4 वणिक्पुत्र कथा
4 वणिक्पुत्र कथा
एका कुठल्याशा नगरात
सागरदत्त नावाचा वाणी रहात होता. त्याच्या मुलाने एकदा शंभर रूपयांना एक पुस्तक विकत
घेतलं; त्यामधे पुढील श्लोक लिहीला होता. तो असा- जी गोष्ट नशिबात आहे, ती गोष्ट मनुष्याला नक्कीच प्राप्त होते. साक्षात ब्रह्मदेवही
ते बदलू शकत नाही. म्हणून कुठली गोष्ट नष्ट झाली तरी मी ना दुःखी होत ना अनायास एखादी
गोष्ट प्राप्त झाली तर आश्चर्याने आनंदित होत. कारण जी गोष्ट आपली असेल ती आपल्याला
खात्रीने मिळेलच. ती दुसर्याला मिळू शकत नाही. आणि जी वस्तू दुसर्यांच्या नशिबात
आहे ती त्यांनाच मिळेल ती आपल्याला मिळू शकत नाही. (113)
प्राप्तव्यमर्थं लभते मनुष्यो
। देवोऽपि
तं लङ्घयितुं
न शक्तः।
तस्मान्न
शोचामि
न विस्मयो
मे, । यदस्मदीयं न हि तत्परेषाम् ॥113 ।।
आहे नशीबी मिळतेच
ते ते । ब्रह्माहि
रोखू न शके तयाते
आश्चर्य
ना दुःख मला सतावे । आहेच माझे नच ते दुजाचे ॥113
..
ते पुस्तक पाहून सागरदत्त
आपल्या मुलाला म्हणाला, ‘‘बाळ! काय किमतीला हे पुस्तक तू विकत घेतलस?’’
तो म्हणाला, ‘‘शंभर रूपयांना.’’
ते ऐकून सागरदत्त म्हणाला, ‘‘हात् मूर्खा
! तू जर एक श्लोक लिहीलेलं पुस्तक शंभर रुपयांना आणत असशील, साध्या इतक्याही व्यवहाराची
तुला अक्कल नसेल तर तझ्या सारखा बेअक्कल व्यापारात नफा काय कमावणार?’’ अशा अनेक प्रकारे त्याचा पाणउतारा करत शेवटी, ‘‘तू
माझ्या घरात पाऊलही टाकू नकोस.’’ म्हणत त्याने मुलाला घराबाहेर हाकलवून दिले.
पित्याच्या निर्भर्त्सनेने व्यथित झालेला तो
मुलगा गाव सोडून दूर निघून गेला. आणि एका लांबच्या गावात जाऊन राहू लागला. काही दिवसांनी
त्या गावच्या कुठल्याशा एका गावकर्यानी त्याला विचारलं, ‘‘आपण कोठून आला? आपलं शुभं नाव काय?’’
उत्तरादाखल तो म्हणाला, ‘‘प्राप्तव्यमर्थं
लभते मनुष्यः। ’’ (ज्याचं जे ‘प्राप्तव्य’ असेल म्हणजे जे मिळणार असेल ते त्याला मिळतं.) काही
दिवसांनी अजून दुसर्या गावकर्याने त्याला तेच विचारल्यावरही त्याने तेच उत्तर दिलं.
अशा प्रकारे त्याला जो कोणी प्रश्न विचारे त्याला तो हेच उत्तर देत राहिल्याने सारे
गावकरी त्याला ‘‘प्राप्तव्य-अर्थ’’ म्हणू लागले आणि काही दिवसातच तो त्याच नावाने त्या गावात
प्रसिद्धही झाला.
एकदा त्या गावची राजकन्या एक दिवस आपल्या मैत्रिणीसोबत
सार्या गावाचं निरीक्षण करत चालली होती.ते निरीक्षण करतााना तिची दृष्टी एका देखण्या
राजबिंड्या राजपुत्रावर पडली. त्याच्यावर मोहित झालेली ती राजकुमारी आपल्या सखीला म्हणाली,
‘‘सखे, कसंही करुन आमच्या दोघांचं मिलन होईल असा प्रयत्न तू करच.’’
ते ऐकल्यावर तिची सखी लगेचच त्या राजकुमारापाशी
गेली आणि त्याला म्हणाली, ‘‘राजकुमारी चंद्रवतीने मला आपल्याकडे निरोप घेऊन पाठवलं
आहे. तिने सांगितलं आहे, ‘‘आपल्याला पाहताच मदनव्यथेने माझी अवस्था अत्यंत बिकट झाली
आहे. आपण तातडीने माझ्यापाशी आला नाही तर मृत्यूला कवटाळण्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर
राहणार नाही.’’
राजकुमारीचा निरोप ऐकून राजकुमार म्हणाला,
‘‘जर मी लकरात लवकर राजकुमारीला भेटणं आवश्यक असेल तर मला तिच्या महालात प्रवेश करता
येईल असा काही उपायही सांग.’’
