1 हिरण्यक ताम्रचूडकथा

 

हिरण्यक ताम्रचूडकथा

दक्षिणेकडच्या राज्यांमधे महिलारोप्य नावाचं नगर आहे. नगरापासून थोडया अंतरावर श्री भगवान महादेवांचे मठरूपी देऊळ आहे. तेथे ताम्रचूड नावाचा एक सन्यासी रहात असे. नगरात भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करत असे. जेवण झाल्यावर जे काही अन्न उरत असे ते भिक्षापात्रात ठेऊन, तेथील खुंटीला अडकवून ठेऊन तो झोपत असे. सकाळी ते उरलेलं अन्न तेथील कामगारांना देऊन  मंदिराची झाडलोट, सडा संमार्जन, सजावट अशी कामे करायचा त्यांना आदेश देत असे.

(हिरण्यक उंदीर म्हणाला,) एक दिवस माझे नातलग मला म्हणाले,  दादा, ह्या मठात शिजवलेलं, रुचकर अन्न भिक्षापात्रात ठेऊन, उंदरांनी फन्ना उडवू नये म्हणून उंच खुंटीला अडकवून ठेवलेलं असतं. ते उंचावर असल्याने आम्ही खाऊ शकत नाही. पण दादा, तुम्ही पोचू शकणार नाही अशी एकही जागा नाही. उगीचच अन्नासाठी दाही दिशा कशाला फिराव्या? आपण जर मनावर घेतलत तर आपण आज तेथे जाऊन पोटभर अन्न खाऊ शकतो.

त्यांचा तो आग्रह पाहून त्या सगळ्यांच्यासोबत मी लगेचच तिथे पोचलो. तेथे पोचल्यावर मी वर उडी मारून ते अन्न नित्य नेमाने माझ्या सख्या सोबत्यांना, सवंगड्याना, माझ्या सेवकांना यथेष्ट देत असे. आणि नंतर मीही खात असे. सर्वांनी पोटभर खाल्ल्यावर आम्ही घरी येत असू. अशाप्रकारे नेहमीच मी तेथील अन्नावर ताव मारत होतो. तो संन्यासी त्या अन्नाची शक्य तेवढ्या उत्तम प्रकारे राखण करत असे, पण त्याला जरा झोप लागली की मी त्या भिक्षापात्रावर चढून माझा कार्यभाग आटोपत असे.

मला घाबरविण्यासाठी त्या सन्याशाने एकदा मोठाच खटाटोप केला. कुठुन तरी तो एक लांब चिरका बांबू घेऊन आला. मी/उंदीर आलो असेन ह्या भयाने झोपेत सुद्धा तो मधून मधून त्या चिरक्या बांबूने त्या भिक्षापात्रावर ठोकत असे. त्या बांबूचा फटका बसून जखमी होण्याच्या भयाने अनेकवेळा मी उपाशी पोटीच पळून जात असे. अशा प्रकारे कित्येक वेळेला माझी संपूर्ण रात्र त्या सन्याशाला तोंड देता देताच संपत असे.

एक दिवस त्या सन्याशाचा बृहत्स्फिक् नावाचा सन्यासी मित्र तीर्थयात्रा करत फिरत फिरत तेथे पोचला. आणि अतिथी म्हणून ताम्रचूडाच्या मठात आला. त्याला पाहून त्याच्या स्वागतासाठी ताम्रचूड आपल्या स्थानावरून उठून पुढे गेला. त्याचं अत्यंत विनयानी स्वागत करत, त्याच्या आदरातिथ्यात गढून गेला. रात्री गवताच्या चटईवर पडून दोघे झोपता झोपता एकमेकांशी धार्मिक विषयांवर गप्पागोष्टी करू लागले.

बृहत्स्फिक् अनेक विषयांवर बोलत असताना, अनेकवेळेला ताम्रचूडाचं लक्ष मात्र त्याच्या बोलण्याकडे नसून, मधून मधून चिरक्या बांबूने भिक्षापात्रावर मारत, उंदराला भीती दाखवण्याकडे असल्याने, बृहत्स्फिकाच्या बोलण्यावर तो अनेकवेळा काहीच प्रतिसाद देत नव्हता. किंवा  नुसतचं हुं हुं , हो हो करत होता.  त्याचं लक्ष मित्राच्या गप्पागोष्टी, धार्मिक कथा वा बोलण्यापेक्षा उंदरावरच केंद्रित झालं होतं.

