ्याहूनही घनिष्ठ मैत्री आहे. तो मला नेहमी मांसांचे तुकडे देतो. ते खाऊन त्याच्यासोबत गप्पागोष्टी करत मी सुखाने काळ घालवीन. येथे राहून आपल्या डोळ्यांनी जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांचा विनाश मला पहायचा नाही. ’’ म्हणतातच,
‘‘अनावृष्टी मुळे ज्या देशातील सर्व अन्नधान्य साठा संपून गेला आहे, त्या देशाचा विनाश वा तेथे राहणार्या आपल्या आप्तेष्टांचा विनाश ज्याला आपल्या डोळ्यांनी पहायला लागत नाही तो नर खरोखरच धन्य होय! ’’ (57)
अनावृष्टी हते देशे सस्ये च प्रलयं गते ।
धन्यास्तात न पश्यामि देशभङ्गं कुलक्षयम् ।। 57 ।।
नासाडी अन्न धान्याची । कोठारे वा रिती पुरी
अनावृष्टीमुळे होता । उत्पन्न ही अशी स्थिती
अशावेळी कुळाचा वा । देशाचा सर्वनाशही
पहावा लागतो ना ज्या । नर तो धन्य ह्या जगी ।। 57 ।।
दुसरंही आहे म्हणा,
‘‘जी व्यक्ती कार्यक्षम आहे, कोणतंही काम करायला समर्थ आहे. अनेक आघाड्यांवर एकाच वेळी तोंड देण्यास सक्षम आहे अशा व्यक्तीला कामाचा भार कसा वाटेल? कितीही मोठ्या कामाचं आव्हान स्वीकारून, सर्व कामे योग्य रीतीने निपटून टाकण्यात ती कायम यशस्वीच होते.
व्यापार उदीम करणार्या व्यक्तीचे कामच दूरदूरच्या ठिकाणी जाऊन सामान आणणे व ते जगाच्या दुसर्या कोपर्यात पोचवणे असे असते. वा जो वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतो त्याला आपल्या ग्राहकापर्यंत पोचून ती सेवा द्यावीच लागते. त्यामुळे एखादं ठिकाण खूप दूर आहे, मार्गाबाहेर आहे वा आवाक्यापलिकडे आहे असे तो म्हणत नाही तर त्याचा सर्वत्र संचार असतो.
अनेक विद्या पारंगत असणारा कोठेही गेला तरी विद्येच्या बळावर कुठेही सहज तगून जातो. अशा निष्णात व्यक्तीची जगात सर्वांनाच गरज असते. त्यामुळे सर्वच लोक त्याच्याशी आदराने वागतात. त्याला कुठलीच जागा अपरिचित, परकी वाटत नाही.
त्याचप्रमाणे मिठ्ठास वाणी असलेली व्यक्ती सहज कोणाचही मन जिंकून घेते. दुसर्याला आपलसं करते. अपरिचितही त्याच्याशी लगेचच परिचताप्रमाणे वागू लागतो. त्यामुळे गोड बोलणार्याला ह्याच्याशी कसं बोलू? त्याच्याशी कसं वागू? असा प्रश्न पडत नाही. त्याला कोणी अजा दुजा असा भेद वाटतच नाही. (58)
कोऽतिभार समर्थानां किं दूरं व्यवसायिनाम्? ।
को विदेशः सविद्यानां कः परः प्रियवादिनाम्?।। 58 ।।
भासे न भार कामाचा । कार्यक्षम नरास त्या ।
व्यवसाय असे ज्याचा । दूर अंतर त्यास ना ।।
सुशिक्षितास वाटे ना । परदेशचि कोणता ।
भासे ना परका कोणी । मिठ्ठास बोलतो तया ।। 58 ।।
तसेच, अनेक प्रकारच्या विद्या जाणणार्या विद्वानाची कोणा राजाबरोबर तुलनाच होऊ शकत नाही. कारण राजाला अत्यंत मर्यादित क्षेत्रातील म्हणजे, त्याच्या त्याच्या राज्यातील लोक फक्त मान देतात. त्याची प्रशंसा करतात. कित्येकवेळा ती प्रशंसा नाइलाजाने वा राजाकडून होणार्या शिक्षेच्या भयापोटीही