सखी म्हणाली, ‘‘रात्रीच्यावेळी राजप्रासादाच्या
बाहेर सोडलेला कातड्याचा बनवलेला एक भक्कम दोर लोंबताना दिसेल. त्यावरून चढून आपण राजप्रासादात
यावे.
राजपुत्र म्हणाला, ‘‘जर आपली अशीच इच्छा असेल
तर आपल्या आदेशाचं मी जरूर पालन करीन.’’
राजकुमाराबरोबर भेटण्याचं आश्वासन मिळवून ती
सखी राजकुमारीकडे परत आली.
इकडे रात्र झाल्यावर राजकुमाराने विचार केला की, अशाप्रकारे राजकुमारीसमवेत रात्र घालवणे ही अत्यंत अयोग्य गोष्ट आहे. योग्यच म्हटलं आहे की, गुरुची मुलगी, मित्राची पत्नी, राजाची स्त्री किंवा आपल्या हाताखाली काम करणार्या कमी अधिकाराच्या सेवकाची अथवा नोकराची स्त्री ह्यांच्यासोबत समागम करणारा ब्रह्म-हत्यारा असतो. (114)
गुरोः सुतां मित्रभार्यां स्वामिसेवकगेहिनीम्
।
यो गच्छति पुमाँल्लोके तमाहुर्ब्रह्मघातिनम्
।। 114 ।।
कामेच्छा ठेऊनी जाई । जो गरूच्या मुलीकडे
पत्नीकडेच मित्राच्या । नृपपत्नी कडे तसे ।।
114.1 ।।
स्वामी वा सेवकाच्या जो । जातसे गृहिणीकडे
मानावा ब्रह्महत्यारा । नर तो दुष्टबद्धि रे
।। 114.2 ।।
आणि तसंही ज्या कामामुळे तुमची कीर्ती लयाला
जाईल, अपकीर्ती होईल, उच्च स्थानावरून माणूस पदभ्रष्ट होईल, स्वतःच्या हितकारक मार्गापासून दूर जाईल , ढळेल असं काम करू नये.(115)
अयशः प्राप्यते येन, येन चाऽप्यगतिर्भवेत् ।
स्वार्थाच्च भ्रश्यते येन तत्कर्म न समाचरेत्
।। 115 ।।
बुडे कीर्तीच ज्यायोगे । अपकीर्तीच होतसे
पदभ्रष्टचि होऊनी । पुढे अवनती घडे ।। 115.1
।।
सोडुनी कल्याणमार्गासी । व्यक्ती भरकटे असे
काम काही करावे ना । शाहण्याने कधी असे ।।
115.2 ।
कर्म धर्म संयोगाने त्या
रात्री प्राप्तव्य अर्थ नावाचा तो व्यापार्याचा मुलगा इकडे तिकडे फिरत राजभवनाच्या
जवळ पोचला. राजभवनाच्या खाली लोंबत असलेली ती दोरी पाहून कुतुलाने त्याच्यावरून चढून
जाऊन तो राजप्रासादात वरती जाऊन पोचला. राजकन्येलाही त्याला पाहून हाच राजपुत्र आहे
असे वाटले. मोठ्या निश्चिंतपणे तिने त्याला स्नान, भोजन, पाणी, वस्त्र इत्यादि देऊन
त्याचा सन्मान केला. शेवटी त्याला आपल्या पलंगावर झोपायला सांगून तीही त्याच्यासोबत
झोपली. एकाच पलंगावर झोपल्याने वणिक्पुत्राच्या अंगाचा स्पर्श होऊन तिची काया रोमांचित
झाली. ती म्हणाली, ‘‘आपल्याला पाहता क्षणीच मी आपल्या प्रेमात पडून माझं हृदय आपल्याला
देऊन टाकलं आहे. आता आपल्याला सोडून दुसरा कोणी माझा पती होऊ शकत नाही.--- पण-- इतकं
होऊनही (इतका वेळ मी एकटीच बोलत असूनही) आपण माझ्याशी बोलत का नाही?’’
तो म्हणाला, ‘‘माणसाच्या
नशिबात जे प्राप्तव्य (प्राप्त होणारी गोष्ट) असेल ते त्याला प्राप्त झाल्यावाचून रहात
नाही.’’ ते ऐकताचा हा कोणी दुसराच माणूस आहे हे राजकुमारीला समजून चुकलं. म्हणून राजकुमारीने
त्याला राजप्रासादातून खाली उतरायला लावून घालवून दिलं. राजप्रासादातून बाहेर पडल्यावर
तो एका पडक्या मंदिरात येऊन झोपला.
नेमका काय योगायोग होता
की एक नगर-रक्षक एका व्याभिचारिणी स्त्रीला भेटायला संकेतस्थळी म्हणून नेमका त्याच
मंदिरात आला. प्राप्तव्यअर्थाला त्याच्या आधीच तेथे झोपलेलं पाहून, आपलं दुर्वर्तन
त्याला कळू नये म्हणून त्याने प्राप्तव्यअर्थला विचारलं, आपण कोण आहात?
