5 मन्दभाग्य सोमिलक कथा

 

5 मन्दभाग्य सोमिलक कथा

कुठल्याशा एका नगरीत सोमिलक नावाचा एक विणकर रहात होता. तो अनेक प्रकारची, अनेक रंगांची, नक्षीदार,चित्रांची ( बुट्टे व काठा पदरांची) विविध प्रकारची सुंदर, राजेरजवाड्यांना शोभतील अशी उंची रेशमी वस्त्रे बनवित असे. पण तर्‍हतर्‍हेची सुंदर सुंदर रेशमी वस्त्रे विणण्यात इतका कुशल असूनही त्याला कसेबसे पोटापाण्यापुरते पैसे सुटत/मिळत. त्याच्या उलट जे सर्वसामान्य विणकर होते ते जाडीभरडी सामान्य प्रतीची वस्त्रं विणूनही सोमिलिकाहून जास्त धनसम्पन्न होते. त्यांच्याकडे पाहून एकदिवस सोमिलक आपल्या पत्नीला म्हणाला, ‘‘प्रिये, ज्यात काही कौशल्,कलाकुसर नाही अशी जाडीभरडी वस्त्र विणूनही हे बाकीचे विणकर बघ कसे बक्कळ पैसे कमावून आहेत बघ किती श्रीमंत झाले आहेत. मला ही जागा मी राहण्यायोग्य वाटत नाही. तर पैसे कमावण्यासाठी मी दुसरीकडे कुठेतरी जाईन म्हणतो.’’

ती म्हणाली, ‘‘प्रियतम! दुसरीकडे जाऊन पैसे मिळतात आणि आपल्या इथे स्वगृही राहून मिळत नाही हा सगळा बकवास आहे. ह्या बडबडीला काही अर्थ नाही. म्हटलच आहे की, माणूस भले आकाशात उडत जावो वा पाताळात शिरो वा पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत वणवण करो; जी गोष्ट माणसाच्या भाग्यात नसते ती काहीही केल्या त्याला मिळत नाही.(130)

उत्पतन्ति यदाकाशे निपन्तन्ति महीतले ।

धरण्यन्तमपि प्राप्ता नादत्तमुपतिष्ठति ।। 130 ।।

आकाशात उडो कोणी । पाताळात शिरोचि वा

पालथी घालु दे पृथ्वी । नसे दैवी मिळे न त्या ।। 130 ।।

त्याचप्रमाणे जी गोष्ट माणसाच्या भाग्यात नसते ती त्याला कितीही प्रयत्न केले तरी काही केल्या मिळत नाही. आणि जर भाग्यात असेलच तर प्रयत्न न करताही मिळते.  आणि जर माणसाच्या भाग्यातच नसेल तर हातात आलेलीही गोष्ट सहज निसटून जाते वा नष्ट पावते. (131)

(आर्या, मात्रा 1,3 चरण 12; चरण 3- 18; चरण 4- 15)

न हि भवति यन्न भाव्यं भवति च भाव्यं विनाऽपि यत्नेन ।

करतलगतमपि नश्यति यस्य तु भवितव्यता नाऽस्ति ।। 131 ।।

नसे दैवात जे जे ; ते प्रयत्नेही न मिळते त्यासी

हाती येउन जाई, परि ना लाभे अभाग्यासी ।। 131 ।।

सोमिलकाची पत्नी पुढे म्हणाली, ज्याप्रमाणे हजारो गायींच्या कळपातून वासरू बरोबर आपल्या आईला हुडकून काढतं आणि तिच्या मागे मागे चालायला लागतं त्याप्रमाणे माणसाचं पूर्वजन्मीचं कर्म त्याला शोधत बरोबर त्याच्यापाशी पोचून,  त्याचं भाग्य बनून त्याच्या मागे मागे जात राहतं.(132)