केली जाते. पण विद्वानांचे तसे नाही. त्यांच्या विद्वततेमुळे जगभरातल्या लोकांना त्यांचा फायदा होत असतो. अशा विद्वानांच्यामुळे अनेक प्रकारच्या लोकोपयोगी व्यवस्थांमधे सुधारणा घडून येते. त्यामुळे ते जगभर कुठेही गेले तरी लोक त्यांना मान देतात. त्यांचं श्रेष्ठत्त्व मान्य करतात. (59)
विद्वत्त्वञ्च नृपत्वञ्च नैव तुल्य कदाचन ।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पू्ज्यते ।। 59 ।।
विद्वान जाणकाराची । तुलना न नृपासवे
राजाचा मान राज्यात । प्राज्ञासी जग मानते ।। 59 ।।
लघुपतनक कावळ्यावर आलेले संकट आणि त्या अनुषंगाने त्याचे विचार ऐकून, हिरण्यक उंदीर म्हणाला, ‘‘असं जर असेल, आणि येथून प्रस्थान करण्याविषयी तू इतका आग्रही असशील तर मीही तुझ्यासोबत येतो. येथे माझ्याही समोर मोठं दुःखाचं ताट वाढून ठेवलं आहे. ’’
लघुपतनक कावळा म्हणाला, मित्रा! ‘‘तुला काय दुःख आहे? मला सांग तरी! ’’
त्यावर हिरणयक उंदीर म्हणाला, ‘‘माझी रडकथा मोठी आहे. त्याबद्दल खूप सारं सांगायचं आहे. तिकडे गेल्यावर सविस्तपणे सर्वकाही कथन करीन. ’’
कावळा म्हणाला, ‘‘मी तर आकाशमार्गे उडत जाणार आहे. तू माझ्यासोबत कसा काय येणार? ’’
उंदीर म्हणाला, ‘‘तू जर माझे प्राण वाचवू शकत असशील तर तुझ्या पाठीवर बसवून मला तिकडे पोचव. नाहीतर मला काही दुसरा पर्याय नाही. ’’
ते ऐकल्यावर कावळा अत्यंत आनंदाने म्हणाला, ‘‘असं असेल तर त्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही. तेथेही मी तुझ्यासोबत आनंदाने काळ व्यतीत करू शकेन. मी सम्पात आणि अजुनही काही मिळून आठ उड्डाणाचे प्रकार जाणतो. तरी तू निःशंकपणे माझ्यापाठीवर चढून बैस मी तुला अत्यंत सहज, सुखदायक आणि सुरक्षितपणे तिकडे तलावाच्या जवळ नेऊन पोचवीन. ’’
हिरण्यक उंदीर विचारू लागला, ‘‘मित्रा! हे आठ उड्डाणाचे प्रकार कुठले? मलाही त्या विषयी जाणून घ्यायला आवडेल. ’’
कावळा सांगू लागला, (पात म्हणजे उडणे, उड्डाण, उडान किंवा भरारी. आठ प्रकारची उड्डाणे असतात.) ‘‘ 1 सम्पात सम् म्हणजे बरोबर. एकमेकांसोबत उडणे, एकत्रित उडणे, एकमेकांच्या सहाय्याने उडणे. (छोट्या अशक्त पिलांना पाठीवर वा पंखांवर बसवून पक्षी उडतात.) 2 विपात – उडतांना अनपेक्षितपणे, अघोषितपणे बदल करणे, परिवर्तन करणे. 3 महापात – सर्व शक्ती पणाला लावून उडणे 4 निपातन - खाली उतरणे, उंचावरून खाली झेप घेणे, मर्मावर घाला घालणे, आक्रमण करणे, तुटुन पडणे, आकस्मिक बदल करणे 5 वक्रगती –तिरकी, वळणावळणाची कोणाच्या लक्षात येणार नाही अशी उडण्याची क्रिया 6 तिर्यंक गती – तन, मन, वचन सर्व प्रकारे कुटिल गती जी शत्रूलाचकवते वा आपल्या भक्ष्याच्या लक्षात येत नाही. 7 ऊर्ध्व गती – वरच्या दिशेने झेपावणे, उडणे 8 लघु गती – दबकत, हळु हळु , कानोसा घेत उडणे.’’
