7 ॥ मित्रसम्प्राप्तिः ॥ कथा समाप्ति

 

7   मित्रसम्प्राप्तिः ॥ कथा समाप्ति


 


तर-- प्रिय मित्रा, हिरण्यका! हे जाणल्यावर तरी हातून गेलेल्या सम्पत्तीसाठी इतकं व्यथित होणं, हळहळत राहणं वा झाल्या गोष्टीबद्दल पश्चाताप करत राहणं योग्य नाही. कधी कधी धन असूनही त्याचा उपभोग घेता येत नाही वा उपभोग घेणं हे काही कारणाने अत्यंत कठीण, असाध्य होऊन बसतं. ज्या सम्पत्तीचा काहीही उपयोग करता येत नाही वा जी कुठल्या कामी येत नाही ती सम्पत्ती, असूनही अस्तित्वात नाही असेच समजले पाहिजे. ती नसल्यातच जमा असल्यासारखी असते.

विचार करून बघ, जर एखादी व्यक्ती घरामध्ये गाडून, पुरून ठेवलेल्या धनामुळे स्वतःला धनी, श्रीमंत समजत असेल, तर त्याने पुरून ठेवलेल्या त्या धनाच्या जोरावर आपणही आपल्याला धनाढ्य का समजू नये?(154)

गृहमध्यनिखातेन धनेन धनिनो यदि ।

भवामः किं न तेनैव धनेन धनिनो वयम? ।। 154

घरात पुरलेल्या त्या । धनाच्याच बळावरी ।

धनाढ्य आपणा मानी । व्यक्ती कोणी जरी तरी ।। 154.1 ।।

त्याच त्या पुरलेल्या त्या । धनाच्याच बळावरी ।

श्रीमंत का न मानावे । आपणे आपणासची ।। 154.2 ।।

मित्रा! तसाही विचार केला तर, आपण मिळवलेली सम्पत्ती खर्च करणं हेच त्याचं योग्य रक्षण करणं आहे. तळ्यातल्या पाण्याला पाट काढून ते सुदूर शेताशेतात पोचवल्यानेच त्याची सुरक्षा ठेवली असं म्हणता येईल. त्याचा जर असा योग्य विनियोग झाला नाही तर साठून राहिलेलं ते पाणी शेवाळं, घाण वाढून त्याला दुर्गंधी येऊ लागेल.(155)

उपार्जितानामर्थानां त्याग एव हि रक्षणम् ।

तडागोदरसंस्थानां परीवाह इवाम्भसाम् ।। 155

तलावाच्याच पाण्याला । पाटाने दूर नेऊनी

सुदूरच्याच शेतांना । त्या जले सिंचिले जरी ।।155.1 ।।

तरी त्याने तलावाचे । होते रक्षण ते जसे

तसे दान व खर्चाने। धनवर्धन होतसे ।। 155.2 ।।

आपण मिळवलेल्या धनाचा योग्य विनयोग तरी केला पाहिजे नाहीतर ते दान तरी देऊन टाकलं पाहिजे. मधमाशी मोठ्या कष्टाने मध जमवते. तो सुरक्षित ठेवते पण त्याचा उपयोग तिला फारच कमी होतो. माणूस वा अस्वलासारखे इतर प्राणी तो मध खातात, वापरतात, काढून घेतात.(156)

दातव्यं भोक्तव्यं धनविषये सञ्चयो न कर्तव्यः ।

पश्येह मधुकरीणां सञ्चितमर्थं हरन्त्यन्ये ।। 156

उपभोग स्वतः घ्यावा । सत्पात्री दान वा करा ।

नका साठवु सम्पत्ती । योग्य तो विनियोग हा ।।156.1 ।।

मधमाशा चिकाटीने । साठवीती मधा जरी

काढून घेतला जातो । माणसांकडुनी परी ।। 156.2 ।।  

  अजूनही विचार करून पाहिला तर पटेल की,

धनाचा उपयोग/व्यय तीन प्रकारांनी होतो. एकतर दान द्यावे, दुसरे म्हणजे त्याचा उपभोग घ्यावा. तिसरा प्रकार म्हणजे, ते नष्ट पावते. जो कोणी दानही देत नाही वा सम्पत्तीचा उपभोगही घेत नाही; त्याने मिळविलेल्या धनाची तिसरी अवस्था होते. म्हणजे ते नष्ट पावते. (157)

( वृत्त – आर्या)

दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य ।

यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति ।। 157

धनाच्या विनियोगाचे । मार्ग तीनच ते खरे ।

दान वा उपभोगावे । नष्ट होतेच वा स्वये ।। 157.1 ।।

जो मार्ग पहिले दोन । अवलम्बे न सत्वरी ।

सम्पत्तीचीच त्याच्या हो । होतसे तिसरी गती ।। 157.2 ।।

हे लक्षात घेऊन, सारासार विचार करणार्‍या, दूरदर्शी, दक्ष माणसाने फक्त साठवून ठेवण्यासाठी, संचय करण्यासाठी किंवा पुरून ठेवण्यासाठी धनार्जन करू नये. कारण असं नुसतच साठवून ठेवलेलं धन नंतर चिंतेचा विषय बनतं. दुखःदायक ठरतं. कोणी शहाण्या माणसाने योग्यच म्हटलं आहे,--

जो आपल्या पत्नी, मुलांना उन्हाळ्यात कडक उन्हाने कष्ट होऊ नयेत, त्यांना सुखं मिळावं, थंडावा लाभावा, म्हणून त्यांच्या सुखाच्या आशेने स्वतः अग्नी सेवन करतो/सहन करतो (म्हणजे कडक उन्हाचा ताप सहन करतो ) त्याचा उद्देश सफळ होत नाही आणि त्याला प्रसन्नताही लाभत नाही. म्हणजे, त्याने एकट्याने अग्नी सेवन करून, सहन करून रणरणत्या वैशाखाच्या उन्हावर काहीही परिणाम होत नाही. आणि त्याने एकट्याने पत्नीमुलांसाठी फक्त कष्ट आणि कष्टच सोसून तेही सुखी होत नाहीत ना तो सुखी होऊ शकतो. (158)

