3 शबर-शूकर कथा

 


3 शबर-शूकर कथा

एका जंगल प्रदेशात एक पारधी रहात होता. एकदा शिकार करण्यासाठी तो जंगलात गेला. तेथे त्याला जणु काय काजळाचाच पर्वत असावा असे भल्या मोठ्या  आकाराचे रानडुक्कर हिंडताना दिसले.  त्यानेही लगेचच आपल्या धनुष्याला बाण जोडून त्याची दोरी/ प्रत्यंचा कानापर्यंत ताणून एक तीक्ष्ण बाण त्या रानडुकरावर सोडला.

वर्मावर बाण लागल्या रानडुकरानेही चवताळून त्या पारध्यावर हल्ला चढवला आणि त्याच्या अर्धचंद्राकार दातांनी त्या व्याधाचा कोथळाच बाहेर काढला. पोटच फाटल्याने तो पारधी जमिनीवर कोसळला आणि मरण पावला. आणि इकडे वर्मावर बसलेल्या बाणामुळे ते रानडुक्करही तडफडत शेवटी मरून पडलं.

ह्या घटनांमधेच भुकेने व्याकूळ झालेला बरेच दिवस काही खायला न मिळाल्याने मरायला टेकलेला एक कोल्हा इकडे तिकडे खाण्याच्या शोधात तेथे आला. तेथे ते रानडु्क्कर आणि पारधी दोघेही मरून पडलेले पाहून मनात अत्यंत आनंदित  होऊन त्याने विचार केला, ‘‘अरे वा वा! आज माझं दैव फार जोरात दिसतय. मी कधी विचारही केला नसेल असं भोजन आज माझ्यासमोर हजर आहे. सर्वच अतर्क्य आहे. कोणीतरी जे म्हटलं आहे ते अगदी खरच आहे. तुम्ही काही करा अथवा न करा; माणसाच्या पूर्व जन्माच्या बर्‍यावाईट कृत्यानुसार प्रेरित झालेलं त्याचं  शुभ वा अशुभ फळ ह्या जन्मी त्या त्या वेळी त्याच्या समोर दत्त म्हणून हजर होतं. (82)

अकृतेऽप्युद्यमे पुंसामन्यजन्मकृतं फलम् ।

शुभाऽशुभं समभ्येति विधिना संनियोजितम् ।। 82 ।।

लाभती गत जन्मीची । अनायास फळे सारी

कर्मानुसार प्राण्याच्या । शुभ अशुभ वा बरी

जसे भाग्य तसे होई । फळ पुढे उपस्थित

करता न च काहीही । दैवयोगे नियोजित ।। 82 ।।

त्याचप्रमाणे अजूनही असं म्हणता येईल की, माणूस  ज्या देशात, ज्यावेळी, ज्या वयात जे काही बरं वाईट, शुभ अशुभ काम करतो त्याचं फळ त्याला पुढच्या जन्मी त्याच भूभागात, त्याच वेळी, त्याच वयात त्याच प्रकारे बर्‍या वा वाईट स्वरूपात भोगावं लागतं. (83)

यस्मिन् देशे च काले च वयसा यादृशेन च ।

कृतं शुभाऽशुभं कर्म तत्तथा तेन भुज्यते ।। 83 ।।

(वयस् -आयु, जीवनाचा काही काळ)

कालखंडात ज्या ज्या जे । आयुष्याच्याच नेमक्या

ज्या देशी प्रहरी ज्या वा । भोगणे लिहिले असे

 ते ते त्या समयी ,स्थानी । भोगावे नित लागते

हिताचे अहिताचे वा । पूर्व कर्मानुसार ते ।। 83 ।।

ह्या सर्वाचा विचार करता, हे सर्व भक्ष्य चिक्कार आहे आणि मला ते खूप दिवस पुरेल अशा प्रकारे  मी  ते खात राहीन. सर्वप्रथम ह्या धनुष्याच्या दोन्ही टोकांना ताणून ही जी आतड्याची दोरी बांधली आहे ती मी खातो. म्हटलच आहे की, माणसाने आपण कमावलेलं धन एकदम खर्च करून टाकायची घाई करू नये; तर, रोग बरा व्हावा, शरीर धष्टपुष्ट व्हावं म्हणून औषध जसं योग्य वेळी, योग्य प्रमाणात/ योग्य मात्रेत घ्यावं त्याप्रमाणेच धनचाही माणसाने आस्ते आस्ते उपभोग घ्यावा. त्यात घिसडघाई नकोच! (84) मनाशीच,

शनैः शनैश्च भोक्तव्यं स्वयं वित्तमुपार्जितम् ।

रसायनमिव प्राज्ञैर्हेलया न कदाचन ’’ ।। 84 ।।

हळु हळु च भोगावे । वित्त जे का कमावले

योग्यमात्रेत जैसे का । सेवावे औषधा तसे ।। 84.1 ।।

हेळसांड करावी ना । उतमातहि ना बरी

नको उधळपट्टी ती । ना अवहेलना   करी ।। 84.2 ।।

मनाशीच असं ठरवून तो कोल्हा धनुष्याला ताणून बांधलेली ती आतड्याची दोरी एका टोकाकडून खाऊ लागला. त्याच्या दातांनी ती तुटताच मोठ्या वेगाने त्याच्या टाळ्याला/ तोंडाच्या आतील वरचा भाग छेदून त्याच्या तोंडातल्या स्नायूंना छेदून थेट टाळू म्हणजे मस्तकातून शेंडीसारखी बाहेर आली. त्या प्रचंड वेदनेने तो कोल्हाही क्षणात गतप्राण झाला. (इतकी गोष्ट सांगून तो ब्राह्मण आपल्या पत्नीला ब्राह्मणीला म्हणाला,)

 म्हणून मी म्हणतो, ‘‘अति हाव बरी नाही.’’( आणि जीवन निर्वाहासाठी पराकोटीचा त्यागही बरा नाही.)