यथा धेनुसहस्रेषु वत्सो विन्दति मातरम् ।

तथा पुराकृतं कर्म कर्तारमनुगच्छति ।।132

सहस्रावधि गायींच्या । कळपातचि वासरू

जसे मातेस शोधूनी । लागे मागे तिच्या फिरू ।।

तसेचि पूर्वजन्मीचे । कर्म ते भाग्य होउनी

जाई जेथेच कर्ता तो । तेथे तेथेच मागुती ।। 132

सोमलिकाची पत्नी त्याला म्हणाली, तुम्ही जसं वागाल तसं तुमचं प्राक्तन वागत राहतं. मनुष्य झोपला तर तेही झोपतं. तो काही कार्य करू लागला तर तेही कर्म करण्यासाठी प्रवृत्त होतं. तो जसा वागेल, बोलेल, चालेल त्याप्रमाणे ते त्याच्या मागे मागे करत राहतं. वागत, बोलत चालत राहतं. (133)

शेते सह शयानेन । गच्छन्तमनुगच्छति ।

नराणां प्राक्तनं कर्म । तिष्ठत्यथ सहात्मना ।। 133 ।।

झोपता झोपते भाग्य । चालता तेहि चालते

कर्म जे पूर्व जन्मीचे । ते नरा नच सोडते ।। 133 ।।

अहो! जसा प्रकाश आणि सावली हे सतत एकमेकांसोबतच असतात, त्यांना एकमेकांपासून दूर करता येत नाही त्याप्रमाणे माणसाचं प्रारब्ध आणि माणसाचं आयुष्य एकमेकांपासून वेगवेगळे करता येत नाहीत. कर्ता आणि कर्म एकमेकांना कायमचे जोडले गेलेले असतात. संलग्न असतात. त्यांचं अस्तित्त्व एकमेकांच्या अस्तित्त्वावर अवलंबून असते.(134)

यथा छायातपौ नित्यं । सुसम्बद्धौ परस्परम् ।

एवं कर्म च कर्ता च । संश्लिष्टावितरेतरम् ।। 134

प्रकाश सावली राहे । एकमेकासवे जसे ।

तसे कर्म मनुष्याचे । नित्य सोबत राहते ।। 134

‘‘म्हणून म्हणते इथेच तुझ्या व्यवसायात पूर्णपणे झोकून देऊन झटून काम करत रहा.’’  असं विणकर सोमिलकाची पत्नी त्याला म्हनाली

विणकर म्हणाला, ‘‘प्रिये! तू म्हणतेस ते काही बरोबर नाही. कारण परिश्रम केले नाहीत तर यथायोग्य फळही मिळत नाही. ज्याप्रमाणे एका हाताने टाळी वाजत नाही; त्याप्रमाणे नुसतं भाग्यात आहे म्हणूनही चालत नाही. योग्य प्रकारे मेहनत, कष्ट घेतले नाहीत तर कामाचं फळ कस मिळेल’’? (135)

यथैकेन न हस्तेन तालिका सम्प्रपद्यते ।

तथोद्यमपरित्यक्तं न फलं कर्मणः स्मृतम् ।। 135 ।।

जशी एकाच हाताने । टाळी का वाजते कधी

प्रयत्नावीण तैसेची । फळ लाभेल का कधी ।। 135 ।।

  आता हेच बघ नं, अगदी दैवानी भूक लागताक्षणीच योग्यवेळी सुग्रास भोजन समोर आलं तरी ते सुद्धा हात उचलून, हातात धरून, तोंडात घालावं लागतं. आपल्या आप काही ते तोंडात जात नाही.(136)