धनादिकेषु खिद्यन्ते येऽत्र मूर्खाः सुखाशया ।

तप्ता ग्रीष्मेण सेवन्ते शैत्यार्थं ते हुताशनम् ।। 158 ।।

परिवारास ना व्हावा । ग्रीष्माचा त्रासही जरा

म्हणून सोसतो अग्नी । द्याया शीतलता तया ।। 158.1 ।।

अशा मूर्खासमा जोची । कष्टवी देह आपुला

मुले, पत्नी, धनासाठी । सुखी होईल तो कसा? ।। 158.2 ।।

खरं सांगायचं तर मुबलक सम्पत्ती मिळूनही माणूस सुखी होतोच असं नाही. पण प्राप्त करून घेतलेल्या महान गुणांमुळे जे आन्तरीक सुख, जो सन्तोष लाभतो तो माणसाला खरं सुखी बनवतो. साप वारा पिऊनही जगतात पण कोणी त्यांना दुर्बळ म्हणत नाहीत. वाळलेलं गवत खाऊन राहणारा हत्ती बलवानच असतो. आणि वनात राहणारे ऋषीमुनी आपला निर्वाह वनात मिळणार्‍या कन्दमुळं, फळं हयांच्यावर करतात. ही हृदयातील संतोष वा तृप्ततेची भावना हीच मोठी धनदौलत असते. मोठा ठेवा असतो. (159)

( वृत्त – वसन्ततिलका )

सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते,

शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति ।

कन्दैः फलैर्मुनिवरा गमयन्ति कालं,

सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम् ।। 159 ।।

वारा पिऊन जरि राहति नागसर्प

सामर्थ्यहीन नच ते असती जहाल

खातीच शुष्क गवता गज ते विशाल

अंगी असून बळ, ताकद ती अफाट ।। 159.1 ।।

रानातली फळमुळे मुनि भक्षितात

ज्ञानप्रभाव असुनी जनमानसात ।

सन्तोष हाच खजिना बहुमूल्य ऐसा

सामर्थ्यवान मनुजा नित लाभलेला ।। 159.2 ।।

तृप्त, शांत मनाच्या महाभागांना सन्तोषरूपी जे अमृत प्राप्त होतं ते सौख्यरूपी धन; धनाची हाव धरून, धनाच्या आशेने आज इकडे तर उद्या तिकडे असं वणवण भटकणार्‍या धनलोभ्यांना कुठून मिळणार? (येथे धनाची हाव, लोभ आणि त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेल्या लोभी माणसात आणि पराक्रमी, एखाद्या मोठ्या उद्देशासाठी धडपडणारा उद्योगी माणूस ह्यात फरक आहे. ) (160)

( अनुष्टभ् छंद - श्लोक )

सन्तोषामृततृप्तानां यत्सुखं शान्तचेतसाम् ।

कुतस्तद्धनलुब्धानामितश्चेतश्च धावताम्? ।। 160 ।।

सन्तोष-अमृता प्याले । समाधानीच जे नर

त्या शांतचित्त लोकांना । सुख लाभे चिरंतन ।। 160.1 ।।

सुख ते लाभणे कैसे । लोभी लोकांस संभव

धावती जे धनामागे । फुटेतो उरि तोवर ।। 160.2 ।।

अमृताच्या समान असलेला आंतरिक सन्तोष लाभलेल्या लोकांना कायम परमानन्दाची प्राप्ती होते. त्याउलट जे जी परिस्थिती असेल त्यात वा कितीही ऐश्वर्य मिळालं तरी असमाधानी असतात, सतत न मिळालेल्या ऐश्वर्यासाठी झुरत राहतात ते कायम दुःखी राहतात. त्यांचं मन कायम न मिळालेल्या सुखप्राप्तीसाठी झुरत राहतं. (161)

पीयूषमिव सन्तोषं पिबतां निवृतिः परा ।

दुःखं निरन्तरं पुंसामसन्तोषवतां पुनः ।। 161 ।।

प्राप्त झाली जयां श्रेष्ठ । सुधा संतोषरूप ती

परमानंद मिळे त्यांना । असंतुष्टास दुःखची ।। 161 ।।

अहो! ढगामुळे एकदा का सूर्य झाकला गेला की आपोआपच त्याची किरणेही झाकली जातात. (सर्वत्र पसरलेल्या किरणांना झाकायचा अजून वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.) त्याचप्रमाणे एकदा का मनाला आवर घातला, मनाला लगाम घातला की बाकीची इंद्रिये आपोआपच त्यांचा स्वच्छंदीपणा सोडून शिस्तीने वागू लागतात. (162)

निरोधाच्चेतसोऽक्षाणि निरुद्धान्यखिलान्यपि ।

आच्छादिते रवौ मेघैराच्छन्नाः स्युर्गभस्तयः ।। 162 ।।

झाकता सूर्य मेघांनी । जाती किरण झाकले

मना आवरिता तैसे । होती निश्चल इंद्रिये ।। 162 ।।

आपल्या सर्व इच्छांवर, इंद्रियांवर ताबा मिळवणारे ऋषी साधू संत आपल्या कामना आपल्या वासनांवर ताबा मिळवणे हेच मोठे आरोग्य मानतात. अग्नीच्या सेवनाने कोणाची तहान शमत नाही; त्याचप्रमाणे, अमूप सम्पत्ती साठवून सर्व इच्छा, कामनांची पूर्ती होत नाही. मनाला आता पुरे असे वाटत नाही. मनाला अलिप्तता प्राप्त होत नाही. वैराग्य येत नाही. (उलट भोगांची लालसा अजून अजून वाढतच जाते.)(धन सम्पत्ती जणु अग्नीप्रमाणे असते. अग्नीत कितीही समिधा घातल्या तरी अग्नी अजून अजून भडकतो त्याप्रमाणे ऐश्वर्याच्या उपभोगाने तृप्ती न येता हाव वाढत जाते.)  (163)