सम्पातञ्च विपातञ्च महापातं निपातनम् ।
वक्रं तिर्यंक्तथा चोर्ध्वमष्टमं लघुसंज्ञकम् ।। 60 ।।
विपात, लघु, संपात । महापात, निपातही,
वक्र, तिर्यंक, वा उर्ध्व । उड्डाणे आठ ही अशी ।। 60 ।।
लघुपतनक कावळ्याने सांगितलेली माहिती ऐकल्यावर हिरण्यक उंदीर तात्काळ उडी मारून लघुपतनकाच्या पाठीवर चढून बसला. तोही संपात ह्या उडण्याचा प्रकाराचा अवलंब करून उंदरासहित तेथून निघाला व हळुहळु मार्गक्रमण करत त्या सरोवरानिकट येऊन पोचला. मंथरक कासव हे सर्व आपल्या चाणाक्ष नेत्रांनी दूरवरून टिपत होता. देश व काळाचे भान असलेल्या मंथरकाने आपल्या पाठीवर उंदराला घेऊन येणार्या कावळ्याला दूरूनच पाहिल्यावर हा कोणीतरी साधासुधा नाही तर वेगळाच कावळा दिसतोय हे जाणले आणि तो त्वरीत जलाशयाच्या पाण्यात शिरला. त्यावेळी लघुपतनक कावळ्याने तलावाच्या काठी असलेल्या एका वृक्षाच्या ढोलीत सुरक्षितपणे हिरण्यकाला उतरवले आणि झाडाच्या शेंड्यावर चढून त्याच्या मित्राला मंथरक कासवाला उंच आवाजात हाळी घालून बोलावू लागला. ‘‘मंथरका! अरे मंथरका, अरे लवकर ये लवकर पाण्यातून बाहेर ये. मी तुझाच मित्र लघुपतनक आहे. मोठ्या उत्कंठेने तुला भेटायला आलो आहे. तुला भेटण्यासाठी मी अत्यंत अधीर झालो आहे. ये एकदा गाढ आलिंगन देऊन मला भेट. ’’ म्हटलच आहे,
‘‘मित्राला गाढ आलिंगन देऊन भेटल्यावर त्याच्या शरीरस्पर्शाने मनाला जो आनंद, जी शीतलता लाभते, त्याची तुलना कर्पूरयुक्त चंदनाचा लेप असो वा हिमामुळे मिळणारी शीतलता असो! त्यांच्याशी होऊ शकत नाही. चंदनलेप वा हिमामुळे मिळणारी शीतलता मित्रभेटीच्या पासंगालाही पुरत नाही. ’’ (61)
किं चन्दनैः सकर्पूरैस्तुहिनैः किं च शीतलैः ?