त्याच्या कडून उत्साहाने, आनंदाने मनासारखा प्रतिसाद न येण्याने बृहत्स्फिक नाराज झाला.  ताम्रचूडाच्या अशा यांत्रिक  थंड प्रतिसादाने त्याला रागही आला तो म्हणाला, ‘‘ ताम्रचूडा, मी तुला माझा चांगला मित्र समजत होतो. पण आज माझ्या लक्षात आलं की, तू माझा खरोखरीचा मित्र नाहीस. मी तुझ्याशी इतकं बोलतोय पण तू मात्र माझ्याशी प्रेमाने सोडाच पण साधं नीट उत्तर द्यायलाही  तयार नाहीस. ही रात्र कशीबशी सरली की मी तुझा मठ सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून जाईन. बरोबरच म्हणतात, ‘‘अरे मित्रा ये ये!! ह्या आसनावर बैस. का बर तू इतक्या दिवसांनी दिसतो आहेस? काय खबरबात? तू ठिकठाक आहेस नं? किती वाळलास रे! तुला पाहूनच खूप खूप आनंद झाला. आपले जवळचे आप्तइष्ट वा प्रिय मित्र घरी आल्यावर लोक अत्यंत प्रसन्न होऊन त्याला आदर व प्रेमाने असे कुशलमंगल विचारणारे प्रश्न विचारतात; आणि आपल्या आलेल्या मित्राला आह्लादित करतात. आशाच प्रेमळ, आगत्यशील लोकांकडे माणसाला अतिथी/ पाहुणे म्हणून जायला पाहिजे. आणि कुठलाही किंतु न ठेवता अत्यंत मनमोकळेपणाने रहायला पाहिजे. (67)

एह्यागच्छ समाश्रयासनमिदं कस्माच्चिराद् दृश्यसे?

का वार्ता ह्यति दुर्बलोऽसि कुशलं, प्रीतोऽस्मि ते दर्शनात् ।

एवं ये समुपागतान्प्रणयिनः प्रह्लादयन्त्यादरा,

त्तेषां युक्तमशङ्कितेन मनसा हर्म्याणि गन्तुं सदा ।। 67 ।।

यावे स्वागत हो असोचि तुमचे, ह्या आसनी बैसणे

आहे हालहवाल काय तुमचा, का वाळलासे बरे

वर्षांनी तुज पाहुनी कितिक रे आनंद झाला मनी

आहे ना सगळेच ठीक घरचे, बोले पहाताक्षणी ।।67.1।।

 

ऐसी आपुलकी जया मनि असे येता घरी पाहुणे

ऐसे स्वागत जो प्रसन्न-वदने आनंददायी करे

ऐसी जोचि विचारपूस करितो आत्मीयतेने खरी

निःसंकोचपणे निवास करणे ऐशा सख्याच्या घरी ।। 67.2 ।।

त्या उलट एखाद्याच्या घरी गेल्यावर तो जर इकडे तिकडे भलतीकडेच किंवा आकाशाकडे पाहून आपलं लक्ष नाही असं दाखवत आलेल्या अतिथीची उपेक्षा करत असेल तर त्याच्याकडे न गेलेलं बरं. त्याच्या घरी जाउन राहणारा म्हणजे  एखादा बिनशिंगाचा नंदिबैलच समजला पाहिजे. (68)

गृही यत्रागतं दृष्टो दिशो वीक्षेत वाऽप्यधः ।

तत्र ये सदने यान्ति ते श्रृंगरहिता वृषाः ।। 68 ।।

अतिथीच घरी येता । दाखवी लक्ष ना असे

उपेक्षूनच आकाशी । इकडे तिकडे बघे ।। 68.1 ।।

त्याच्या घरीच जो जाई । अतिथी बनुनी कुणी

समजावा च बैलोबा । शिंगाविणच तो मुळी ।। 68.2 ।।

एखादा गृहस्थ  आलेल्या अतिथीच्या स्वागताला उठतही नसेल, वा गोड शब्दात त्याची विचारपूस करत नसेल, त्याच्या सोबत सुखदुःखाच्या गोष्टी करत नसेल तर त्याच्या भव्य बंगल्यात न जाणेच बरे. (69)

नाऽभ्युत्थानक्रिया यत्र नालापा मधुराक्षराः ।

गुणदोषकथा नैव तत्र हर्म्ये न गम्यते ।। 69 ।।

उठुनी स्वागता ना ये । विचारपूस ना करे

दोन गोडहि शब्दांचे । बोलण्या वावडे असे ।। 69.1 ।।

गोष्टी जो सुखदुःखाच्या । करे ना पाहुण्यासवे

अतिथीने घरी त्याच्या । न जाणे हे बरे असे ।। 69.2 ।।

तुला रहायला एक मठ काय मिळाला तर तुला इतका गर्व झाला आहे की, तू आपल्या मित्रालाही विसरलास. इतकच काय! मित्राच्या अपार स्नेहालाही विसरलास. तुझ्या हे लक्षात आलेलं दिसत नाही की ह्या मठाच्या रूपाने तू तुला नर्काकडे घेऊन जाणारा मार्ग मोकळा केला आहेस. असच म्हटलं ही आहे. जर नरकातच जावं असच तुझ्या मनात असेल तर एक वर्ष पौरोहित्य करावं आणि त्याहीपेक्षा लवकर तेथे पोचण्याची इच्छा असेल तर फक्त तीन दिवसच मठाधीश बनून दिवसरात्र मठाचि चिंता करत (त्या गादीवर) बसून रहावं. तू इच्छिलेलं फळ तुला तात्काळ मिळेल. (70)