वाञ्छाविच्छेदनं प्राहुः स्वाथ्यं शान्ता महर्षयः।

वाञ्छा निवर्तते नाऽर्थे  पिपासेवाग्निसेवनैः ।। 163 ।।

काबूत असणे सारी । स्वतःची इंद्रिये भली

हेची उत्तम आरोग्य । वदती निग्रही मुनी ।। 163.1 ।।

भोगून धन कोणाची । हाव का संपते कधी ।

तृषा संपे न कोणाची । अग्नीच्या सेवने कधी ।। 163.2 ।।

(एकदा का धनाची चटक लागली की ) धनप्राप्तीसाठी माणूस (काय वाट्टेल ते करत राहतो) सत्शील, आदरणीय व्यक्तीची  निंदा करतो वा निंदनीय अश्लाघ्य व्यक्तीची तोंड फाटेपर्यंत स्तुती करतो. धनलाभासाठी योग्य अयोग्य, निंद्य अभिनंदनीय, त्याज्य-विहीत काहीही करायला मागेपुढे बघत नाही. (164)

अनिन्द्यमपि निन्दन्ति स्तुवन्त्यस्तुत्यमुच्चकैः ।

स्वापतेयकृते मर्त्याः किं किं नाम न कुर्वते? ।। 164 ।।

सभ्याची करिती निंदा । असभ्यास प्रशंसती

माणसे धनलोभाने । योग्यायोग्य न पाहती ।।164

काही धर्म कार्ये करावीत हया हेतूनेही माणूस पैसे साठवत असतो. दान, देवकार्य अशा पुण्यसंचय  करण्याच्या अपेक्षेने धन साठवण्यापेक्षा सुद्‌धा निरीच्छताच जास्त बरी. आधी चिखलात जाऊन येउन मग पाय धूत बसण्यापेक्षा चिखलापासून दूर रहावे हे जास्त बरे नाही का? (165)

धर्मार्थं यस्य वित्तेहा वरं तस्य निरीहता ।

प्रक्षालनाद्धि पङ्कस्य दूरादस्पर्शनं वरम् ।। 165 ।।

धर्म कार्य करायासी । पैसे साठविती कुणी ।

अनासक्ती तयाहूनी । कल्याणकर श्रेष्ठची ।। 165.1 ।।

मुद्दाम चिखलामध्ये । जाऊनी नंतरी जसे

धुणे पायचि जैसे ते । तैसे धर्मार्थ खर्चणे ।। 165.2 ।।

सत्पात्री दान देणं हेच सम्पत्तीचं रक्षण आहे. त्यामुळे धन योग्य हाती सुरक्षित राहतं. दानासारखा दुसरा खजिना नाही. आणि लोभ, हव्यास ह्या सारखा दुसरा शत्रू नाही. सद्वर्तन आणि चारित्र्यसम्पन्नता ह्या सारखा  अनमोल दागिना नाही तर मनाचा सन्तोष ह्या सारखं उत्तम धन नाही. (166) 

( वृत्त - उपजाति/इंद्रमाला )

दानेन तुल्यो निधिरस्ति नाऽन्यो,

लोभाच्च नान्योस्ति रिपुः पृथिव्याम् ।

विभूषणं शीलसमं  न चाऽन्यत्

सन्तोषतुल्यं धनमस्ति नान्यत् ।। 166

दानासमा दुजा नाही । खजिना धरणीवरी

लोभासमा दुजा नाही । शत्रू पृथ्वीवरी कुणी ।।

सदाचाराविना नाही । अलंकार मनोहरी ।

समाधानाविना नाही । अमूल्य धन काहिही ।। 166

दारिद्र्य म्हणजे, धनाची न्यूनता वा पैसे नसणं ही नाही. तर याचना, दुसर्‍याने काही द्यावे ह्यासाठी त्याच्यापुढे तोंड वेंगाडून, हात पसरून याचना करायला लागणे हे खरं दारिद्र्याचं मूर्तिमंत रूप आहे. भगवान शंकरांकडे एका वृदध नंदीपलिकडे(जरद्गव)  कुठलंही धन नसूनही त्यांना सर्व जण देवांचेही देव महादेव वा परमेश्वर म्हणतात.(कारण ते कोणापुढे याचना करत नाहीतच पण सर्व देव मात्र त्यांच्या कामनापूर्तीसाठी, रक्षणासाठी महादेवाची करूणा भाकत असतात, त्याच्यापुढे हात पसरून उभे असतात.)  (167)

( अनुष्टुभ् )

दारिद्र्यस्य परा मूर्तिर्याच्ञा न द्रविणाल्पता ।

जरद्गवधनः शर्वस्तथाऽपि परमेश्वरः ।। 167 ।।

अभाव धनद्रव्याचा । हे ना दारिद्र्य न्यूनता

लाचार याचना ही तो । मूर्तिमंत दरिद्रता ।।

संपत्ती वृद्ध नंदी ही । शिवाची असली जरी

तरी संबोधती त्यासी । परमेश्वर ह्या जगी ।।167

एखादा सभ्य सुसंस्कृत श्रेष्ठ पुरूष एखादेवेळेस (सकृत्) संकटाच्या खाईत कोसळला तर खाली पडलेलेला चेंडू जसा लगेचच परत उठून वर येतो त्याप्रमाणे  संकटातून लगेचच सावरून परत स्वतःचा उत्कर्षच करून घेतो. पण एखादा उथळ, असंस्कृत  माणूस संकटात सापडला तर तो ढेकळाप्रमाणे(मृत्पिण्ड) तुटून फुटून जातो. परत उभारी धरू शकत नाही. (168)

सकृत्कन्दुकपातेन पतत्यार्यः पतन्नपि ।

तथा पतति मूर्खस्तु मृत्पिण्डपतनं यथा ।। 168

पडलेला जसा येतो । चेंडू उसळुनी वरी

संकटी पडता तैसा । नरश्रेष्ठ त्वरे उठी ।।

चिखलाचा परी गोळा । राहे पडुन भूवरी

संकटातून तैसाची । उभारी मूर्ख ना धरी ।। 168

 मन्थरक अजून बोलला, ‘‘हे  जाणून घेऊन हे शहाण्या  मित्रा, हिरण्यका ! तू आनंद मान.’’