तो पुन्हा म्हणाला, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तू हे कधी ऐकलं नाहीस का?  की, 1)किती वर्ष आणि कशाप्रकारचं आयुष्य लाभणार आहे आहे, 2)तसेच आपल्या वाट्याला येणारं काम आणि त्याचं स्वरूप, 3) धनप्राप्ती  4) विद्या आणि 5) मरण ह्या पाचही गोष्टी माणूस गर्भावस्थेत असतानाच ब्रह्मदेव त्याला प्रदान करतो.(माणूस दर्पोक्तीने भले कितीही म्हणो की माझ्या मनगटातील पराक्रमाच्या जोरावर, माझ्या दीर्घ प्रयत्नांच्या बळावर, माझ्या अथक प्रयत्नांनी, माझ्या असीम बळाद्वारे हे यश, विद्या आदि प्राप्त केलं आहे तरी त्याला काहीही अर्थ नाही. ) ह्या गोष्टी त्याला स्वतःच्या कर्तृत्त्वाच्या बळावर, मनगटाच्या ताकदीवर, स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर प्राप्त करता येत नाहीत. (85)

आयुः कर्म च वित्तं च विद्या निधनमेव च ।

पञ्चैतानि न सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः ।। 85

आयुष्य, कर्म, सम्पत्ती, । विद्या, मरण पाच ह्या

गोष्टी देई विधाता तो । गर्भावस्थेत व्यक्तिला ।।

स्वकर्तृत्त्व बळे कोणी । मिळवीन म्हणे तया

कर्तृत्त्वा ना इथे थारा । पाचीही  दैवदत्त ह्या।। 85

ब्राह्मणाने ब्राह्मणीला असे समजावले. तिलाही ते पटले आणि ती म्हणाली, जर असं असेल तर माझ्याकडे थोडे तीळ शिल्लक आहेत. ते तीळ साफ करून, ते कुटून त्याचं काही बनवून  मी एखाद्या ब्राह्मणाला जेवायला  बोलवीन.

ब्राह्मणीला आपलं सांगणं पटलेलं पाहून ब्राह्मणही सुखावला आणि दुसर्‍या गावाला निघून गेला. इकडे त्याच्या पत्नीने  गरम पाण्यात तीळ घालून चांगले हातानी मळून मळून धुतले आणि कांडून  उन्हात सुकविण्यासाठी ठवले आणि ती बाकीची काम उरकायला लागली. तेवढ्यात एक कुत्र तेथे तीळ हुंगत आलं आणि तीळांवरच मुतून गेलं. ते पाहिल्यावर ब्राह्मणपत्नी मोठ्या चिंतेत पडली. तिच्या मनात विचार आला, आमचं नशीबच फुटकं आहे. दैवाचा खेळ तर बघा! दुर्दैवानी आता हे तीळ खाण्यायोगयही राहिले नाही. आता हे कांडून साल काढलेले तीळ मी दुसर्‍या कोणाला तरी देऊ त्याच्याबदल्यात कांडलेले तीळ घेउन येते. ह्या कांडलेल्या , सडलेल्या तीळांच्या बदल्यात कोणीही मला सडलेले, कांडलेले तीळ द्यायला तयार होईल. (मित्रांनो ह्या सर्व गोष्टी मठात राहणार्‍या, उंदरानी उंचावर ठेवलेली भिक्षा खाण्याने संत्रस्त झालेल्या ताम्रचूड नावाच्या सन्याशाला त्याच्याकडे तीर्थयात्रेनिमित्त हिंडत आलेला अतिथी बृहत्स्फिक् नावाचा दुसरा सन्याशी सांगत आहे. बृहत्स्फिक् ह्या वरील ब्राह्मण ब्राह्मणीच्या घरी त्याच्या्रतानिमित्त राहिला होता. एकदिवस तो पहाटेच उठला असता त्याच्या कानावर काय संवाद पडला तो ते सांगत होता.. आता इथूनपुढे हा बृहत्फिक् त्याच्या मित्राला ताम्रचूडाला सांगू लागला,)

‘‘मी भिक्षा मागायला ज्या घरी गेलो होतो कर्मधर्म संयोगानी ती ब्राह्मणपत्नी नेमकी त्याच घरी तीळ बदलण्यासाठी आली. आणि म्हणाली, कांडलेल्या, सडलेल्या पाखडलेल्या तिळांच्या बदल्यात हे कांडलेले, सडलेले, पाखडलेले तीळ घ्या.’’

त्या ब्राह्मणनपत्नीचा तो आकर्षक प्रस्ताव ऐकून ती घरमालकीणही मनातून प्रसन्न झाली आणि ते तीळ बदलून द्यायला तयार झाली. त्याचवेळी ‘कामन्दकीय नीतीशास्त्र’ वाचलेला तिचा मुलगा पुढे आला आणि आईला परावृत्त करत म्हणाला, ‘‘माय! थांब जरा! हे तीळ आदलाबदली करण्यास योग्य नाहीत. आपल्या सडलेल्या, पाखडलेल्या तीळांच्या बदल्यात तू हे कांडून, पाखडून साफ केलेले तीळ घेऊ नकोस. आपल्या स्वच्छ केलेल्या तीळांच्या बदल्यात जर कोणी स्वच्छ केलेले तीळ घ्यायला तयार असेल तर नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असेल.

मुलाचा तो अभिप्राय ऐकून त्या घरमालकिणीनेही तीळ आदलाबदलीचा तो विचार सोडून दिला.

ही गोष्ट सांगून झाल्यावर बृहत्स्फिक् परत ताम्रचूड सन्याशाला म्हणाला, म्हणून मी म्हणतो की, शांडिल्यगोत्री कोणी ब्राह्मण स्त्री विनाकारण आपल्या कांडलेल्या, पाखडलेल्या तीळांच्या बदल्यात कांडलेले, पाखडलेले तीळ  घेणार नाही.

---------------------

इतकं सांगून झाल्यावर बृहत्स्फिक् परत आपल्या सन्यासी मित्र ताम्रचूडाला म्हणाला, ‘‘तुला तो उंदीर कुठून येतो आणि कसा जातो हे माहित आहे का?’’

त्यावर ताम्रचूड म्हणाला, ‘‘होय महाराज ! मला माहित आहे. कारण तो उंदीर कधी एकटा येत नाही. कायम असंख्य उंदराच्या झुंडीसहितच येतो. माझ्या समोरच इकडे तिकडे फिरून निघूनही जातो.’’

 आलेल्या त्या अतिथी बृहत्स्फिकाने विचारले, ‘‘ तुझ्याकडे खणण्यासाठी काही अवजार आहे का?’’

तो म्हणाला, ‘‘ हो आहे! ही लोखंडाची कुदळ आहे.’’