तो म्हणाला, ‘‘माणसाच्या
नशिबात जे प्राप्तव्य (प्राप्त होणारी गोष्ट) असेल ते त्याला प्राप्त झाल्यावाचून रहात
नाही.’’
ते ऐकून तो सुरक्षारक्षक
म्हणाला, हे स्थान निर्जन आहे. तरी आपण माझ्या घरी जाऊन झोपा.’’
त्यानेही ते मान्य केलं.
अर्धवट झोपेच्या अमलात असल्या कारणाने तो त्याच्या जागेवर झोपायला निघून गेला.
नेमकी त्या सुरक्षा रक्षकाची
नुकतीच वयात आलेली तरूण मुलगी विनयवती एका तरुणाच्या प्रेमात पडून त्याची त्या संकेतस्थळी
वाट बघत झोपली होती. रात्रीच्या दाट काळोखात आपल्या दिशेने येणार्या त्या व्यक्तीला
गैरसमजाने आपलाच प्रियतम मानून ती उठून उभी राहिली. त्याला भोजन, आणि वस्त्रादि देऊन
त्यानंतर तिने त्याच्याशी गांधर्व पद्धतीने विवाहही केला. पुन्हा कामातुर होऊन त्याच्या
सोबत पलंगावर झोपल्यावरही तो अजूनही काही बोलत नाही हे पाहून ती म्हणाली, ‘‘काय झालं?
आपण मनोकळेपणाने माझ्याशी बोलत का नाही?’’
उत्तरादाखल व्यापारीकुमार
म्हणाला, ‘‘माणसाच्या नशिबात जे प्राप्तव्य (प्राप्त होणारी गोष्ट) असेल ते त्याला
प्राप्त झाल्यावाचून रहात नाही.’’
त्याचे ते उत्तर ऐकून
ती मुलगी काळजीत पडली. विचार करू लागली की, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, कोणाचा
सल्ला न घेता केलेल्या कामाचं हे असच फळ मिळतं. पश्चातापाने दुःखी झालेल्या त्या मुलीने व्यापारीपुत्राला आपल्या घरातून घालवून दिलं.
तो तेथून निघून रस्त्यावरून
जात जात शहराच्या हमरस्त्यावर आला असता तेथे, दुसर्या राज्यातल्या कोणी वरकीर्ती नावाच्या
वराची बँडबाजा वाजवत धूमधडाक्यात चाललेली वरात येऊन पोचली. प्राप्तव्यअर्थही त्याच
वरातीत सहभागी होऊन त्या वरातीतल्या लोकांसोबत चालू लागला. मुहूर्त जवळ आला होता. शेटजींच्या
घराच्या जवळच रस्त्याच्या कडेला घातलेल्या विवाहमंडपात विवाहाचा मंगल वेश करून नवरीमुलगी
येऊन बसली. तेवढ्यात एका माजावर आलेल्या हत्तीने
रागाने आपल्या माहुताला ठार मारलं आणि
तो इकडे तिकडे पळू लागला. त्याच्या भीतीने लग्न मंडपात जमलेल्या सगळ्या वर्हाडामधे
भीतीने एकच कोलाहल माजला आणि धावपाळ सुरू झाली. त्या उधळलेल्या हत्तीच्या भयाने सारे
वर्हाडी वरासह कुठेतरी पसार झाले.
हे सर्व पहात भयाने कापत
एकट्याच उभ्या असलेल्या त्या मुलीपाशी जाऊन प्राप्तव्यअर्थ मोठ्या निधड्या छातीने,
तिला धीर देत म्हणाला, ‘‘घाबरु नकोस! मी तुझं रक्षण करीन.’’ त्याने मोठ्या धाडसाने
तिला आपल्या उजव्या हाताने पकडून अत्यंत निर्भयपणे व अत्यंत आवेशाने त्या हत्तीला फटकारताच
माहित नाही कसा काय पण तो हत्ती शांत होऊन तेथून निघून गेला. वरकीर्ती परत आपल्या मित्रपरिवार
आणि आप्तेष्टांसह मंडपात आला तर मुहूर्ताची वेळ टळून गेली होती आणि त्याच्या वधूचा
हात धरून दुसराच कोणी उभा होता. हे पाहून वररुची त्याच्या सासर्यांना म्हणाला, ‘‘सासरेबुवा
तम्ही एकदा मला आपली कन्या देतो असं सांगून दुसर्याला दिली हे योग्य केलं नाही.’’
ते ऐकून सासरेबुवा म्हणाले, ‘‘ जावईबापू हत्तीच्या भीतीने मीही तुमच्यासोबतच पळालो
होतो. तुमच्याच बरोबर परत येत आहे. तोपर्यंत इथे काय घडलं हे मलाही माहित नाही. इतकं
बोलून तो आपल्या कन्येला दोष देऊ लागला. विचारू लागला, ‘‘मुली तू हे बरोबर वागली नाहीस.