मन्थरकाचे बोल ऐकून कावळा म्हणाला, हिरण्यका! हा मन्थरक जे काही म्हणत आहे ते तू तुझ्या मनात खोलवर रुजव. नाहीतर म्हटलच आहे की,

हे राजा! कायम गोड गोड बोलणारे ऐकणार्‍यालाही प्रिय वाटेल अशा  मिठ्ठास वाणीचे लोक सहज उपलब्ध असतात. पण प्रसंगी कडु वाटलं तरी हिताचं बोलणारा वक्ता आणि ते ऐकून घेणारा श्रोता हे दोघेही सहजासहजी दिसून येत नाहीत ते दोघे फार दुर्लभ असतात. (169)

सुलभाः पुरुषाः राजन् !  सततं प्रियवादिनः ।

अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः ।। 169 ।।

अनेक असती राजा ! स्तुतिपाठक नित्य ते।

भेटती सहजी जेची । गोडबोलेच फक्त जे ।

निर्भीड स्पष्ट श्रेयाचे । ऐसे कडक बोलणे

सुनावेल असा वक्ता । आणि श्रोता न लाभणे ।।169

जे (खरोखरच्या काळजीने) हिताचे, कल्याणाचे, (शाश्वत उन्नतीचे) पण खडे बोल सुनवायलाही कमी करत नाहीत, तेच खरे मित्र असतात. बाकी सर्व मित्र हे नामधारी म्हणजे फक्त नावाचेच मित्र असतात. त्यांना मित्राच्या कल्याणाची चिंता नसते. (170)

अप्रियाण्यपि पथ्यानि ये वदन्ति नृणामिह ।

त एव सुहृदः प्रोक्ता अन्ये स्युर्नामधारकाः ।। 170 ।।

जे ना रुचेल मित्रासी । हितावह असे परी।

बोले स्पष्ट! सुहृद् तोची । बाकीचे ‘‘नाममित्र’’ची ।।170

ते असं बोलत असतानाच चित्रांग नावाचं हरीण वेगाने पळत त्या तलावाच्या काठी आलं. कोणी पारधी त्याचा पाठलाग करत असल्याने ते अत्यंत घाबरलं होतं. त्याला तसं पळत येताना पाहून लघुपतनक कावळा पटकन उडून झाडावर  बसला.  हिरण्यक उंदीर शेजारीच पडलेल्या गवताच्या काटक्याकुटक्यांमधे  दडून बसला तर मंथरक कासव तलावात निघून गेलं.

काही काळाने धावत आलेलं ते हरीणच आहे ही खात्री झाल्यावर मंथरक कासवाला उद्देशून लघुपतनक कावळा म्हणाला, मित्रा मंथरका!  ये ये बाहेर ये. हे तर एक हरीण तहानेनी व्याकूळ होऊन पाणी पिण्यासाठी आलेलं दिसतय. आणि आता ते पाण्यात शिरलय! ही काही कुठल्या माणसाची चाहूल वाटत नाही.

त्याचं ते बोलणं ऐकून  समयोचित आपले विचार व्यक्त करत मन्थरक कासव म्हणालं, ‘‘मित्रा, ज्या प्रकारे हे हरीण धाप लागल्याप्रमाणे वारंवार निःश्वास सोडत आहे, घाबरलेल्या, संभ्रमित नजरेने वारंवार मागे वळून बघत आहे ते पाहिल्यावर  ते तहानलेलं नसून निश्चितपणे ते पारध्यांच्या तावडीतून सुटून आल्यासारखं दिसतय. तू नीट सर्वत्र बघून घे की ह्याच्या पाठीमागे फासेपारधी तर येत नाहिएत न? कारण असं म्हटलच आहे की,



‘’मनुष्य जर जोरजोरात निःश्वास टाकत असेल, (त्याच्या श्वासांची गती वाढली असेल) तो त्याची नजर स्थिर नसून तो घाबरून सारखा इकडेतिकडे बघत असेल, तर त्याचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही असं समजलं पाहिजे. तो कुठल्यातरी संकटात सापडला असला पाहिजे.’’ (171)

भयत्रस्तो नरः श्वासं प्रभूतं कुरुते मुहुः ।

दिशोऽवलोकयत्येव व स्वाथ्यं व्रजति क्वचित् ।।171

भयभीत कुणी घेई । वारंवारचि श्वास जो

निःश्वास सारखा सोडी । गेला डगमगून जो ।। 171.1 ।।

भये अस्थिर दृष्टीने । पाहे सर्व दिशी नित

अस्वस्थ सारखा तोची । विचलीत असुरक्षित ।। 171.2 ।।

ते ऐकून चित्रांग नावाचं ते हरीण म्हणालं, ‘‘ मंथरका, तू माझ्या भीतीचं कारण बरोबर ओळखलस. मी पारध्यांचे बाण चुकवत चुकवत मोठ्या कष्टाने येथपर्यंत पोचलो आहे. माझ्या बरोबरच्या कळपातल्या बहुतेक सर्व हरीणांना ह्या पारध्यांनी ठार मारलं असावं. मी शरण आलो आहे.  जिथे ते पारधी पोचू शकणार नाहीत आणि माझ्या जीवीताला धोका नसेल, अशी एखादी सुरक्षित जागा मला लवकर सांग.’’

ते ऐकून मन्थरक कासव म्हणाले, ‘‘अरे चित्रांगा! नीतीशास्त्रात काय सांगितलं आहे ते ऐक. शत्रू दिसल्यावर त्याच्या भयातून मुक्ती मिळविण्यासाठी दोन उपाय आहेत. पहिला म्हणजे हस्तसंचालन म्हणजे हात वेगाने हलवा म्हणजेच नेटाने युद्ध करा आणि दुसरा उपाय म्हणजे पायांना वेग द्या म्हणजे लवकरात लवकर पळून जा. (172)

द्वावुपायाविह प्रोक्तौ विमुक्तौ शत्रुदर्शने ।

हस्तयोश्चालनादेको द्वितीयः पादवेगजः ।। 172

वैरी येताचि सामोरा । सुटका दो उपायांनी

लढण्या सिद्ध व्हावे वा । पळावे प्राण रक्षुनी ।। 172

म्हणून म्हणतो, तो लुच्चा पारधी जोवर येथे पोचलेला नाही तोवरच येथील दाट वनात वेगाने पळून जा.’’