अतिथी म्हणाला, ‘‘उद्या पहाटे पहाटे तू माझ्यासोबतच रहा. लोकांची ये जा सुरू होऊन त्यांच्या पावलांच्या खुणा उमटण्यापूर्वीच आपण उंदरांच्या पायाचे ठसे शोधत त्यानुसार त्यांच्या बिळाचा पत्ता शोधून काढू. ’’

 (उंदीर हिरण्यकाने) ते ऐकून विचार केला, अरे रामा! आता माझा तर सत्यानाशच होणार! कारण ह्याा सन्याशाच्या बोलण्यात खूपच तथ्य जाणवत आहे. जसे त्यानी जमिनीत पुरलेल्या / भूमीगत खजिन्याबद्दल  माहिती मिळवली होती त्याच प्रमाणे आमच्या बिळाच्या ठिकाणाबद्दलही तो माहिती मिळवेल हे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होत होतं. जे म्हणतात ते काही खोटं नाही, अत्यंत हुशार, बुद्धिमान, अनुभवी माणूस नुसत्या एका दृष्टिक्षेपात समोरच्या व्यक्तीत किती तथ्य आहे हे जाणू शकतो.  समोरच्या व्यक्तीच्या योग्य वा ढोंगीपणाचे अनुमान बांधू शकतो. कार्यकुशल माणूस नुसत्या हाताच्या अंदाजानेही (जणु काही हाताचाच तराजू करून) छटाकभर (काही ग्रॅम ) कमी जास्तीचा अंदाज बरोबर सांगू शकतो. (86 )

आर्या (मात्रा 12, 18, 12, 14)

सकृदपि दृष्ट्वा पुरुषं विबुधाः जानन्ति सारतां तस्य

हस्ततुलयाऽपि निपुणाः पलप्रमाणं विजानन्ति ।। 86 ।।

एकाच दृष्टिक्षेपात, तथ्य किती समोरच्या व्यक्तीत

जाणती अनुभवी नित, नर असे किती खोलात ।। 86.1 ।।

तसा कार्यकुशल कोण, अंदाजे हातानेच तोलून

सांगे कमी-जास्त वजन, जरी असेची छटाकभर ।। 86.2 ।।

बाळाचे पायपाळण्यात दिसतात म्हणतात ते काही खोट नाही. एखाद्याची दुर्दम्य इच्छा, आकाशाला भिडलेल्या आशा-आकांक्षा, एखाद्या गोष्टीची तीव्र अभिलाषा पाहूनच त्याचा गतकाळ म्हणजेच पूर्व जीवन वृत्तांत आणि त्याची पुढच्या काळातील झेप, गगनाला गवसणी घालणारा भविष्यकाळात सहज लक्षात येतो. मोराच्या पिल्लाला भले तुरा, पंख वा पिसारा फुटल नसला तरी त्याच्या चालीतील डौल पाहूनच हे मोराचं पिल्लु आहे हे बघता क्षणी कळून येते. (87)

( वृत्त- वसंततिलका )

वाञ्छैव सूचयति पूर्वतरं भविष्यत्,

पुंसा यदन्यतनुजं त्वशुभं शुभं वा

विज्ञायते शिशुरजातकलापचिह्नः,

प्रत्युद्गतैरपसरन् सरसः कलापी ।। 87 ।।

येतो कळून गतकाळ, भविष्य ही वा

दुर्दम्य पाहुन कुणा हृदिची मनीषा

जैसे पिलू न फुटलाच तुरा पिसारा

लक्षात ये बघुन चालचि मोर तो हा ।। 87

त्या सन्याशाच्या मनातील भाव ताडून मी भयभीत झालो. आपल्या साथीदारांसह नेहमीचा ठरलेला मार्ग सोडून दुसर्‍याच एका वाटेने पळून जाऊ लागलो. मी माझ्यावर विश्वास ठेवलेल्या अनुयायी साथीदारांसह थोडे मार्गक्रमण केले असेल नसेल तोच एक गलेलठ्ठ बोका समोरून येतांना दिसला. इतक्या सार्‍या उंदरांचा समूह पाहून तो तर आनंदाने त्यांच्यावर तुटूनच पडला.

 त्या बोकोबाच्या तावडीतून सुटलेले रक्तबंबाळ अवस्थेतील, उरले सुरले माझ्यावर विश्वास ठेऊन असलेले अनुयायी साथीदार मी त्यांना भलत्याच चुकीच्या मार्गाने नेल्याबद्दल मला दूषणं देऊ लागले. माझी निंदा नालस्ती करू लागले. जखमांमधून रक्त ओघळून जमीनीवर सांडत असलेले माझे साथीदार आपल्या बिळाकडे पळून गेले. बरोबच म्हटलं आहे, पारध्याच्या जाळ्यात अडकलेल्या हरणाने ते जाळं कुरतडून त्याची कशीबशी सुटका करून घेऊन पळायला सुरवात केली असेल नसेल तोच त्याचा पाय शिकार्‍याने तेथे हुशारीने लावून ठेवलेल्या सापळ्यात अडकला. त्या सापळ्यातून कसा बसा पाय सोडवून घेऊन ते हरीण जीवाच्या आकांताने ज्या वनाात पळून गेले तेथे नेमका मोठा वणवा लागला होता. त्या वणव्यातून होरपळत ते हरीण कसे बसे बाहेर पडले तर समोरच शिकारी धनुष्याला बाण लावून  सज्ज बसला होता. आपल्या दिशेने येणारा तो बाण चुकविण्यासाठी त्या हरणाने सर्व शक्ती पणाला लावून लांब उडी मारली ती नेमकी पाण्याने भरलेल्या विहीरीतच! काय दैव असतं पहा! ह्या दैवापुढे पराक्रम, उत्साह, बळ, हुशारी चाणाक्षपणा सर्व सर्व व्यर्थ ठरतं. (88)

वृत्त -शार्दूल विक्रीडित

छित्वा पाशमपास्य कूटरचनां भङ्क्त्वा बलाद्वागुरां,

पर्यन्ताग्निशिखाकलापजटिलान्निर्गत्य दूरं वनात् ।

व्याधानां शरगोचरादपि जवेनोत्पत्य धावन्मृगः,

कूपान्तः पतितः करोतु विधुरे किं वा विधौ पौरुषम्? ।। 88 ।।

जाळ्यातून कसेबसे सुटनिया वेगे पळू लागता

चिंकारा-मृग सापळ्यात अडके; व्याधेच जो लाविला ।

तोही तोडुन धावता मृग वनी, दावाग्नि तेथे महा

त्या मोठ्या वणव्यातुनी निसटुनी वाचून येता पुन्हा ।। 88.1 ।।

त्यासी लक्ष्य करे पुन्हा शर शिकार्‍याचा बघोनी भये

वेगाने अति धावता पडतसे कोण्या विहीरीमधे ।

होते घातक सर्व कर्म अवघे, दुर्दैव येता असे

तेव्हा मर्दुमकी, पराक्रम बळा शब्दीच अस्तित्त्व ते ।। 88.2 ।।

(वागुरा – दावं. विधुर – एखाद्या गोष्टीपासून विहीन)

माझी अशी निंदानालस्ती करण्याने मी एकटाच निघून गेलो. आणि बाकी ते बुद्धीहीन, अडाणी सर्वजण पुन्हा त्याच बीळात घुसले. तो दुष्ट सन्यासी जमिनीवर पडलेल्या रक्ताचा मागोवा घेत थेट बिळापर्यंत पोचला आणि त्याकडच्या कुर्‍हाडीने त्याने ते खणायला सुरवात केली.