सर्वे ते मित्रगात्रस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।। 61 ।।
उटी चंदनकर्पूरी । असो शीतल ती जरी
मित्र-आलिंगना जैसे । सुख नाहीच ह्या जगी ।।
कापूर चंदनादिंनी । मिळे शीतलताच जी
तिची सन्मित्र भेटीशी । तुलना नच हो कधी ।। 61
‘‘शिवाय, मला तर असं वाटतं की, ज्या कोणी मित्र ह्या दोन अक्षरी शब्दाची निर्मिती केली त्याने तर अमृताचीच निर्मिती केली असे मी म्हणेन. कारण मित्र नुसत्या संकटातच तुमच्या मदतीला येतो असे नाही तर शोक, पीडा, व्यथा दुःख ह्या सर्व औषधांवर रामबाण इलाज असल्याप्रमाणे कामी येतो. ’’ (62)
केनाऽमृतमिदं सृष्टं मित्रमित्यक्षरद्वयम् ।
आपदं च परित्राणं शोकसन्तापभेषजम् ’’ ।। 62 ।।
मित्र ही अक्षरे दोन । सुधा निस्यंदिनीसमा
कळे ना निर्मिली कोणी । संकटी तारिती सदा ।।
विलाप, वेदना, पीडा । अस्वस्थता मनाचि वा
पश्चात्ताप व्यथा ह्यांसी । असे औषध हे महा ।। 62
(शोक- दुःख, कष्ट ,विलाप. सन्तापः – पीडा वेदना व्यथा, पश्चात्ताप, तपस्या)
त्यावेळी लघुपतनक कावळ्याचे ते बोलणे ऐकून मंथरक कासवाला आपल्या अत्यंत निपुण मित्राची चांगल्यापैकी ओळख पटली. मित्राला भेटायला तो त्वरेने पाण्याबाहेर आला. मित्राच्या इतक्या दिवसांच्या आगमनाने प्रेमाश्रुंनी त्याचे डोळे भरून आले. अंग रोमांचित झाले. अत्यंत अधीरतेने तो म्हणाला, मित्रा, ये ये!! मला गाढ आलिंगन दे. मध्यंतरी खूप दिवस माझ्या आजूबाजूलाही तू माझ्या दृष्टीस पडला नाहीस म्हणून (अचानक कोणी भलतच आलं असेल तर ह्या काळजीने) मी आत्ता पाण्यात शिरलो. म्हटलच आहे की,
बृहस्पतीचंही असं मत आहे की, ज्याचं सामर्थ्य, बहादुरी, महिमा, कुळ, शील, मनातील छुपा उद्देश माहित नाही त्याच्याशी मैत्री करणं योग्य नाही. ’’
(63)
यस्य न ज्ञायते वीर्यं न कुलं न विचेष्टितम् ।
न तेन सङ्गतिं कुर्यादित्युवाच बृहस्पतिः’’ ।। 63 ।।
(वीर्य – बहादुरी, पराक्रम, शौर्य, बल सामर्थ्य, गौरव, महिमा, शक्ती, साहस उर्जा)
नाही माहीत ज्याचा हो । कुळ, शील, पराक्रम
हेतू वा मानसीचा ज्या । नको त्याचीच संगत ।।
असे बृहस्पतीचे हे । योग्य अत्यंत हे मत
मैत्री नको असंगाशी । तीच होईल घातक ।। 63
मंथरकाचे असे बोलणे ऐकल्यावर लघुपतनक कावळा झाडावरून खाली
उतरला आणि त्याने आपल्या मित्राला गाढ आलिंगन दिले. ज्या कोणी म्हटलं आहे ते
बरोबरच आहे. अमृताचा झरा जरी लाभला तरी त्याचा
कितीसा उपयोग? कारण तो देह धुण्यापलिकडे काही करणार नाही.--- पण! चिर विरहानंतर भेटणार्या मित्राचं आलिंगन हे
अमृताहून कितीतरीपटींनी श्रेष्ठ असतं. त्याने शरीराची अन्तर्बाह्य (पुष्टी,
तुष्टी) शुद्धी होते. त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते अमूल्य असूनही त्यासाठी