इथे काय काय घडलं हे तू मला खरं खरं सांग.’’
मुलगी म्हणाली, ‘‘ह्या
व्यक्तीने मला मृत्यूपासून वाचवलं आहे. त्यामुळे मी जिवंत असेपर्यंत ह्या व्यक्तिखेरीज
दुसरा कोणीही माझं पाणिग्रहण करू शकत नाही.’’
अशा उलटसुलट आरोप प्रत्यारोपांमधे
पूर्ण रात्र तिथेच निघून गेली. दुसर्या दिवशी सकाळी तिथे गर्दी जमा झालेली पाहून,
तेथील गोंधळ एकून आणि हमरीतुमरी वर आलेला जनसमुदाय पाहून राजपुत्रीही तेथे आली. कानावर
आलेल्या वादविवादाची वार्ता ऐकून ती नगररक्षकाची कन्याही तेथे आली. बराच मोठा लोकसमुदाय
गोळा झाला आहे आणि त्यांच्यात बाचाबाची चालू आहे हे कानावर येताच राजाही तेथे येऊन
दाखल झाला. राजाने प्राप्तव्यअर्थला सांगितले, ‘‘ निर्भय होऊन काय घडलं तो वृत्तांत
मला सांग.’’
प्राप्तव्यअर्थ उत्तरादाखल
बोलला, ‘‘माणसाच्या नशिबात जे प्राप्तव्य (प्राप्त होणारी गोष्ट) असेल ते त्याला प्राप्त
झाल्यावाचून रहात नाही.’’
राजकन्याही तिच्याकडे
रात्री घडलेली घटना आठवत म्हणाली, ‘‘देव सुद्धा ते टाळू शकत नाहीत.’’ त्यावर नगररक्षकाची
मुलगी म्हणाली, ‘‘म्हणून मी हातून निसटून गेलेल्या गोष्टीबद्दल ना शोक करते ना अचानक
प्राप्त झालेल्या गोष्टीने आश्चर्यचकित होते.’’
वरची संपूर्ण घटना ऐकल्यावर ती व्यापारी कन्या म्हणाली, ‘‘ जी गोष्ट माझी आहे ती दुसर्याची
होऊ शकत नाही.’’
राजाने त्या तिन्हीही
मुलींना बोलावून प्रत्येकीची स्वतंत्र चौकशी केली. सर्व वृत्तांत नीट जाणून घेतला.
आणि त्यानंतर आपल्या कन्येला अभय देत तिचं अत्यंत आदरपूर्वक प्राप्तव्यअर्थला सालंकृत
कन्यादान केलं. त्याला एक हजार गावही इनाम दिली आणि अत्यंत ऋजु शब्दात त्याला म्हटलं,
‘‘आजपासून तू माझा मुलगा झालास. सर्वांना माहित झालेल्या त्या व्यापारीपुत्राचा युवराज
पदावर राजाने अभिषेकही केला. नगरसुरक्षाअधिकार्याने यथाशक्ती वस्त्रालंकार देऊन सत्कार
करून आपली मुलगी त्याला अर्पण केली.
त्या कन्यांसोबत विवाह
केल्यावर आपल्या मातापित्यांना आपल्या समस्त कुटुंबियांसहित बोलावून घेतलं. तोही आपल्या
सर्व परिवारासह सर्व वैभवाचा उपभोग घेत आनंदाने तेथे राहू लागला.
वरील गोष्ट समाप्त करत
हिरण्यक उंदीर म्हणाला, ‘‘ म्हणून म्हणतो, ‘‘ प्राप्तव्यमर्थं लभते मनुष्यः !’’ माणसाला
जे प्राप्त होणार असेल ते माणूस प्राप्त करतोच!’’
‘‘तर मी स्वतः ही सर्व
सुखदुःख भोगली आहेत. त्यामुळेच नंतर मला सुखदु;ख ह्याविषयी समभाव निर्माण होऊन माझ्या
ह्या मित्रासोबत(लघुपतनक कावळ्यसोबत त्याच्या पाठीवर बसून) आपल्या सर्वांपाशी आलो आहे.
माझ्या वैराग्याचं हेच कारण आहे.