तेथेच माझे सर्व धन होते. त्याच्याच बळावरच मी अशक्यप्राय अशा जागी जाऊ शकत होतो. खणता खणता ते धन त्या सन्याशाला मिळाले. अत्यंत प्रसन्न होऊन तो आपल्या सोबतच्या ताम्रचूड नावाच्या सन्याशाला म्हणाला, मित्रा! आता तू निःशंकपणे झोपू शकशील. ह्या संपत्तीच्या जोरावरच तो उंदीर तुझ्या झोपेत व्यत्यय आणत होता. अशा गप्पा गोष्टी करत ते दोघेही तो खजिना घेऊन त्यांच्या मठाकडे निघून गेले.

नंतर जेव्हा मीही परत त्या खजिना लुटून नेलेल्या जागेवर गेलो तेव्हा ती नेहमीप्रमाणे रमणीय राहिलेली नसून अत्यंत उजाड, पूर्ण बेचिराख झालेली जागा पाहून मी अत्यंत अस्वस्थ, बेचैन झालो. मी ती जाग पाहूही शकणार नाही अशी माझ्या मनाची उलघाल होऊ लागली. आता मी काय करू? कोठे जाऊ? कोठे जाऊन माझ्या मनाला शांतता मिळेल असा विचार मी करू लागलो.

असा विचार करत मोठ्या कष्टाने मी तो दिवस व्यतीत केला. सूर्यास्त झाल्यावर अत्यंत हताश, उद्विग्न मनाने मी माझ्या साथीदारांना घेऊन परत त्या मठात शिरलो.

आमची चाहूल लागताच ताम्रचूड त्या फाटक्या बांबूने परत त्या भिक्षापात्रावर मारू लागला. त्यावर तो अतिथी म्हणून आलेला सन्यासी म्हणाला, मित्रा! अजूनही तू निःशंकपणे झोपू शकत नाहीस का?

तो म्हणाला, महाराज! परत तो दुष्ट उंदीर त्याच्या साथीदारांसह येउन हजर झाला आहे. त्या काळजीने मी ह्या चिरक्या बांबूने ते भिक्षापात्र परत परत ठोकत आहे.

ते ऐकून हसून तो अतिथी म्हणाला,  मित्रा घाबरू नकोस. संपत्तीसोबतच ह्याचा उड्या मारायचा उत्साहही संपुष्टात आला आहे. सर्वच प्राण्यांची हीच स्थिती होत असते.  म्हटलच आहे, माणूस जेव्हा अवाजवी, अति उत्साहाने फुरफुरत असतो, त्याचं इतरांशी वर्तन उद्धट आणि भाषा उर्मट होते, तो सहजपणे दुसर्‍यांचा तिरस्कार निंदा, अपमान करू लागतो तेव्हा; त्याच्या अशा वागण्यामागे त्याच्या जवळ असलेल्या धनाच बळ हे मोठं कारण असतं. (89)

यदुत्साही सदा मर्त्यः, पराभवति यज्जनान् ।

यदुद्धतं वदेद्वाक्यं । तत्सर्वं वित्तजं बलम् ।। 89 ।।

अवाजवीच उत्साहे । सदा फुरफुरे कुणी

मुखी उद्धट भाषा ती । झिडकारी कुणासही ।। 89.1 ।।

अशा ह्या वागण्यामागे । असे कारण एकची

जोरावर धनाच्या तो । शेखी मिरवितो जगी /असभ्य वर्तना करी ।। 89.2 ।।

असं त्या अतिथीचं बोलणं माझ्या कानावर पडताच मी रागाने अत्यंत ललबुंद होत सर्व शक्ती पणाला लावून त्या भिक्षापात्राच्या रोखाने जास्तच जोरात उडी मारली. पण तिथपर्यंत पोचू न शकल्याने काही अन्न न मिळताच मी खाली जमिनीवर आपटलो. माझ्या बदकन् खाली पडण्याचा आवाज ऐकून तो माझा वैरी ताम्रचूडाला म्हणाला, ‘‘मित्रा, बघ बघ! ते दृश्य बघ. म्हटलच आहे की, दौलतीच्या जोरावरच माणसं बलाढ्य होतात. धनवान व्यक्तीलाच मोठा व्यासंगी निष्णात विद्वान पंडित समजलं जातं. ह्या उंदराकडे बघ. पैशाची उब संपली की सारेच आपल्या जातीच्या सामान्य जनांमधे मोडले जातात.(90)  

अर्थेन बलवान्सर्वोऽप्यर्थयुक्तश्च पण्डितः।

पश्यैनं मूषकं व्यर्थं स्वजातेः समतां गतम् ।। 90

जोरावर धनाच्याची । येतसे जोर तो नरा

ठरे धनाढ्य ह्या लोकी । गुणी विद्वान तो महा ।। 90.1 ।।

परी धनविहीनासी । सामान्य गणती जगी

संपता ऊब पैशांची । शक्ती ना मूषकाप्रति ।। 90.2 ।।

म्हणून म्हणतो की तू निःशंकपणे झोपी जा. त्याचं जे उंच उड्या मारण्याचं कारण होतं ते आता आपल्या हाती आलं आहे. कोणी म्हटलं असेल पण बरोबरच म्हटलं आहे. ‘‘विषारी दात काढलेला साप  आणि मदमस्त नसलेला (तरूणपण सरून म्हातारपणाकडे झुकलेला) हत्ती हे जसे सामान्य प्रकारात मोडतात; त्यांना नावाचेच साप आणि हत्ती समजले जाते तसा; संपत्तीहीन झालेला माणूस इतर साधारण माणसांबरोबरच गणला जातो. त्यांचं विशेष महत्त्व रहात नाही. त्यांचा बडेजाव संपुष्टात येतो.’’(91)