पश्य कर्मवशात् प्राप्तं भोज्यकालेऽपि भोजनम्

हस्तोद्यमं विना वक्त्रं प्रविशेन्न कथञ्चन ।। 136 ।।

दैवे जे लाभले अन्न । भोजना समयी कुणी

मुखी न घालिता हाते । जातसे ना स्वतः मुखी ।।136 ।।

शिवाय, परिश्रमी माणूस मोठ्या चिकाटीने काम करतो. अशा माणसालाच लक्ष्मी आपणहून वरते. त्याच्याच गळ्यात वरमाला घालते. जे दैववादी आळशी असतात ते मात्र दरवेळी माझं नशीब! ---नशीबानं मला हे द्यावं, ते द्यावं----, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं काहितरी बोलत राहतात. आपल्या दैवावर वा दुर्दैवावर विसंबून राहण्यापेक्षा वा त्याला दूषणं देत बसण्यापेक्षा दैवावर भरवसा  ठेवता  आपली सर्व शक्ती एकवटून  पुरुषार्थ करावा. त्यानंतरही योग्य फळ मिळालं नाही तर आपल्याला हे फळ का मिळालं नाही, आपल्यात काय दोष राहून गेले, कोठे आपण कमी पडलो ह्याची योग्यप्रकारे चिकित्सा करावी, विश्लेषण करावं. निराश होता, स्वतःच स्वतःवर अक्षमतेचा, अयोग्यतेचा छाप मारता वा दुसर्‍या कोणाच्या माथी विफल होण्याचा आरोप करता, परत उत्साहाने निर्दोषपणे ते काम करायचा पूर्ण प्रयत्न करावा.(ह्या श्लोकातील शेवटच्या चरणाचा असा व्यापक अर्थ आहे. सर्वप्रयत्न केल्यावरही अपयश आलं तर त्यात काय दोष ?असा पराभूत विचार नाही.) (137 )

उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः ।

दैवेन देयमिति कापुरुषाः वदन्ति ।

दैवं निहत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या,

यत्ने कृते यदि न सिद्ध्यति कोऽत्र दोषः ।। 137 ।।

 

उद्योगशील पुरुषास बघून लक्ष्मी

घाले गळ्यात वरमाळ स्वतःहुनी ती

‘‘दुर्दैव ते मम!’’ गमे नित आळशाला

निर्धार युक्त नर तो नमवीच दैवा ।।137.1

 

झाले न साध्य अभियान करून कष्ट

कोठेच दोष उरला बघणेच प्राप्त

द्यावे न दूषण स्वतःस न हो निराश

अंतापर्यंत करणेचि प्रयत्न श्रेष्ठ ।। 137.2

सोमिलक परत आपल्या पत्नीला उद्देशून म्हणाला, बाई ग! नुसते कल्पनांचे इमले मनात बांधून आपलं ठरवलेलं काम पूर्ण होत नाही. कुठलंही काम तडीस जावं असं वाटत असेल तर मनात केलेल्या संकल्पाला कठोर परिश्रमांची जोड द्यावी लागते. सिंह कितीही पराक्रमी, चपळ असला तरी त्याला त्याचा पराक्रम सिद्ध करून दाखवावा लागतो. नुसत्या लोळत पडलेल्या वा आळशासारख्या झोपलेल्या सिंहाच्या जबड्यात हा जंगलचा राजा आहे, त्याला भूक लागली असेल म्हणून कोणी प्राणी स्वतःहून आपली मान घालत नाहीत.(138)

उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।

न हि सुप्तस्य सिहस्य प्रविशन्ति मखे मृगाः ।। 138 ।।

स्वप्नांच्या इमल्यांनी ना । पूर्णत्वा कार्य जातसे

जाती तडीस ती कामे । फक्त घोर परिश्रमे

झोपला सिंह पाहूनी । त्याच्याच जबड्यामधे

कोणी प्राणी स्वतःहूनी । का शिरेल कधी बरे?।। 138 ।।

सोमिलक अजून म्हणाला, हे राजा! परिश्रम हे करावेच लागतात. घोर मेहनतीनंतरच आपल्या मनातली स्वप्न, कल्पना साकार होतात. भित्रे, नेभळट , भ्याड लोकं खटपट, धडपड, प्रयत्न करताच ‘‘जे काय भविष्यात लिहून ठेवलेलं आहे तेच होत राहतं. तेच होईल.’’ अशी दैवावर हवाला ठेवलेली पोकळ हवालदील भाषा बरळत राहतात.(139)

उद्यमेन विना राजन् ! न सिद्ध्यन्ति मनोरथाः ।

कातरा इति जल्पन्ति ‘‘ यद् भाव्यं तद् भविष्यति ’’।। 139 ।।

परिश्रमा विना कैसी । कामे होतील पूर्ण ती?