मंथरक कासव म्हणाले,
दोस्ता! हा (लघुपतन कावळा) तुझा खरोखरच जिवलग मित्र आहे ह्यात संदेह राहिला नाही. सर्व
रस्त्यात तू त्याच्याच भरवशावर असतानाही त्याने तुला दगा दिला नाही. भुकेने कासावीस
झाल्यावरही तू त्याचं भक्ष्य असूनही तुला खाल्लं नाही. इतकच नाही तर तो तुला पाठीवर
बसवून येथपर्यंत सुरक्षित घेऊन आला. म्हटलच आहे, मित्राचं धन, ऐश्वर्य पाहून ज्याच्या मनात असूया, हेवा,
मत्सर उत्पन्न होत नाहीत तोच खरा जिवलग मित्र! अशा मित्रांना कायम जोडून ठेवावं.(116)
विकारं याति नो चित्तं वित्ते यस्य कदाचन ।
मित्रं स्यात्सर्वकाले च
कारयेन्मित्रमुत्तमम् ।। 116 ।।
पाहूनी धन मित्राचे । ज्याची ना फिरते
मती
तो सदा सर्वदा योग्य । सवे त्या मित्रता खरी/करी ।। 116 ।।
जसे तज्ज्ञ विद्वान होमाग्नीची योग्यरीतीने तपासणी करतात, परीक्षा
करतात त्याप्रमाणे काही योग्य चिह्ने पाहून मित्रही तपासून घ्यायला हवेत. (117)
विद्वद्भिः सुहृदामत्र चिह्नैरेतैरसंशयम् ।
परीक्षाकरणं प्रोक्तं होमाग्नेरिवपण्डितैः ।।
117 ।।
होमाग्नीची परीक्षा ती । विद्वान करती
जशी
तैसेच पारखावे ते । मित्राचे गुण सर्वही/
गुण दोषही ।। 117 ।।
त्याचप्रमाणे जो संकटात
मैत्री तेवढीच दृढ ठेवतो, पूर्वीप्रमाणेच आपली स्नेहार्द्र वागणूक ठेवतो; त्याच्यात
बदल होऊ देत नाही तोच खरा मित्र होय! उत्कर्षाच्या, भरभराटीच्या काळी तर अपात्र खल
व्यक्तीही मित्र होऊन राहतात. (118)
आपत्काले तु सम्प्राप्ते यन्मित्रं मित्रमेव
तत् ।
वृद्धिकाले तु सम्प्राप्ते दुर्जनोऽपि
सुहृद्भवेत् ।। 118 ।।
संकटात निभावे जो । मित्र कर्तव्य उत्तम
तो मित्र ह्याच संज्ञेसी । असे पात्र
खरोखर ।। 118.1 ।।
एरवी धन ऐश्वर्या । पाहुनी दुष्टबुद्धिही
होती उत्सुक मैत्रीसी । मैत्री ती ना
खरी कधी ।। 118.2 ।।
आज ह्या लघुपतनक कावळ्याच्या
अशा वागण्याने (हिरण्यक कावळ्याला पाठीवर बसवून घेऊन येण्याने) माझा ह्या लघुपतनकावरील
विश्वास अजून दृढ झाला आहे. कारण मांसभक्षी कावळा आणि जलचरांची ही मैत्री नितीनियमला धरून नाही. असही म्हटलं आहे, कोणी कोणाचा मित्र नाही आणि कोणी कोणाचा कायमचा शत्रूही
नाही. एखादं ठरवलेलं काम सिद्धीला जातं का त्याचा सत्यानाश होतो ह्यावरूनच मित्र वा
शत्रूची परीक्षा होते. ( कामात मदत करणारा मित्र ठरतो तर मोडता घालणारा शत्रू!)
(119)
मित्रं कोऽपि न कस्याऽपि नितान्तं न
च वैरकृत् ।
दृश्यते मित्रविध्वस्तात्कार्याद्वैरी
परीक्षितः ।। 119 ।।
कुणाचा मित्र ना कोणी । कुणाचा रिपु
ना कुणी
तडीस कार्य जाते वा । बिघडे वा मधेचही
।। 119.1 ।।
परीक्षा हीच मैत्रीची । शत्रुत्वाची
तशीच ती
भल्याबुर्याच कामाने । ठरे मित्र नि
शत्रुही ।। 119.2 ।।
अशा प्रकारे मन्थरक कासव
हिरण्यक उंदराचं स्वागत करत अजून म्हणाले, आपलं स्वागत असो! आपण ह्या तलावाच्या काठी
आपल्या घराप्रमाणे राहू शकाल. आपल्या धनाचा जो विनाश झाला आहे, आणि (स्वदेश सोडून)
जो प्रवास आपल्याला करायला लागला आहे त्याबद्दल आता आपण फार विचार करून दुःखी होऊ नका.