दंष्ट्राविरहितः सर्पो मदहीनो तथा गजः ।

ताथाऽर्थेन विहीनोऽत्र पुरुषो नामधारकः ।। 91

दात नाही असा सर्प । मद नाही असा गज

कुणी नर विना वित्त । नाममात्रचि केवळ ।। 91 ।।

ते ऐकून मी मनात विचार करू लागलो, ‘‘अहो! हा माझा शत्रू हा जो नवीन आलेला सन्यासी आहे, जे काय म्हणतो आहे ते सत्यच आहे. माझ्या अंगात पूर्वीच्या तुलनेत अंगुळभरही उड्या मारण्याची ताकद राहिलेली नाही.. अरेरे! धनहीन पुरुषाचं जीवन व्यर्थ आहे.  खरच म्हठल आहे की, ‘‘द्रव्य-संपत्ती निघून गेलेल्या माणसाची बुद्धी चालेनाशी होऊन त्याची अवस्था उन्हाळ्यातल्या छोट्या नद्यांसारखी बिकट होऊन जाते.  अशा ओहोळाप्रमाणे वाहणारया नद्या जशा उन्हाळ्यात पूर्ण आटून जातात त्याप्रमाणे अशी कंगाल झालेली निर्धन माणसंही आयुष्यातून उठतात. समाजात त्यांना कोणी विचारत नाही. त्यांचा मानसन्मान संपुष्टात येतो.’’ (92)

अर्थेन च विहीनस्य पुरुषस्याल्पमेधसः ।

उच्छिद्यन्ते क्रियाः सर्वाग्रीष्मेकुसरितो यथा

धनहीन मनुष्याची । बुद्धी ताळ्यावरी नसे

जे जे कर्म करी तेची । तडीस जाय ना; फसे

ग्रीष्मकाळी नद्या छोट्या। आटती सुकती जशा

कर्मे तैसी तयाची ती । होती विफल सर्वथा ।। 92।।

जसे जंगली जव वा जंगली तीळ हे नावालाच जव वा तीळ असतात पण ते कुठल्या उपयोगाचे नसतात त्याप्रमाणे निर्धन माणसाचं आयुष्य समाजाच्या दृष्टीने काही कामाचं नसतं. (93)

यथा काकयवाः प्रोक्ता यथाऽरण्यभवास्तिलाः ।

नाममात्रा न सिद्ध्यैस्युर्धनहीनास्तथा नराः ।। 93 ।।

नावाचेच जसे फक्त । जंगली तीळ वा जव

दरिद्री पुरुषाचे ते । तसे निष्फळ जीवन ।। 93 ।।

एखाद्याच्या अंगी अनेक अलौकिक गुण असूनही तो जर दरिद्री असेल तर समाजात त्याची कोणी दखलही घेत नाही. तो कोणाच्या नजरेत भरत नाही. जगात त्याला काही किंमत रहात नाही. ज्याप्रमाणे सूर्यामुळे हे विश्व उजळून जातं, सूर्य ह्या विश्वाला प्रकाशित करतो त्याप्रमाणे लक्ष्मी म्हणजेच धनदौलत, ऐश्वर्य माणसाच्या गुणांवर प्रकाश टाकणारी असते. वैभवशाली नराकडे लोक लगेच आकृष्ट होतात. त्याचे गुणही डोळ्यात भरतात. निर्धन मात्र गुणी असूनही लोकांच्या नजरेआडच राहतो. (94)

 सन्तोऽपि  नहि राजन्ते दरिद्रस्येतरे गुणाः ।

आदित्य इव भूतानां श्रीगुणानां प्रकाशिनी ।। 94 ।।

दारिद्र्यानेच अंगीचे । गुण ना दिसती कधी

सूर्य प्रकाशवी पृथ्वी । गुणांसी कमला तशी ।। 94 ।।

जो मूळातच निर्धन असतो त्याला निर्धन असण्याचं इतकं दुःख वाटत नाही; पण जो ऐश्वर्य भोगून नंतर निर्धन होतो त्याला त्या निर्धन होण्याचं महा दुःख भोगावं लागतं. (95)

न तथा बाध्यते लोके प्रकृत्या निर्धनो जनः ।

यथा द्रव्याणि सम्प्राप्य ते विहीनः सुखे स्थितः ।। 95 ।।

धनवान असे आधी । भोगे ऐश्वर्य सर्वही

दारिद्र्य त्यास येताची । जितुकी वेदना करी

तितुके दुःख ना होई । सलेना वेदना तशी

जन्मजात असे जोची । दरिद्री धनहीनची ।। 95 ।।

एखाद्या वाळलेल्या, कीड लागलेल्या अर्धवट जळलेल्या, ओसाडीत वाढलेल्या झाडाचा जन्मही एकवेळ बरा म्हणावा लागेल पण दीन याचक भिक्षेकर्‍याचं जीवन कदापि चांगलं म्हणता येणार नाही. (96)

शुष्कस्य कीटखातस्य । वह्निदग्धस्य सर्वतः

तरोरप्यूषरस्थस्य वरं जन्म न चार्थिनः ।। 96 ।।

वाळले कीड लागोनी । ओसाडीतचि वा जगे

वणव्यात जळाले वा । झाड तेही बरे असे ।। 96.1 ।।

परंतु धनहीनाचे । जगणे अर्थहीन ते

नसे आशा जराही त्या । व्यर्थ त्याचे असे जिणे ।। 96.2 ।।

दारिद्र्य मोठं वाईट असतं. ते माणसाला निस्तेज प्रभावहीन करून टाकतं. अशा माणसाबद्दल कायम लोक शंका घेत राहतात. निर्धन, गरीब माणूस दुसर्‍याचं कल्याण करायच्या इच्छेने जरी आला तरी लोक त्याचा आदर सत्कार करता उलट त्याला हुटाहुट करून घालवूनच देतात. (97)

शङ्कनीया हि सर्वत्र निष्प्रतापा दरिद्रता ।

उपकर्तुमपि प्राप्तं निःस्वं सन्त्यज्य गच्छति ।। 97 ।।

संशयास्पद राहे ही । लाचार धनहीनता

दीन येता सहाय्यासी । समाज त्यजितो तया ।। 97 ।।

विधवा स्त्रीच्या स्तनांप्रमाणे दरिद्री माणसाची मनोरथं हृदयातच उसळी घेऊन मोठी होतात आणि तेथेच विलीनही होतात. (98)

उन्नभ्योनम्य तत्रैव निर्धनानां मनोरथाः ।

हृदयेष्वेव लीयन्ते विधवास्त्रीस्तनाविव ।। 98 ।।

आकांक्षा धनहीनाच्या । विधवेच्या स्तनासमा

हृदी उसळती आणि । लीन होती हृदी पुन्हा ।। 98 ।।

टळटळीत दिवस असतानाही, सर्व स्वच्छ, स्पष्ट दिसत असूनही दारिद्र्याच्या अंधारात लपेटलेला माणूस सर्वांसमोर धडधडित दिसत असतानाही जणु काही कोणाच्या दृष्टीसही पडत नाही. समाज त्याची पूर्ण उपेक्षा करतो. (99)