‘‘ मिळेल नशिबी तेची’’ । बोले भेकड तो जनी ।। 139 ।।

म्हणून म्हणतो, माणसाने प्रयत्नांची शिकस्त करून आपली सर्व ताकद पणाला लावून आपली योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्नात कुठलीही कसर सोडता कामा नये. इतकं करूनही त्याला हवं तसं यश त्याच्या पदरात पडलं नाही, त्याचं अभियान पूर्णत्वास गेलं नाही तर (कुठल्याही प्रकारे स्वतःस वा इतरांना दोष न देता) ह्या वेळेला दैवाने माझ्या कार्यात अडथळा आणला असं समजून (पुन्हा नव्या उत्साहाने त्या योजनेचा पाठपुरावा केला पाहिजे.)(140)

स्वशक्त्या कुर्वतः कर्म न चेत्सिद्धिं प्रयच्छति ।

नोपालभ्यः पुमांस्तत्र दैवान्तरितपौरुषः ।। 140 ।।

करून कार्य नेटाने । यश ना लाभले जरी

द्यावी न दूषणे कोणा । ना मानी आपणा कमी ।। 140.1 ।।

ह्यावेळी साथ दैवाची । नव्हती मजला खरी

समजून पुन्हा त्याने । झटावे सर्वतोपरी ।। 140.2 ।।

सोमिलक पत्नीला म्हणाला,  ------  ‘‘म्हणूनच मी परदेशात नक्की जाईन.’’ मनाने असा कणखर निश्चय करून सोमिलक नावाचा तो विणकर वर्धमान नावाच्या एका नगरीत पोचला. तेथे तीन वर्ष राहून तीनशे सुवर्ण मुद्रांची कमाई करून तो आपल्या गावी यायला निघाला.

तो जंगलातून जात असताना अर्ध्या वाटेवर आला असतानाच भगवान सूर्य अस्ताला गेले. रात्री चोर, लुटारूंच्या त्याचप्रमाणे सिंहादि  हिंस्र श्वापदांच्या भयाने तो जंगलातल्या एका विशाल वटवृक्षावर चढून त्याच्या एका फांदीवर झोपला. रात्री स्वप्नामधे त्याने दोन भयानक पुरूषांना पाहिलं. ते एकमेकात बोलत होते. एकजण दुसर्‍याला म्हणाला, ‘‘हे कर्तृत्त्वा तुला चांगल्या प्रकारे माहित आहे की ह्या सोमिलकाच्या नशिबात भोजन आणि वस्त्र ह्या पलिकडे अधिक धन नशिबात नाही तरी सुद्धा तू ह्याला तीनशे सुवर्णमुद्रा का दिल्यास?’’

त्यावर तो म्हणाला, ‘‘ हे दैवा कष्टाळू माणसाला इतके परिश्रम घेतल्यानंतर त्याचा मोबदला स्वरूप देणं मला भागच आहे. पण त्याच्या भोग्याचा  म्हणजे त्याला काय भोगायला मिळेल ह्याचा निर्णय शेवटी तुझ्या हातात आहे.’’

त्यानंर त्या विणकराला जाग आली. तो आपल्या सुवर्णमुद्रा ठेवलेली चंची उघडून पाहू लागला तर ती पूर्ण रिकामी होती. ती रिकामी चंची पाहून तो स्वतःलाच दूषणे देऊ लागला. ‘‘ अरे! हे काय झालं? मी अत्यंत कष्टाने कमावलेलं धन  असं सहजासहजी नाहीसं झालं? माझे सगळे सगळे कष्ट पाण्यात गेले. आणि मी दरिद्री ते दरिद्रीच राहिलो. आता मी माझ्या पत्नीला, मित्र आणि स्वजनांना तोंड दाखवायच्या लायकीचाही राहिलो नाही.’’ असा विचार करून परत तो त्या वर्धमान नगरीला परत गेला. आणि आता त्याने एक वर्षाच्या आतच पाचशे सुवर्ण मुद्रा कमावल्या आणि परत तो आपल्या गावी जायला निघाला. अर्ध्या रस्त्यात तो जेव्हा त्या वटवृक्षापाशी पोचला तेव्हाच नेमका सूर्यास्तही झाला.