म्हटलच आहे, निरभ्र
आकाशात आलेल्या एखाद्या छोट्याशा ढगाची सावली असो वा एकाद्या कजाग माणसाने वरवर दाखवलेलं
प्रेम व मैत्री असो; शिजवलेलं अन्न असो वा सुनारी (सुंदर स्त्री) सहवास असो; देहाचं
तारुण्य असो वा धनसम्पत्तीचा उपभोग असो! ह्या सर्व गोष्टी अल्पकाळ सौख्य देणार्या
असतात. (120)
अभ्रच्छाया खलप्रीतिः सिद्धमन्नं च
योषितः
किञ्चित्कालोपभोग्यानि यौवनानि धनानि
च ।। 120 ।।
मेघांची सावली जैसी । खलांचा पुळका जसा
रांधले अन्न ते जैसे । जैसा स्त्री
सहवास वा ।। 120.1।।
जसे तारुण्य देहीचे । धन-सौख्य जसेचि
वा
अल्पकाळ टिके सारे ।
नित्य ना दे प्रसन्नता ।। 120.2 ।।
मंथरक (कासव) म्हणाला, म्हणून स्वतःच्या मनावर ताबा
मिळवलेल्या शहाण्या विवेकी माणसाने धनाचा लोभ धरू नये. धनाबद्दल कुठलीही आस्था दाखवू
नये. म्हटलच आहे, अहोरात्र कष्ट करून साठवलेले(सुसञ्चित), प्राणापलीकडे जपलेले, फक्त शरीराचे भरणपोषण होण्यापुरतेच
जे वापरले गेले असे प्रचंड धन असूनही माणसाचे काहीही कल्याण करत नाही. सरते शेवटी जेव्हा
माणूस परलोकी जायला निघतो तेव्हा आपल्या प्राणापलिकडे जपलेले हे धन तुमच्याबद्दल जराही
अनुकंपा, करुणा दाखवत नाही. अत्यंत आढ्यतेने नुसतं पडून राहतं. इतकच काय तुमच्यासोबत
सहानुभूतीची पाच पावलंही चालत नाही. (121)
इंद्रवंशा गण- ( अक्षरे- 12 . गण- त
त ज र )
सुसञ्चितैर्जीवनवत्सुरक्षितै-
र्निजेऽपि देहे न नियोजितैः क्वचित्
।
पुंसो यमान्तं व्रजतोऽपि निष्ठुरै-
रेतैर्धनैः पञ्चपदी न दीयते ।। 121
साठा धनाचा सुखरूप ठेविला
स्वप्राण ऐसे जपले सदोदिता ।
जे खर्चिले अल्प स्वदेह पोषणा
केला न त्याचा विनियोग चांगला।।
121.1 ।।
जाता तनूला नर हाच सोडुनी
ना पाझरे निष्ठुर वित्त हे कधी
ना पावले चालत पाच त्या सवे
कारुण्य त्यासी नच लेशमात्र ते ।।
121.2 ।।
कल्याण कैसेच घडेल ह्या धने
जे ना हिताचे उपयोगशून्य जे ।।
121.3 ।।
जसा एखादा मांसाचा तुकडा
पाण्यात पडला तर त्याला खायला माशांचा थवा तुटून पडतो; जर जमिनीवर असेल तर सारे मांसभक्षी
प्राणी त्यावर ताव मारतात; आकाशात असेल तर सगळे पक्षी तो हस्तगत करण्यासाठी एकच हल्ला
करतात त्याप्रमाणे धनाढ्य माणसाचं धन हस्तगत करण्यासाठी व्यवस्थित नियोजन करून सगळीकडेच
लोक टपून बसलेले असतात.(122)
यथामिषं जले मत्स्यैर्भक्ष्यते श्वापदैर्भुवि
।
आकाशे पक्षिभिश्चैव तथा सर्वत्र वित्तवान्
।। 122
तुटून पडती जैसे । मासे मांसावरी जळी
जसे भूवर प्राणी ते । ओरबाडति मांसची
।। 122.1 ।।
नभीचे वा असो पक्षी । मांसखंडा न सोडती
धनाढ्यास तसे सारे । लुटती सर्व ह्या
जगी ।। 122.2 ।।
इतकच कशाला! एखादा धनिक पूर्ण निर्दोष जरी असला
तरी राजा (त्याला ह्या ना त्या प्रसंगात अडकवून त्याच्याकडून पैसे उकळण्याच्या मिषाने)
दोषी ठरवतो. त्याउलट निर्धन व्यक्ती दोषी असला तरी ( त्याच्याकडून कुठल्याही लाभाची
शक्यता नसल्याने वा कुठल्याही कामात त्याच्यामुळे मदत वा अडसर होण्याची शक्यता नसल्याने)
उपद्रवरहीत असल्याने मजेत जगत राहतो. (123)
निर्दोषमपि वित्ताढ्यं दोषैर्योजयते
नृपः ।