तोपर्यंत लघुपतनक कावळा त्वरेने तेथे पोचला आणि म्हणाला, ‘‘अरे मन्थरका, ते सर्व फासेपारधी भरपूर मांस घेऊन आपापल्या घरांकडे निघाले आहेत. आता काही भय दिसत नाही. मित्रा चित्रांगा! तू आता निश्चिंतपणे वनात जाऊ शकतोस.’’

त्यानंतर ते चौघेही एकमेकांशी मैत्री करून त्या तलावाच्या काठी, झाडाच्या सावलीत दुपारी एकत्र येऊन गप्पागोष्टी करत सुखाने आपला काळ व्यतीत करू लागले. बरोबरच म्हटलं आहे,

सुभाषितं ही इतकी रसाळ असतात की मनाला मोहविणार्‍या त्या सुभाषितांचा आस्वाद घेतांना आंनदातिशयाने अंग रोमांचित होऊन जातं. जणु काही रोमांचयुक्त कंचुकीच अंगात घातल्याची अनुभुती माणसाला मिळते. स्त्रीसमागमामुळे मिळणार्‍या सुखाचा उपभोग न घेताही जणु काही मदविव्हल नारीचा उपभोग घेतल्याचं अनुपम सुख सुभाषितांच्या रसास्वादाने मिळतं. (173)  

सुभाषितरसास्वादबद्धरोमाञ्चकञ्चुकाः ।

विनाऽपि सङ्गमं स्त्रीणां सुधियः सुखमासते ।। 173

सुभाषित रसाचा जो । आस्वाद घेतसे कुणी

रोमांचयुक्त कामाची । चोळी अंगी तया जशी

मदविव्हल नारी ना । भोगिताही असे सुखी

स्वर्गीय सौख्य भोगीतो । सुमती तो सदा सुखी ।।173

जो अमूल्य अशा सुंदर सुंदर सुभाषितरूपी द्रव्याचा संग्रह करत नाही; तो विचारांचं आदानप्रदान करण्याच्या प्रसंगी, जिथे एखाद्या प्रस्तावयज्ञामधे (मिटिंग) प्रत्येकाला आपले विचार मांडणं अनिवार्य असतं तेथे आपलं काय योगदान (दक्षिणा) देणार? (आपले विचार सुयोग्य प्रकारे व्यक्त करताना त्या विचारांना पुष्टी देणारी अनेक सुंदर सुभाषितं वापरली तर तो विचार श्रोत्यांच्या मनावर ठसतो. चांगला बिंबतो. वक्त्याजवळ सांगण्यासारख काही नसेल तर तो सर्वांसमोर काय बोलणार? त्याची सर्वांसमोर नाचक्की होतेच आणि तो सर्वांच्या विनोदाचा विषय होतो. ) (174)

सुभाषितमयद्रव्यसङ्ग्रहं न करोति यः ।

स तु प्रस्तावयज्ञेषु कां प्रदास्यति दक्षिणाम् ।। 174

( प्रस्तावयज्ञ – विचारांचे आदानप्रदान, संभाषण ज्यात प्रत्येक अन्तर्वादी भाग घेतो.)

करे सुभाषितांचा ना । संग्रह जो अमोलिका

वादविवाद स्पर्धेची । काय देईल दक्षिणा ।। 174

तसेच, एकदा ऐकलेली सुयोग्य वचने, सुविचार मौलिक मतं ज्याच्या लक्षात रहात नाहीत; अभ्यास नसल्याने ज्याची स्वतःची मतं निर्माण झाली नाहीत; ज्याला स्वतःचे विचार योग्य रीतीने मांडता येत नाहीत; ज्याने आपल्या विचारांना पुष्टी देणारी सुभाषितं लिहून त्यांची वही जवळ ठेवली नाही; त्याच्याकडे अशा सुभाषित रत्नांचा संग्रह तरी कसा असेल? (असा माणूस खरा दरिद्री असतो.) (175)

सकृदुक्तं न गृह्णाति स्वयं वा न करोति यः ।

यस्य सम्पुटिका नास्ति कुतस्तस्य सुभाषितम् ।। 175

एकदा सांगुनी ज्याच्या । राहे लक्षात ना कधी

विचार मांडता ना ये । स्वतःचे ज्यास वा कधी

वा ज्याच्या जवळी नाही । लेखी सुभाषिते वही

कैसा सुभाषितांच्या तो । उत्कृष्ट संग्रहा करी ।। 175

एकदिवस गप्पागोष्टींच्या वेळी चित्रांग आला नाही. त्याच्या न येण्याने बाकी तिघेही अत्यंत अस्वस्थ, बेचैन झाले. तिघांनाही त्याची काळजी वाटू लागली. तिघंही एकमेकात बोलू लागले, आज काय झाल बरं? आपला चित्रांग का आला नाही? सिंहासारख्या कुठल्या हिंस्र प्राण्यानी त्याची शिकार तर केली नसेल? किंवा कुठल्या शिकार्‍याने तर त्याला मारलं नसेल? जंगलात लागलेल्या वणव्यात तर तो अडकला नसेल? किंवा नवीन नवीन आलेलं ताजताजं लुसलुशीत गवत खाण्याच्या नादात तो एकाद्या खोल खड्ड्यात तर पडला नसेल? आगदी बरोबरच म्हटलं आहे की, प्रिय व्यक्तीवर असलेल्या अति मायेमुळे तो आपल्या परसबागेत जरी जास्तवेळ रमून गेला आणि त्याला घरात यायला उशीर झाला तरी काळजी वाटते; मग तो जर घनदाट, अनेक संकटांनी युक्त भीतीदायक जंगलात रहात असेल तर मग विचारायलाच नको. (अशुभाच्या आशंकेने मन व्याकूळ नाही झालं तरच नवल!) (176)

( वृत्त - आर्या)

स्वगृहोद्यानगतेऽपि हि, स्निग्धैः पापं विशङ्क्यते मोहात् ।

किमु दृष्टबह्वपायप्रतिभयकान्तारमध्यस्थे ।। 176

रमता परसबागेत, जरि प्रिय व्यक्ती, मनी चुकचुके पाल

मग घनदाट वनी तो, जाता मनी, उठे कल्लोळ

मन्थरक कासव कावळ्याला म्हणालं, ‘‘अरे लघुपतनका, मी आणि हिरण्यक उंदीर दोघंही फार वेगवान नाही. पण तुजं तसं नाही. (तू उडू शकतोस) तू जंगलात जाऊन आपला चित्रांग कुठे जिवंत आहे का ते पाहून ये.’’