लवभरही मूल्य द्यावं लागत नाही. (64)
अमृतस्य प्रवाहैः किं कायक्षालनसम्भवैः ।
चिरान्मित्रपरिष्वङ्गो योऽसौ मूल्यविवर्जितः ।। 64 ।।
भेटता चिरकाळाने । सुहृदासचि आपुल्या
प्रेमे आलिंगता त्यासी । अन्तर्बाह्य विशुद्धता ।।
अलौकिक मिळे सौख्य । त्याची सर न अमृता
सुधा निर्झर दे मात्र । बाह्य देहास शुद्धता ।।
सुहृत् आलिंगनाचे ह्या । वैशिष्ट्य एक ते असे
अनमोल असूनीही । मूल्य द्यावे न लागते ।। 64 ।।
अशाप्रकारे दोघांनीही एकमेकांना गाढ आलिंगन दिले. (चिरकाळाच्या विरहानंतर झालेल्या अशा भेटीने) दोघेही (अत्यानंदाने भावुक होऊन) रोमांचित झाले. दोघेही झाडाच्या खाली सावलीत बसले आणि आपला आपला मधल्या काळातील वृत्तांत एकमेकास सांगू लागले. हिरण्यकही त्यांच्यात सामील झाला. मंथरकाला अभिवादन करून तो लघुपतनक कावळ्याच्या शेजारी जाऊन बसला. मन्थरक कावळ्याला म्हणाला, मित्रा हा कोण उंदीर आहे? तुझं भक्ष्य असतांनाही तू ह्याला तुझ्या पाठीवर बसवून त्याला येथे का घेऊन आला आहेस? ह्यात नक्कीच काहीतरी रहस्य दडलेलं असावं.’’
कावळा म्हणाला, ‘‘मंथरका, हा हिरण्यक नावाचा उंदीर माझा परम मित्र आहे. मला प्राणापलिकडे प्रिय आहे.’’ ‘‘जशा आकाशातल्या मेघातून पडणार्या जलधारांची, आकाशातील नक्षत्रांची, पृथ्वीवरील धूलीकणांची ते अपरिमित असल्याने मोजदाद करता येत नाही त्याप्रमाणे हिरण्यकाकडे इतके अगणित गुण आहेत की त्यांची मोजदाद अशक्य आहे. पण काही विशेष कारणानी अत्यंत निराशेपोटी आपल्या स्थानाचा/घराचा त्याग करून आपल्यासोबत रहायला येथे आला आहे.’’
(65)
पर्जन्यस्य यथा धारा यथा च दिवि तारकाः
सिकतारेणवो यद्वत् सङ्ख्यया परिवर्जिताः ।। 65 ।।
गुणाः संख्यापरित्यक्तास्तद्वदस्य महात्मनः।
परं निर्वेद आपन्नः सम्प्राप्तोऽयं तवान्तिकम् ।।66
पावसाच्या जशा धारा । तारका वा नभातल्या
धूलीकण धरेचे वा । जसे येती न मोजता ।। 65 ।।
तैसेच ह्या महात्म्याच्या । सद्गुणां मोजदाद ना
सोडून घर उद्वेगे । आला माझ्या सवे असा ।। 66 ।?
मन्थरक कासव म्हणाले, ‘‘इतका विशाद, इतकी उद्विग्नता यायचं काय कारणं बर?’’
उत्तरादाखल कावळा म्हणाला, ‘‘मी त्याला खूप आग्रह करून विचारलं पण, ह्या विषयावर बोलायला खूप आहे; तिकडे पोचल्यावर मी माझी सारी रामकहाणी तुम्हाला सांगेन असं म्हणत त्याने तो विषय टाळला. ’’
पुन्हा हिरण्यक उंदराकडे बघत लघुपतनक कावळा म्हणाला, ‘‘ मित्रा हिरण्यका! आता तर आपण येथे पोचलो आहोत. आता तरी तू आपल्या खिन्नतेचं कारण आम्हा दोघांना सांगावस असं मला वाटतं. ’’
लघुपतनक कावळ्याने असा आग्रह केल्यावर हिरण्यक सांगू लागला,----
--------------------------------
खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा -
Comments
Post a Comment