व्यक्तेऽपि वासरे नित्यं दौर्गत्यमसावृतः ।

अग्रतोऽपि स्थितो यत्नान्न केनापीह दृश्यते ।। 99 ।।

दारिद्र्य अंधकाराने । नर लपेटला कुणी

दिवसा ढवळ्या राहे । नजरेपुढती जरी ।। 99.1

दृष्टीसही पडे ना तो । लोकांमध्ये असूनही ।

पाहुनी टाळती त्यासी । जन सर्व उपेक्षती ।। 99.2 ।। 

‘‘अशा प्रकारे अत्यंत दुःखाने माझं रडगाणं गात असताना त्या संन्याशाच्या उशीखाली माझा ठेवा ठेवलेला मला दिसला. तो पाहून तर मी अजूनच निराश झालो. माझे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत असं वाटून पहाटेच माझ्या बिळात परत आलो. तेथे माझे साथीदार माझ्याच परिवारातील उंदीर  इकडे तिकडे माझ्या आजूबाजूने जाताना माझ्याप्रति अनादर दाखवत एकमेकांमधे कुजबुजू लागले की, ‘‘अरे आता हा आपल्याला काय भोजन देणार? आता ह्याच्या सल्ल्यानुसार वागल्याने,  आपल्याला मांजर आणि इतरांच्या हल्ल्याला मात्र तोंड द्यावं लागेल. नसत्या संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे  त्याचं अनुसरण करून काय मिळणार आहे?’’  म्हटलच आहे की,

ज्या मार्गदर्शक गुरूच्या  सल्ल्यानुसार वागल्याने काही फायदा, कल्याण तर सोडाच पण उलट संकट कोसळण्याचीच शक्यता असते अशा मालकाला वा मार्गदर्शकाला सोडून देणच त्याच्या अनुयायांसाठी योग्य आणि हिताचं असतं.(100)

यत्सकाशान्न लाभ; स्यात्केवलाः स्युर्विपत्तयः ।

स स्वामी दूरतस्त्याज्यो विशेषादनुजीविभिः’’ ।।100 ।।

सल्लाच ऐकुनी ज्याचा । वागुनी त्यानुसारची

लाभाची न उरे आशा । संकटांची दिसे हमी ।। 100.1 ।।

नेत्याला सोडुनी ऐशा । जावे हेच बरे असे

एक मार्ग हिताचा हा । दासांनी अवलंबिणे ।। 100.2 ।।

संपूर्ण रस्ताभर माझ्या अनुयायांकडून ही अशीच वाक्य-मुक्ताफळं ऐकत मी माझ्या बिळात घुसलो. पण आता मी निर्धन झाल्यामुळे माझ्या कुटुंबाच्या सदस्यापैकी कोणीही माझी वास्तपुस्त करायला वा माझ्या स्वागताला पुढे आले नाहीत. ते पाहून मी विचार करू लागलो, अरेरे! ह्या दारिद्र्याचा धिक्कार आहे. जे म्हणतात ते ठीकच म्हणतात की,--- धनहीन, दरिद्री माणूस जिवंत असूनही मेल्यातच जमा असतो. संतान उत्पन्न होत नसेल तर संभोगही व्यर्थ असतो. श्राद्धाचे मंत्र म्हणून सर्व कर्मकांड सांगणारा ब्राह्मणच नसेल तर ते श्राद्धही निष्फळ असतं; तसेच दक्षिणा न देता केलेला यज्ञही निरर्थक असतो. (101)

मृतो दरिद्रः पुरुषो मृतं मैथुनमप्रजम् ।

मृतमश्रोत्रियं श्राद्धं मृतोयज्ञस्त्वदक्षिणः ।। 101

जिवंत असुनी मेला । दरिद्री नर जाणणे

विना अपत्य संभोगा । बरे व्यर्थचि जाणणे

मंत्रहीनच श्राद्धासी । ना केले मानणे असे

दक्षिणेवीण यज्ञाची  । कैसी हो सांगता बरे? ।। 101

इकडे अत्यंत चिंतेने ग्रासून मी विचार करत होता तर तिकडे माझ्या सर्व अनुयायांनी मला सोडून दिलं होतं आणि माझ्या शत्रूचा आश्रय घेतला होता. मी असा एकाकी पडलेला पाहून सर्व जण माझी कुचेष्टा करू लागले.

एकांतात ध्यान/ योगनिद्रा घेऊन (मन शांत करून ) मी विचार करू लागलो की, त्या दुष्ट तपस्व्यांच्या मठात जाऊन त्यांनी उशी खाली ठेवटेटी माझी धनाची पेटी हळुहळु करतडून जर मी ते धन परत माझ्या बीळात घेऊन येऊ शकलो तर त्याच्या जोरावर उंदरांवर माझं प्रभुत्व, अधिकार परत एकदा सिद्ध करू शकेन. दरिद्री व्यक्ती आपल्या मनातल्या मनातच अशा अगणित इच्छा, आकांक्षा, कामना करत अजूनच दुःखी होते पण त्यांची पूर्तता करून सुखलाभ मिळवू शकत नाही. जशी कुलीन विधवा स्त्री मनात उठणार्‍या वासनांचं मनातच चिंतन करते आणि अजून दुःखी होते पण दुसर्‍याकडून कामवासनांची पूर्ती करून घेऊन हृदयाला शांत करू शकत नाही.(102)

व्यथयन्ति परं चित्तो मनोरथशतैर्जनाः ।

नानुष्ठानधनैर्हीनाः कुलजा विधवा इव ।। 102 ।।

कामना करुनी नाना । मनोरथे नवी नवी

दुःखी होई दरिद्री तो । अजुनी अजुनी मनी ।। 102.1 ।।

कुलीन विधवा जैसी । स्मरून पतिसंगति

दुःखी होई झुरे चित्ती । अजुनी अजुनी जशी ।। 102 .2 ।।

परंतु कामपूर्तीने । जसे ना चित्त शांतवी

मिळवू न शके तैसे  । दरिद्री सौख्य ते कधी ।। 102. 3 ।।

धनहीनता, दारिद्र्य ह्यासारखी बेअब्रू  करणारी दुसरी गोष्ट जगात नाही. दरिद्री माणूस जिवंत असला तरी त्याचे नातलग, मित्र परिवार तो जिवंत आहे का मृत ह्याचीही चौकशी करत नाहीत. इतक्या पराकोटीच्या अनादराला त्याला तोंड द्यावे लागते.(103)