ते ऐकून लघुपतनक चित्रांगाच्या शोधात निघाला. तो थोडसं अंतर गेला असेल नसेल आणि बघतो तर काय! एका छोट्याशा तलावाच्या काठी शिकार्‍याने धोक्याने लावलेल्या सापळ्यात तो अडकला होता. त्याला तसं पाहून दुःखाने अत्यंत व्याकुळ होऊन कावळा म्हणाला, ‘‘अरे मित्रा! हे रे काय?’’



चित्रांगाला ही आपला मित्र आलेला पाहून दुःखाचा कढ आवरता आला नाही. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि घळाघळा अश्रू गालावरून ओघळू लागले. मनात असलेल्या दुःखाचा आवेग कमी झाला असेल वा नष्टही झाला असेल--- पण!! आपल्या प्रिय व्यक्तीला वा जवळच्या नातलगांना पाहून परत ते दुःख उफाळून वर येतं.(177)

( वृत्त -अनुष्टुभ् )

अपि मन्दत्वमापन्नो नष्टो वाऽपीष्टदर्शनात् ।

प्रायेण प्राणिनां भूयो दुःखावेगोऽधिको भवेत् ।। 177

प्रयासे आवरीलेला । दुःखावेग शमे जरी

फुटे बांध परी त्याचा । भेटता आप्त त्या कुणी ।। 177

चित्रांगाचंही तसच झालं. काही वेळाने अश्रूंचा वेग कमी झाल्यावर चित्रांग लघुपतनकाला म्हणाला, ‘‘बरं झालं मित्रा, आपली भेट होऊन मला तुझं दर्शन तरी झालं. माझा काळ आता अगदी समीप येऊन ठाकला आहे. म्हणतात ना, प्राणांतकाळी मित्रांची होणारी भेट दोन्हीही प्रकारे सुखकारक असते. जर माणूस मेला तर  भेटणार्‍याच्या मनात (अरे आपण त्याला भेटलो नाही, किंवा मरणार्‍याला शेवटी का होईना मित्र भेटला असता तर सुखाने मरण आलं असतं अशी दोन्ही बाजूने) चुटपुट वा पश्चात्तापाची भावना रहात नाही. ---आणि जर तो वाचलाच तर दोघांनाही अत्यंत आनंद होतो. अंतकाळीची भेट अशी दोन्ही व्यक्तींना खूप समाधान, संतोष देणारी असते. (178 )

 प्राणात्यये समुत्पन्ने । यदि स्यान्मित्रदर्शनम् ।

द्वयोः सुखप्रदं तच्च जीवतोऽपि मृतस्य च।। 178

मृत्यूकाळी जरी होई । मित्राचे मुखदर्शन ।

सौख्यदायी असे मोठे । दोन्ही मित्रांस निश्चित ।। 1778.1 ।।

येवो मृत्यू न वा येवो । लाभो जीवन वा पुन्हा ।

सल ना राहते चित्ती । वाढे संतोष चित्तिचा ।। 178.2 ।।

चित्रांग अजून म्हणाला, ‘‘ मी आपल्या गप्पागोष्टींच्या वेळी मित्राच्या जवळकीने काही कमीजास्त बोललो असेन तर मला क्षमा कर. हिरण्यक आणि मन्थरकालाही माझा हा निरोप दे आणि मी जर काही अनुचित बोलून गेलो असेल तर त्यांना मला क्षमा करायला सांग.’’

 ‘‘अज्ञानामुळे मी जर काही मुद्दाम लागेल असं काही बोललो असेन, कोणाला दुखावेल असं अप्रिय काही माझ्या मुखातून गेलं असेल; त्या सर्व अनुचित बोलण्याला आपण माझ्यावरच्या प्रेमाखातर क्षमा कराल. (179)

अज्ञानाज्ज्ञानतो वाऽपि दुरुक्तं यदुदाहृतम् ।

तत्क्षन्तव्यं युवाभ्यां मे कृत्वा प्रीतिपरं मनः ।। 179 ।।

बोललो काहि बाही मी । जाणता वा अजाणता

करून मन मोठे हो । क्षमा दोघे मला करा ।। 179

ते ऐकून लघुपतनक म्हणाला, मित्रा! आम्ही सर्वजण असताना तू घाबरून जीवीताचीच आशा का सोडतोस? मी ताबडतोब हिरण्यकाला घेऊन येतो. दुसरं म्हणजे उच्चकोटीची कणखर माणसं कितीही मोठं संकट आलं तरी आपली जीवीताचीही आशा सोडून हवालदील होत नाहीत. म्हटलच आहे, ज्या माणसांना ऐश्वर्यच ऐश्वर्य लाभल्यावर हर्षवायू होत नाही वा मोठ्या संकट काळी भयाने ज्यांचे हातपाय गळून जात नाहीत, वा युद्धकाळी रणांगणावर जे भीतीने लटपटत नाहीत; अशा मुलाला फार क्वचितच एखादी आई जन्माला घालते.  (असे धीरवीर श्रेष्ठ पुरुष फार क्वचितच जन्म घेतात.) (180)

( वृत्त – आर्या )

सम्पदि यस्य न हर्षो विपदि विषादो रणे च भीरुत्वम् ।

तं भुवनत्रयतिलकं जनयति जननी सुतं विरलं ।। 180 ।।

ऐश्वर्यात न मानी, सुख अत्यंतिक, वा संकटी दु;ख

रणी भ्याड ना ऐसा, त्रिभुवनभूषण, निपजे क्वचित ।। 180

अशा प्रकारे चित्रांगाला धीर देऊन, आश्वासन देऊन लघुपतनक जिथे मन्थरक आणि हिरण्यक होते तेथे पोचला. तेथे त्याने चित्रांग कसा पाशात अडकला आहे ह्याची इत्थंभूत हकिकत त्यांना सांगितली.  हिरण्यकही चित्रांगाचा पाश सोडवायचाच ह्या निश्चयाने त्वरेने पुन्हा हिरण्यकाच्या पाठीवर जाऊन बसला. आणि तात्काळ ते चित्रांगापाशी जाऊन पोचले.