निर्धनं प्राप्तदोषोऽपि सर्वत्र निरुपद्रवः
।। 123 ।।
धनाढ्यावरती नाना । राजा आरोप ते करी
निर्दोष असुनीही तो । काढी दोष तयातची ।।
123.1 ।।
परी निर्धन व्यक्तीच्या । अंगी दोष असूनही
आनंद घेत राही तो । ठरुनी निरुपद्रवी ।। 123.2 ।।
एकतर धन मिळविण्यासाठी खूप सारे कष्ट करावे
लागतात. तितकेच कष्ट त्या धनाचं रक्षण करण्यासाठी करावे लागतात.एवढं करून ते धन जर
कुणी लुटून नेलं तर दुःखच दुःख पदरी येतं. आणि खर्च करावं तरी ते संपेल ही भीती असतेच. मंथरक म्हणाला, म्हणून म्हणतो,
ज्या धनाला नितांत कष्टांनी घेरलं आहे, त्या धनाचा मी त्रिवार धिक्कार करतो! (124)
अर्थानामर्जने दुःखमर्जितानां च रक्षणे
।
नाशे दुःखं व्यये दुःखं धिगर्थान् कष्टसंश्रयान्
।। 124 ।।
कष्टाने मिळतो पैसा । कष्ट सांभाळण्यास त्या
नष्ट होता मना होई । शोक, नैराश्य वेदना
।। 124.1 ।।
संपेल खर्चुनी सारा । वाटून दुखवी मना
सम्पत्तीचाच त्या मोठ्या । असो धिक्कार
सर्वथा ।। 124.2 ।।
अहो जेवढे परिश्रम हे
धनलोभी महामूर्ख लोक पैशाच्या मागे लागून करतात, त्याच्या एक शतांश परिश्रम जरी त्यांनी
मोक्ष मिळविण्यासाठी घेतले तर त्यांना मोक्ष सुद्धा मिळेल. (मोक्ष मिळवणं ही अत्यंत
कष्टसाध्य गोष्ट आहे. त्यामुळे कायमचा परमानंद मिळतो पण त्याही पेक्षा जास्त कष्ट लोक
धनप्राप्तीसाठी घेतात ज्या धनप्राप्तीने काहीकाळच सुख मिळत ज्याच्या सोबत दुःखही भोगावं
लागतं. ) (125)
अर्थार्थी यानि कष्टानि मूढोऽयं सहते
जनः ।
शतांशेनाऽपि मोक्षार्थी तानि चेन्मोक्षमाप्नुयात्
।। 125 ।।
पैशाच्या लागुनी मागे । वेडे ते झिजती किती
शतांश कष्ट त्याच्याची । करीता मोक्ष ये करी
/
किती उपसती कष्ट । धनवेडे धनास्तव
त्याच्या शतांश कष्टाने । मोक्ष येईल चालुन
।। 125 ।।
(मन्थरक कासव लघुपतनक ह्या कावळ्यासोबत दूर
देशाहून आलेल्या हिरण्यक नावाच्या उंदराला
अजून म्हणाला,) दुसरं म्हणजे, परदेशात राहण्यात काय स्वारस्य
आहे? विदेशात राहणं निरर्थक आहे तेथे कोणत्या आपत्ती येतील, कुठल्या संकटाला,
दुःखाला तोंड द्यावं लागेल असा विचार तू करू नकोस कारण,
जसा वनतील सिंह फक्त त्याच्या कराल दाढा, तीक्ष्ण नख्या, आणि शेपूट
ह्यांच्या तडाख्याच्या आधारावर म्हणजेच स्वपराक्रमाच्या जोरावर हत्तीसारख्या (विशालकाय
प्राण्यालाही) मारून त्याच्या रक्तावर आपली तृष्णा शमवतो; आणि (अपरिचित असलेल्या) जंगलाला
सुद्धा आपलं घर बनवतो त्याप्रमाणे, दृढनिश्चयी, धैर्यशाली लोकांना कुठला आपला देश आणि
कुठला परदेश! ते जेथे जातील तेथे आपल्या बाहुबलाच्या जोरावर, आपल्या (बुद्धीच्या ताकदीवर)
पराक्रमाचा अवलंब करून त्याला आपला देश बनवितात. (126)
( वृत्तविशेष – शार्दूलविक्रीडित )
को धीरस्य मनस्विनः स्वविषयः, को वा
विदेशः स्मृतो,
यं देशं श्रयते तमेव कुरुते बाहुप्रतापार्जितम्
।
यद्दंष्ट्रानखलाङ्गुलप्रहरणः सिंहो
वनं गाहते ,
तस्मिन्नेव हतद्विपेन्द्ररुधिरैस्तृष्णां छिनत्त्यात्मनः ।। 126
( मनस्विन् – चतुर, बुद्धिमान,
प्रज्ञावान, मोठ्यामनाचा, दृढनिश्चयी. धीर – सहसी धैर्यवान, सुदृढ, स्वस्थचित्त.