ह्या वेळेला  आपल्या सोन्याच्या नष्ट होण्याच्या भीतीने तो खूप दमला होता तरी विश्रांती साठी थांबला नाही. घरी लवकर पोचायच्या उत्कंठेने चालत राहिला. तेवढ्यात त्याने परत एकदा भीतीदायक दिसणारे दोन पुरूष त्याच्याच दिशेने येतांना पाहिले. आणि त्यांच्यात आपापसात चालेला वार्तालापही ऐकला. त्याच्यातल्या एकाने दुसर्‍याला विचारलं, ‘‘हे कर्तृत्त्वा ! काय तू ह्या विणकाराला परत पाचशे सुवर्ण मुद्रा दिल्यास? तू हे का नाही लक्षात घेत की  त्याला पोटाला अन्न आणि अंग झाकायला वस्त्र इतकंच नशिबात आहे.’’

तो म्हणाला, हे कर्मा!  अफाट कष्ट करणार्‍या कष्टाळू माणसाला मी तर देतच राहतो. आणि द्यायलाही पाहिजे. पण मी दिलेल्या धनाचा उपभोग हा शेवटचा निर्णय तुझ्याच हाती आहे. मग मला उगीचच का दूषणं देत आहेस?

त्या दोघांचं तसं संभाषण चालू असताना सोमिलकाने आपली चंची उघडून पाहिली तर त्यात सोन्याच्या मोहरा नव्हत्या. आपल्या सर्व सोन्याच्या मोहरा गेलेल्या पाहून तो अत्यंत दुःखी झाला आणि त्याने विचार केला, माझ्या सारख्या निर्धनाने जिवंत राहून तरी काय उपयोग? मी ह्या वटवृक्षाच्याच एका फांदीला  गळफास घेतो. आपल्या निशचयानुसार त्याने गवताचा एक दोर बनवला त्याचं एक टोक आपल्या गळ्यात अडकवलं दुसरं टोक झाडाच्या फांदीला बांधून तो आता उडी मारणार इतक्यात आकाशातून एक पुरूष प्रकट झाला आणि त्याला थांबवत म्हणाला, ‘‘अरे बाबा सोमिलक! तू अशाप्रकारचं दुःसाहस करू नकोस.  तुझं धन पळविणारा तो मीच आहे. तुझ्याजवळ पोटापुरतं अन्न आणि लाज झाकण्यापुरतं वस्त्रं ह्याहून अधिक एक कवडी देखील तुझ्याजवळ असावी असं मला वाटत नाही. म्हणून तू तुझ्या घरी परत जा. मी तुझ्या साहसावर प्रसन्न आहे. माझं हे दर्शन व्यर्थ जाणार नाही. तरी तुला पाहिजे तो एक कुठलाही वर मागून घे. ’’

सोमिलक म्हणाला, ‘‘जर असच असेल तर मला खूप धन दे.’’

तो पुरूष म्हणाला, ज्याचा तुला उपयोग करता येणार नाही अशा भोगरहित सम्पत्तीला घेऊन तू काय करणार? तुझ्या भाग्यात पोटापुरतं अन्न आणि लाज झाकण्यापुरतं वस्त्र ह्या पलिकडे अजून धनलाभ नाही. म्हटलच आहे की, जी लक्ष्मी कुलवधू प्रमाणे केवळ एकाच्याच उपभोगासाठी मर्यादित असते; जी वेश्येप्रमाणे कुठल्याही सामान्य वाटसरूलाही उपयोगी पडत नाही. बाकी कोणी तिचा उपभोग घेऊ शकत नाहीत. ती लक्ष्मी प्राप्त होऊनही तिचा काय उपयोग?(141)