दौर्गत्यं देहिनां दुःखमपमानकरं परम् ।

येनं स्वैरपि मन्यन्ते जीवन्तोऽपि मृता इव ।। 103 ।।

लागते दुःख सोसावे । अपमान सदा घडे

दरिद्री मनुजा सारे । मृत मानति सोयरे ।। 103 ।।

निर्धनता माणसाला लाचार, उदास, दीनवाणी, खिन्न बनवते. जो तो त्याचा अपमान करतो. एक दुःखदायी तिरस्कृत जीवन त्याच्या वाट्याला येतं. जणु निर्धनता ही महा पाप असते आणि त्या महापापाने ती व्यक्ती अपवित्र, दूषित, कलंकित झालेली असते. अनेक प्रकारची संकटं त्याच्यावर कोसळत राहतात. संकटांनी घेरलेला हा माणूस मोठा दयनीय होऊन जातो. (104)

दैन्यस्य पात्रतामेति पराभूतेः परं पदम्

विपदामाश्रयः शश्वद्दौर्गत्यकलुषीकृतः ।। 104 ।।

दारिद्रय-चिखलाने जो । माखला जाय एकदा

आश्रयानेच त्याच्याची । संकटे राहती सदा ।। 104.1 ।।

दीन लाचार तो होई । तिरस्कार  मिळे तया

माहेरघर तो वाटे । आपत्तिंचे समग्र ह्या ।। 104.2 ।।

धनहीनाची अवस्था मोठी बिकट असते. धनहीनाला कोणी आपलं म्हणत नाही. त्याची त्याच्या बंधुबांधवांनाही लाज वाटते. हा आमचा नातेवाईक आहे, जवळचा आप्तसंबंधी आहे हे सांगण्यासही लोक तयार होत नाहीत. ज्याच्या जवळ कवडीही उरली नाही अशा व्यक्तीसोबत संबंध ठेवायला सर्व नकार देतात. तो आमचा कुणी आहे हे ही लपवून ठेवतात. मित्रही सोडून जातात. सर्वच जण त्याच्या सोबत वैर धरतात.(105)

लज्जन्ते बान्धवास्तेन सम्बन्ध गोपयन्ति च ।

मित्राण्यमित्रतां यान्ति यस्य न स्युः कपर्दिका ।। 105 ।।

दरिद्री माणसाची त्या  । वाटे शरम बांधवा ।

टाळती सांगण्या नाते । ज्यापाशी ना कपर्दिका ।। 105.1 ।।

ना जीवलग त्या राहे । मित्रही सोडती तया

त्याच्या सवेच सारेची । धरती वैर भावना ।। 105.2 ।।

 हिरण्यक उंदीर म्हणाला,  धनहीनता मोठी वाईट असते काही कारणाने तुमच्याकडचे वैभव धुळीला मिळाले तर एखाद्या क्षुद्र (किड्याप्रमाणे )तुम्हाला समाजात काही जागा उरत नाही. संपत्तीचा नाश हा अनेक आपत्तींना घेऊन येणारा असतो. जणु काही धनहीन माणूस हा सर्व संकटांचे माहेरघर असतो. दारिद्र्य ह्या शब्दाचा समानार्थी शब्द मरण वा मृत्यू हाच आहे. (106)

मूर्तं लाघवमेवैतदपायानामिदं गृहम् ।

पर्यायो मरणस्याऽयं निर्धनत्वं शरीरिणाम् ।। 106 ।।

नगण्य, क्षुद्र शब्दांचे । मूर्त रूप दरिद्रता

कस्पटासम तो वाटे । दरिद्री नर तो सदा ।। 106.1 ।।

आपत्तींना सदा वाटे । धनहीन गृहासमा

पर्यायी शब्द मृत्यूचा । असे तो धनहीनता ।। 106.2 ।।

शेळ्यामेंढ्यांचा कळप जात असला तरी त्यांच्या खुरांनी उडणारा धुराळा पाहून वा केरसूणीने अंगण झाडण्यामुळे उडणारा धुळीचा लोट पाहून बघणार्‍याच्या मनाला (शत्रू सैन्याने आक्रमण तर केले नाही? घराला आग तर लागली नाही अशा ) भलभलत्या कल्पना भिववीत राहतात. प्रकाश आणि सावलीच्या हालण्याने निर्माण होणार्‍या भासमान आकृत्या भीतीदायक वाटतात. वा अर्धवट उजेड आणि अंधारामुळे निर्माण होणारी खाटेची भीतीदायक सावली पाहून लोक घाबरून पळून जातात. त्याच प्रमाणे निर्धन दरिद्री व्यक्ती अचानक समोर आली की लोक गांगरून जातात. ह्याला कसं काय चुकवावं ह्या विचाराने त्यांची तारांबळ उडते. ते कसेबसे त्याला पाहूनच निसटून जातात.(107)

अजाधूलिरिव त्रस्तैर्मार्जनीरेणुवज्जनैः ।

दीपखट्वोत्थच्छायेव त्यजते निर्धनो जनः ।। 107 ।।

शेळ्यामेंढ्याच जातांना । धुराळा पाहुनी नभी

झाडता केरसूणीने । धुळीचे लोट पाहुनी ।। 107.1

वा दिव्याच्या प्रकाशी ती । खाटेची सावली जशी

पाहुनी पळती दूरी । भय दाटून अंतरी ।। 107.2 ।।

तैसा निर्धन सामोरी । अकस्मातचि पाहुनी

सारे निसटती वेगे । धनहीनास टाळुनी ।। 107.3 ।।

अहो! ह्या जगात प्रत्येक वस्तूचं काही ना काही प्रयोजन असतं. काहीना काही उपयोग असतो. हातपाय धुतांना ते स्वच्छ निघावेत म्हणून माती लावून चोळून तो हातपाय धुतो. ज्या मातीला काहीही किंमत नाही असं आपण समजतो त्या मातीलाही काही मोल आहे. उपयोग आहे पण निर्धन माणसाचा मात्र ह्या जगाला काडीइतका उपयोग नसतो. त्याच्या जगण्यााचे यत्किंचितही प्रयोजन नसते. (108)