नरकाय मतिस्ते चेत्पौरोहित्यं समाचर ।

वर्षं यावत्किमन्येन मठचिन्ता दिनत्रयम् ।। 70 ।।

नरकात रहाण्याची । मनी इच्छा वसे जरी

वर्ष एक तरी बाबा । पौरोहित्यचि तू करी ।।

ह्याहुनी शीघ्र वाटेची । फलप्राप्ती मला हवी

व्हावे मठाधिपती तूची । फक्त दिवस तीनची ।।

बुडोनी मठचिंतेत । रहा तिन्ही त्रिकाळची ।

मिळेल वांछिलेले ते । फळ तात्काळ रे तुसी ।।70

त्याचे ते असे जळजळीत शब्द ऐकून ताम्रचूड अत्यंत घाबरून गेला. आणि म्हणाला, नाही नाही!!! भगवान् असं बोलू नका. आपल्यासारखा मला अजून दुसरा कोणी प्रिय मित्र नाही. आपण बोलत असतांना वारंवार माझं लक्ष दुसरीकडे जात होतं आणि अनेक वेळा आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष होत होतं त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. हा उंदीर मी जेवढ्या शक्य असेल तेवढ्या उंच जागी ठेवलेल्या भिक्षापात्रावर ही उडी मारून चढून जातो आणि मी सांभाळून ठेवलेल्या उरलेल्या अन्नाचा पार फन्ना उडवून जातो.  मी सकाळी कामगारांकडून त्या अन्नाच्या बदल्यात मठाची सफाई इत्यादि जी कामं करवून घेत होतो ती ही आता अन्नाच्या अभावाने व्यवस्थितपणे रोज होत नाहीत. म्हणून त्या उंदराला घाबरविण्यासाठी  ह्या चिरक्या बांबूने रात्रभर वारंवार मि ते भक्षापात्र ठोकत राहतो. आपल्याकडे माझं लक्ष नसण्याचं दुसरं कुठलं कारण नाही. बगा तर खर! ह्या उंदरानी उंच उड्या मारण्यात माजरांना आणि वानरांनाही मागे टाकलं आहे.

बृहत्स्फिक् म्हणाला,  ‘‘तुला त्या उंदराचं बीळ कुठे आहे ते माहीत आहे का’’?

ताम्रचूड म्हणाला, ‘‘भगवन्!  मला नक्की माहित नाही.’’

त्यावर बृहत्स्फिक् म्हणाला, ‘‘नक्कीच त्याचं बीळ एखाद्या मोठया खजिन्यावर  असणार. त्या धनाच्या ऊबेनीच तो इतक्या सहपणे अशा उंच उंच उड्या मारत आहे. म्हटलच आहे, मित्रा, (धनाची ऊब ही फार विलक्षण असते.) धनातून प्राप्त होणारी ऊब माणसाला अत्यंत तेजस्वी बनविते. आणि त्यातून त्याचा उपयोग जर दान आणि उपभोग आणि चांगल्या कामांसाठी होत असेल तर मग काय विचारता! (तो माणूस नक्कीच तळपत राहतो.)

उष्माऽपि वित्तजो वृद्धिं तेजो नयति देहिनाम्

किं पुनस्तस्य सम्भोगस्त्यागकर्मसमन्वितः ।। 71 ।।

धनाची ऊब ती मोठी । नरा तेजस्विता देई

धनाचा व्यय सन्मार्गी । नरा तळपवी जनी ।। 71

अजूनही कोणीतरी म्हटलं आहे,  ‘‘शांडिल्य गोत्रीय स्त्री जर आपले साफसूफ करून कांडलेले, पाखडलेले तीळ जर साफ न केलेल्या तिळांच्या बदल्यात द्यायला तयार होत असेल तर नक्कीच त्यापाठीमागे काही विशेष कारण असेल.’’ (72)

नाऽकस्माच्छाण्डिली मातर्विक्रीणाति तिलैस्तिलान् ।

लुञ्चितानितरैर्येन हेतुरत्र भविष्यति ।। 72

प्रक्रिया नच केलेल्या । तिळांच्या बदल्यातही

जरी शाण्डिल्य गोत्री स्त्री । विकते स्वच्छ तिळही ।। 72.1 ।।

काळेबेरेचि जाणावे । व्यवहारात खासची

कारणाविण ना काही । घडे ऐसी कृती कधी ।। 72.2 ।।


ताम्रचूड म्हणाला, ‘‘ही काय कथा आहे’’?

बृहत्स्फिक् सांगू लागला,  

-------------------------------

खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा -


                                  मित्रसम्प्राप्तिः कथामुख

 हिरण्यक-ताम्रचूड कथा

 तिलचूण-विक्रय कथा

 शबर-शूकर कथा

 वणिक्पुत्र कथा

 मन्दभाग्य सोमिलक कथा

 वृषभानुगशृगाल कथा

 मित्रसम्प्राप्ती तंत्राची समाप्ती


Comments

Popular posts from this blog

तंत्र 2 मित्रसम्प्राप्तिः (अनुक्रमणिका)

॥ मित्रसम्प्राप्तिः ॥ (कथामुख)

3 शबर-शूकर कथा