किं तया क्रियते लक्ष्म्या या वधूरिव केवला

या न वेश्येव सामान्या पथिकैरुपभुज्यते’’ ।। 141 ।।

लक्ष्मी कुलवधू जैसी । लाभे एकास जी भली

जी न वेश्येसमा सार्‍या । पथिकांसहि तोषवी ।। 141.1 ।।

उपभोग तिचा लाभे । एकासी; न दुज्या कुणा

तिचे काय करायाचे । मिळे जी ना दुज्या कुणा ।।141.2 ।।

सोमलिक म्हणाला,  जरी धनाचा उपभोग घेणे माझ्या प्रारब्धात लिहिले नसले तरी ते धन माझ्याजवळ असणं आवश्यक आहे. बरोबरच म्हटलं आहे की, एखादा धनाढ्य माणूस अगदी कवडीचुंबक असला, घरंदाज, मोठ्या कुळात जन्मलेला नसला, एखाद्या हीन कुळात त्याचा जन्म झालेला असला, त्याच्या असभ्य वर्तणुकीमुळे; सद्वर्तनी, प्रतिष्ठित लोकांनी त्याच्या सोबत कुठलेही संबंध ठेवले नसले तरीही त्याच्या जवळ असलेल्या सम्पत्तीमुळे सर्व लोक त्याला मोठ्या आदराने वागवून त्याची सर्वप्रकारची कामे अत्यंत सेवाभावी वृत्तीने करतात.(142)

 

कृपणोऽप्यकुलीनोऽपि सज्जनैर्वजितः सदा ।

सेव्यतो स नरो लोकैर्यस्य स्याद्वित्तसञ्चयः ।। 142 ।

लोभी कंजूस वृत्तीचा । घरंदाजहि ना असे

निषद्ध सज्जनांसी जो । धनवान परी असे ।। 142.1 ।।

सामान्य लोक ऐशा ह्या । नराची अति आदरे

करीती सर्व कामे ती । सेवा करिति भक्तिने ।। 142.2 ।।

आणि अजूनही तुला सांगतो, हे प्रिये गेली पंधरा वर्ष मी त्याचे अंडकोश कधी शिथील पडल्यामुळे गळून पडतील वा कधी अत्यंत तट्ट वाढल्यामुळे गळून पडतील अशा अपेक्षेनी त्याच्या मागे मागे फिरत आहे पण मी ते जसेच्या तसेच बघत आहे.(अजूनही ते गळून पडले नाहीत.) (143)

शिथिलौ च सुवृद्धौ च । पततः पततो न वा ।

निरीक्षितौ मया भद्रे । दशवर्षाणि पञ्च च ।। 143

पडतीलचि खाली हे  । दोन्हीही अंडकोश रे

होता शिथिल अत्यंत । वा तट्ट वाढुनी पुरे ।। 143.1 ।।

आशा ठेउन ऐसी मी । आहे फिरत मागुती

पंध्रा वर्षे तया झाली । खाली ना पडती परी ।। 143.2 ।।

त्या पुरुषानी विचारलं, हे तू कशाबद्दल बोलत आहेस? आणि सोमिलकाने पुढची गोष्ट सांगण्यास आरंभ केला,---

-----------------------------------------------------

ज्येष्ठ शु. सप्तमी 2 जून 2025

राणी लक्ष्मी बाई पुण्यतिथी

---------------------------------

खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा -

 मित्रसम्प्राप्तिः कथामुख

 हिरण्यक-ताम्रचूड कथा

 तिलचूण-विक्रय कथा

 शबर-शूकर कथा

 वणिक्पुत्र कथा

 मन्दभाग्य सोमिलक कथा

 वृषभानुगशृगाल कथा

 मित्रसम्प्राप्ती तंत्राची समाप्ती


Comments

Popular posts from this blog

तंत्र 2 मित्रसम्प्राप्तिः (अनुक्रमणिका)

॥ मित्रसम्प्राप्तिः ॥ (कथामुख)

3 शबर-शूकर कथा