शौचाऽवशिष्टयाऽप्यस्ति किञ्चित्कार्यं क्वचिन्मृदा ।

निर्धनेन जनेनैव न तु किञ्चित्प्रयोजनम् ।। 108 ।।

हातपाय धुण्यासाठी । माती वापरतीच जी

असेच अल्प ते काही । प्रयोजन तिला जगी ।। 108.1 ।।

परंतु धनहीनाचे । प्रयोजन नसे जगी

उपयोग नसे त्याचा । लवमात्र जगूनही ।। 108.2 ।।

अरेरे! एखादा गरीब माणूस एखाद्या धनवानाच्या घरी त्याला काही देण्यासाठी जरी गेला तरी; हा निलाजरा, कोडगा माणूस नक्कीच काहीतरी मागायला आला असावा असे समजून त्याचा अपमानच होतो.  धिक्कार असो अशा दारिद्र्याचा! (109)

अधनो दातुकामोऽपि सम्प्राप्तो धनिनां गृहम् ।

मन्यते याचकोऽयं धिग्दारिद्र्यं खलु देहिनाम् ।। 109 ।।

धनिकाच्या घरी जाता । वस्तू देण्यास निर्धन

आला म्हणति मागाया । दारी लोचट याचक ।। 109.1 ।।

अरेरे गरिबीचा त्या । असो धिक्कार सर्वथा

माणसाला जगू ना दे । माणूस म्हणुनी कदा ।। 109.2 ।।

म्हणून म्हणतो की, ते धन पळवताना जर त्यांनी मला ठार मारायचा प्रयत्न केला आणि यदाकदाचित मी मेलोच तर तेही उत्तमच आहे. कारण म्हटलच आहे की,----- स्वतःच्या सम्पत्तीचेही जो भीतीने रक्षण न करता कातडी बचावू धोरण स्वीकारतो; ज्याच्या डोळ्यादेखत त्याची सम्पत्ती लोक पळवून नेतात त्या भेकड व्यक्तीने आपल्या मृत पितरांना जर जलांजली दिली तर ते स्वर्गीचे पितरसुद्धा त्याची छिऽऽथू करून ती स्वीकारत नाहीत. म्हणजेच जिवंतपणीच त्याची समाजात बेअब्रू होते. (110)

स्ववित्तहरणं दृष्ट्वा यो हि रक्षत्यसून्नरः ।

पितरोऽपि न गृह्णन्ति तद्दत्तं सलिलाञ्जलिम् ।। 110 ।।

स्वधना लुटता पाही । परी प्राणभयेचि जो

करे ना प्रतिकारासी । भ्याड पुरुष तोचि तो

आपुल्या पितरा देई । जलांजली जरी कधी

स्वीकारती न स्वर्गीचे । त्यासी पितरही कधी  ।। 110 ।।

अहो! गाय, ब्राह्मण, सम्पत्ती आणि स्त्री ह्या अत्यंत उपयोगी, समाजाला ललामभूत, मौल्यवान आणि आपल्या प्रतिष्ठेचे मानक चिह्न समजल्या जाणार्‍या गोष्टी अत्यंत असहाय्य, असुरक्षित, सुभेद्य, नाजुक, दुर्बल असतात. स्वतःचं रक्षण करण्यास त्या असमर्थ असतात. ह्या गोष्टींचं प्राणापलिकडे रक्षण करावं लागतं. त्यांचं रक्षण करताना मृत्यू जरी आला तरी त्याने मृत्यूनंतरही आपल्या सनातन परंपरेनुसार चालत आलेल्या विचारांप्रमाणे असलेला उत्तम लोक म्हणजेच स्वर्गलोकच मिळतो. थोडक्यात अशा योग्य कारणासाठी मरणाला जवळ केलं असेल तर मरणानंतरही सर्वत्र त्या व्यक्तीची प्रशंसाच होत राहते. (111)

गवाऽर्थे ब्राह्मणाऽर्थे च स्त्रीवित्तहरणे तथा ।

प्राणांस्त्यजति यो युद्धे तस्य लोकाः सनातनाः ।। 111 ।।

गाय, ब्राह्मण सम्पत्ती । किंवा स्त्री रक्षणास्तवे ।

प्राणही जो पणा लावे । स्वर्गप्राप्ती तया घडे ।। 111 ।।

असा साकल्याने विचार करून त्या सन्याश्यांच्या उशाखाली ठेवलेले धन चोरण्याचा मी मनाशी निश्चय केला आणि नंतर रात्री मी तेथे त्यांच्या मठात गेलो.  आणि त्या झोपलेल्या सन्याश्यांच्या उशाची पेटी कुरतडून त्यातील धन पळविण्याच्या तयारीत असतानाच तो दुष्ट सन्यासी जागा झाला. जागे होताच त्यानी त्या चिरक्या बांबूनी माझ्या डोक्यावर प्रहार केला. माझ्या आयुष्याचा दोर अजून शाबूत होता म्हणूनच मी न मरता वाचलो आणि तेथून पळून गेलो.

जे म्हणतात ते बरोबरच आहे. जी मिळायची आहे ती गोष्ट मनष्याला नक्कीच मिळते. साक्षात ब्रह्मदेवही ते बदलू शकत नाही. म्हणून कुठली गोष्ट नष्ट झाली तरी मी ना दुःखी होत ना अनायास एखादी गोष्ट प्राप्त झाली  तर आश्चर्याने आनंदित होत. कारण जी गोष्ट आपली असेल ती आपल्याला मिळेलच. ती दुसर्‍याला मिळू शकत नाही. आणि जी वस्तू दुसर्‍यांच्या नशिबात आहे ती त्यांनाच मिळेल ती आपल्याला मिळू शकत नाही. (112)

    प्राप्तव्यमर्थं लभते मनुष्यो,  देवोऽपि तं लङ्घयितुं शक्तः।

तस्मान्न शोचामि विस्मयो मे,  यदस्मदीयं हि तत्परेषाम् ’’ 112

आहे नशीबी मिळतेच ते ते ब्रह्माहि रोखू शके तयाते

आश्चर्य ना दुःख मला सतावे आहेच माझे नच ते दुजाचे ’’ 112 ।।

कावळा आणि कासवानी विचारलं, ही कुठली कथा? आणि हिरण्यक उंदराने पुढील कथा सांगायला सुरवात केली ----

------------------------------------------

खालील लिंक्सवर क्लिक  करा आणि वाचा -

 मित्रसम्प्राप्तिः कथामुख

 हिरण्यक-ताम्रचूड कथा

 तिलचूण-विक्रय कथा

 शबर-शूकर कथा

 वणिक्पुत्र कथा

 मन्दभाग्य सोमिलक कथा

 वृषभानुगशृगाल कथा

 मित्रसम्प्राप्ती तंत्राची समाप्ती

Comments

Popular posts from this blog

तंत्र 2 मित्रसम्प्राप्तिः (अनुक्रमणिका)

॥ मित्रसम्प्राप्तिः ॥ (कथामुख)