चित्रांगाने हिरण्यक उंदराला पाहिल्यावर त्याच्या जीवात जीव आला. आपण जिवंत राहण्याची शक्यता त्याच्या मनात निर्माण होऊन तो प्रसन्नपणे म्हणाला, ‘‘शहाण्या माणसाने संकटांचा समूळ नाश करण्यासाठी सत्शील, प्रामाणिक, पारदर्शक मनाचे मित्र जरूर बनवावेत. मित्रांच्या मदतीशिवाय कोणी एकटा जीवघेण्या संकटातून तरून जात नाही.’’ (181)

आपन्नाशाय विबुधैः कर्तव्याः सुहृदोऽमलाः ।

न तरत्यापदं कश्चिद्योऽत्र  मित्रविवर्जितः।। 181

उच्छेद संकटांचा जे । करण्या येति धावुनी

असे निर्मळ चित्ताचे । ठेवावे मित्र जोडुनी ।। 181.1 ।।

सहाय्यानेच मित्रांच्या । शक्य होते अशक्यही

 

सहाय्याविण मित्रांच्या । संकटी न तरे कुणी ।।181.2 ।।

हिरण्यक म्हणाला, ‘‘मित्रा! तू कायम इतका सावध असतोस, नीतीशास्त्रातही तज्ज्ञ आहेस मग तरीही ह्या धोकादायक पाशात कसा काय अडकलास?’’

तो म्हणाला, ‘‘अरे बाबा ही काही (प्रश्नोत्तरांचा तास) वा गप्पागोष्टींची वेळ नाही. जोवर तो दुष्ट शिकारी येत नाही तोवर लवकरात लवकर माझे हे पाश कुरतडून टाक.’’

ते ऐकून जरासं हसून हिरण्यक म्हणाला, ‘‘ काय मी आल्यावर सुद्धा तुला शिकार्‍याची इतकी भीती वाटते? (अरे बाबा! घाबरू नकोस. मी आहे नं! परंतु माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तर दे.) तुझ्या सारख्या नीतीशास्त्र-तज्ज्ञ्यांची ही अशी दुरावस्था पाहून माझा तर शास्त्रांवरचा विश्वास उडून गेला आहे. म्हणून मी तुला हे विचारत आहे.’’

तो म्हणाला, ‘‘भल्या मित्रा! दुर्भाग्य विवेकाचा नाश करते.’’ म्हटलच आहे, की, यमराज ज्याच्या गळ्याभोवती आपले यमपाश आवळतो. त्याचं मनसुद्धा दुर्दैवाची शिकार होतं. तो किती का महान असो पण त्याची बुद्धी सरळ न चालता काहीतरी वाकडाच विचार करायला लागते.( कुब्जगामिनी) (182)

कृतान्तपाशबद्धानां दैवोपहतचेतसाम् ।

बुद्धयः कुब्जगामिन्यो भवन्ति महतामपि ।।182

कंठी पाश कृतांताने । आवळीला जयाचिया

तर्कशक्तीवरी त्यांच्या । प्रहार होतसे महा ।। 182.1 ।।

वाकडी चालते बुद्धी । विवेक पथ सोडुनी

दुर्भाग्य सोडते ना त्या । महान दिग्गजांसही ।। 182.2 ।। 

‘‘बाबा रे !  विधात्याने आपल्या कपाळावर लिहीलेल्या नशिबाच्या अक्षरओळी एकसे एक कितीही विद्वान व्यक्ती असो पण तो आपल्या बुद्धीप्रभावाने पुसू शकत नाही.’’(183)

विधात्रा रचिता या सा ललाटेऽक्षरमालिका ।

न तां मार्जयितुं शक्ताः । स्वबुद्ध्याऽप्यतिपण्डिताः ।। 183

ललाटी ब्रह्मदेवाने । लिहीला लेख तो कुणी ।

मिटवील स्वप्रज्ञेने । ऐसा विद्वान ना जगी ।। 183

असे ते बोलत असतानाच आपल्या मित्रावर गुदरलेल्या संकटाने अत्यंत व्यथित झालेला मंथरक(कासव) हळु हळु त्या ठिकाणी येऊन पोचला. त्याला पाहून लघुपतनक हिरण्यकाला म्हणाला, ‘‘ अरेरे! हे काही योग्य झालं नाही.’’ हिरण्यक म्हणाला, ‘‘काय? तुला शिकारी येताना दिसला का?’’

लघुपतनक म्हणाला, ‘‘शिकार्‍याच्या येण्याचा विषय सोड! मन्थरक पण येथे येऊन पोचला आहे. ही ह्या मंथरकानी अत्यंत अयोग्य गोष्ट केली आहे. ह्याच्यामुळे आता आपण सर्वचजण मारले जाऊ. जर का मधेच हा दुष्ट शिकारी येथे पोचला तर मी आकाशात उडून जाईन. हिरण्यका तू बिळात घुसून स्वतःचं रक्षण करशील. चित्रांग वेगाने कुठल्याही दिशेला पळून जाईल पण हा पाण्यात राहणारा मन्थरक इथे जमिनीवर राहून स्वतःचा बचाव कसा काय करू शकेल?’’

तोपर्यंत मन्थरकही तिथे येऊन पोचला. त्याला पाहून हिरण्यक म्हणाला, ‘‘मित्रा, तू येथे येऊन बरोबर वागला नाहीस. जोपर्यंत शिकारी येत नाही  तोवर तू वेगाने इथून कुठेतरी निघून जा.’’

मन्थरक म्हणाला, ‘‘मित्रा मी काय करू? मित्रावर आलेल्या संकटरूपी अग्निज्वाळा  मला असह्य झाल्या आणि मला तेथे थांबणं अशक्य झालं. म्हणून मी येथे आलो.’’