स्वविषयः – स्वदेश. )
चित्ती धर्य अतुल्य, साहस जया, प्रज्ञा
प्रकाशे अती
त्यांसी देश विदेश भेद असला येई कधी ना मनी ।
ज्या देशात निवास तेचि करती तो
स्वप्रभावातुनी
घेती ते करुनी अधीन स्वबळे, चिंता न
त्यांच्या मनी ।। 1126.1 ।।
जैसा सिंह नख्या, सुळेचि जबडा वा शेपटीच्या
बळे
सारे रान गृहासमा समजतो; त्याच्याच
शौर्यामुळे
मारूनी गजराज थोर वनिचा रक्तावरी त्याचिया
तृष्णा तो शमवी; असेच नृप मी हा आत्मविश्वास त्या ।। 126.2 ।।
मन्थरक कासव हिरण्यक उंदराला उद्देशून
अजून म्हणालं, एखादा बुद्धिमान माणूस आपल्या गरिबीमुळे, घरच्या दारिद्र्यामुळे परदेशात गेला तरी तो
कधीही दुःखी होत नाही. निराश होत नाही कारण, जो सक्षम आहे, प्रचंड काम करण्यास समर्थ आहे त्याला कामाचा
बोजा कसा वाटेल? जो व्यापार-उदीम ह्याच्या निमित्ताने कायमच दूर दूरच्या देशामधे फिरत
असतो त्याला कुठे दूर जाण्याचं भय कस वाटेल? जो अनेक विद्यांमध्ये पारंगत असतो ( असा
कुशल माणूस सर्वांनाच हवा असल्याने सर्वच जण त्याला आगत्याने बोलवत राहतात) त्याला
परदेश कुठला? आणि ज्याची वाणी मिठ्ठास असते, सर्वांच्याच मनाला सुखावणारी असते त्याला
सर्वचजण आपलं मानतात. अशा माणसाला कोणी परका मानत नाहीत आणि तोहि कोणाला परका समजत
नाही.(127)
कोऽति भारः समर्थानां किं दूरं व्यवसायिनाम्
।
को विदेशः सविद्यानां कः परः प्रियवादिनाम्
।।127
वाटे न सक्षमा बोजा । व्यापार्या दूर गाव ना
परदेश न विद्वाना । गोडबोले न त्या
दुजा ।। 127 ।।
मंथरक हिरण्यकाला अजून
म्हणाला, ‘‘आपल्याकडे तर बुद्धीचा खजिनाच आहे. आपण प्रज्ञानिधी आहात. आपण सर्वसाधारण
माणसांच्या तुलनेचे नाही. आपल्याला अजून काय समजाऊन सांगणार? असं म्हटलच आहे की, ज्याच्या जवळ आळस नावाला देखील नसतो,
अशा उत्साही, कार्यकुशल, सर्व व्यसनांपासून दूर राहणार्या (आपल्या कार्यकुशलतेमुळे
) संकटात न सापडणार्या, शूर, कृतज्ञ आणि चांगल्या मित्रांच्या संगतीत राहणार्या थोर
पुरुषाच्या जवळ राहण्याच्या उद्देशाने लक्ष्मी स्वतःच त्याला शोधत असते (128)
उत्साहसम्पन्नमदीर्घसूत्रं क्रिया विधिज्ञं
व्यसनेष्वसक्तम् ।
शूरं कृतज्ञं दृढ सौहृदञ्च । लक्ष्मीः
स्वयं मार्गति वासहेतोः ।। 128 ।।
( व्यसन - हानी, विनाश, पराजय,
दोष, विपत्ती, संकटे. असक्त - )
चैतन्यमूर्ती करि काम वेगे । कामात
निष्णातचि मेख जाणे
ना संकटांनी कधि धीर सोडे । ना तो खचे
कष्ट पराभवाने ।। 128.1 ।।
तो धैर्यमूर्ती अति नम्र वागे । मैत्रीत
ना खोट, सुमित्र जोडे
लक्ष्मी स्वतः शोधित ये नरा ह्या ।
निवास त्याच्या जवळी कराया ।। 128.2 ।।
दुसरं म्हणजे हे ही लक्षात
घ्यायला पाहिजे की कधी कधी कमावलेलं धनही आपल्या
दुर्दैवामुळे नष्ट होतं. आपले इतकेच दिवस सुखाचे होते. आपल्या भाग्यात जर नसेलच तर
आपल्याला एक क्षणभरही सुखाचा उपभोग घेता येत नाही. दैवच रुसलं तर हातात पैसेच येत नाहीत.
आणि समजा यदाकदाचित यगायोगाने आलेच तर दैव तेही हातचे धन काढून घेते.
मंथरक म्हणाला, भाग्यात नसेल तर माणूस एकवेळ काही धन
मिळवूही शकतो पण तो त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. जसा सोमिलक नावाचा विणकर पुष्कळ पैसे
मिळवून सुद्धा त्याच्या भाग्यात नसल्याने जंगलात पोचताच त्याचे सर्व पैसे गमावून बसे.(129)
अर्थस्योपार्जनं कृत्वा नैव भोगं समश्नुते
।
अरण्यं महदासाद्य मूढः सोमलिका यथा
।। 129 ।।
जरी ना नशिबी पैसा। तरी तो मिळुनी नरा
उपभोगचि त्याचा तो । घेऊ ना शकतो जरा
।। 129.1 ।।
द्रव्योपार्जन जैसे का । करता बहु कष्टाने
जाई सोमिलकाचे ते । प्रवेशता वनामधे
।। 129.2 ।।
मंथरक कासवाचे ते बोलणे
ऐकून हिरण्यक उंदराने विचारले ते कसे काय?
त्यावर मंथरकाने पुढील
गोष्ट सांगायला सुरवात केली.---------
-------------------------------
ज्येष्ठ शु. दशमी गंगा दशहरा समाप्ती. 5 जून
2025
--------------------------
खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा-
मित्रसम्प्राप्ती तंत्राची समाप्ती
Comments
Post a Comment