योग्यच म्हटलं आहे, सज्जन मित्र दुःखावरील रामबाण औषधीप्रमाणे  असतात. असे मित्र असले तरच आपल्या प्रिय आप्तजनांच्या वियोगामुळे येणारं अपरिमित दुःख, नैराश्य वा धनसम्पत्तीच्या नाशामुळे येणारा विषाद, पीडा माणूस सहन करू शकतो. जर अशा सुजनांचा सहवास नसेल तर माणूस हे दुःख कसं पचनी पाडू शकेल? कसं सहन करू शकेल? (184)

( वृत्त – आर्या)

 दयितजनविप्रयोगा वित्तवियोगाश्च केन सह्याः स्युः ।

यदि सुमहौषधिकल्पो वयस्यजनसङ्गमो न स्यात् ।। 184

(दयितजनविप्रयोगा – प्रियजनवियोग)

वियोग प्रिय आप्तांचा । धनवैभव नाशची

सोसाया एकटा कोणी । ना समर्थची भूवरी ।। 184.1 ।।

उताराच तया साठी । असे सज्जन संगती

महौषधीच सन्मित्र । सुखलेप तयावरी ।।184.2 ।।

/

 रामबाण इलाजाच्या । सारखी मित्रसंगती

जरी ना लाभली कोणा । सोसणे शक्य का तयी ।।

वियोग प्रिय आप्तांचा । सम्पत्ति नाश दुर्गती

दुःखात धीर देण्यासी । मैत्री हीच महौषधी ।। 184

मंथरक पुन्हा म्हणाला, मित्रांनो! मला तर वाटतं, एकवेळ प्राण गेले तरी चालेल पण तुमच्यासारख्या सन्मित्राचा वियोग असह्य आहे. प्राण गेले तर परत दुसर्‍या जन्मात का होईना ते परत मिळतील पण तुमच्यासारखे सुहृद कसे परत मिळतील? (185)

वरं प्राणपरित्यागो न वियोगो भवादृशैः ।

प्राणा जन्मान्तरे भूयो भवन्ति न भवद्विधाः ।।185

नको वियोग मित्राचा । आपुल्या सारख्या भल्या ।

प्राणत्यागहि त्यापेक्षा । बरा वाटे मला कसा ।।

लाभती दुसर्‍या जन्मी । पंचप्राण पु्न्हा नरा ।

दोस्त ना मिळती श्रेष्ठ । आपल्यासारखे पुन्हा ।।185

अशाप्रकारे ते एकमेकांमधे बोलत असतानाच तिकडून शिकार करण्यासाठी सुसज्ज असलेला शिकारी हजर झाला. त्याने धनुष्याला बाण जोडून प्रत्यंचा कानापर्यंत ताणलेली होती. त्याला पाहून उंदराने तात्काळ चित्रांगाचा राहिलेला थोडासा पाश कुरतडून टाकला. मुक्त होताच मागे बघत चित्रांग वेगाने पळून गेला. लघुपतनक कावळा उडून झाडावर जाऊन बसला. हिरण्यक उंदीर जवळच्याच बिळात शिरून लपून बसला.



आपल्या जाळ्यात सापडलेलं हरीण अशाप्रकारे पळून गेलेलं पाहून आणि आपले सर्व श्रम फुकट गेलेले पाहून तो शिकारी अत्यंत निराश झाला. त्याचवेळेला जमिनीवरून हळु हळु चाललेलं कासव त्याने पाहिलं. त्याने मनात विचार केला, ‘‘जरी विधात्याने माझ्या हातचं हरीण काढून घेतलं असलं तरी ह्या कासवाला आजच्या भोजनासाठी पाठवून दिलं आहे. आज ह्या कासवाच्या मांसावर माझ्या सर्व परिवाराचं भोजन होईल.’’ मग त्याने मंथरक कासवाला गवताने बांधून आपल्या धनुष्याच्या टोकावर अडकवून ते खांद्यावर लटकवून तो आपल्या घराच्या दिशेने निघाला.

आपल्या मित्राला असं धनुष्याच्या टोकावर लटकवून शिकारी घेऊन जात आहे हे पाहून हिरण्यक उंदीर अत्यंत दुःखाने विलाप करू लागला. रडता रडता तो म्हणाला ‘‘अरेरे !! माझ्यावर केवढा हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे!

ह्या दुःखसागराच्या अजून एकाच किनार्‍याला  मी पोचतोय न पोचतोय तोवर हे दुसरच दुःख माझ्या समोर येऊन हजर झाल आहे. जे म्हणतात ते खरच आहे की जेव्हा केंव्हा माणसावर आपत्ति येते तेव्हा एका नंतर दुसरी, तिसरी अशी संकटांची मालिकाच सुरू होते. ( त्यांचा लगेचच अंत होत नाही.) एक छोटसं भोक मोठ्या मोठ्या उत्पातांना निमंत्रणच असतं.(आकाश फाटलं तर त्याला ठिगळं तरी कुठे आणि किती लावायची!) (186)

( वृत्त - इंद्रवज्रा )

एकस्य दुःखस्य न यावदन्तं

गच्छाम्यहं पारमिवाऽर्णवस्य ।

तावद्वितीयं समुपस्थितं मे,

छिद्रेष्वनर्था बहुली भवन्ति ।। 186 ।।

ना पार केलेचि मी एक विघ्न

तो कोसळे ते दुजे घोर दुःख

अथांग ह्या सागरा पार जावे

कैसेची सोसून विची-तडखे ।। 186.1 ।।

होता जरी एकची सूक्ष्म छिद्र

थैमान घालीति उत्पात सर्व ।। 186 ।।

( विची – लाटा )

माणूस जोवर खाली पडत नाही तोवर तो समतल भूमीवर असल्याप्रमाणे निःशंकपणे चालत राहतो. पण एकदा पडला तर परत परत पडत राहतो. समतल मार्गही त्याला अवघड दुर्गम होऊन जातो. पावला पावलाला तो ठेचकाळायला लागतो.(187)

यावदस्खलितं तावत्सुखं याति समे पथि ।

स्खलिते च समुत्पन्ने विषमं च पदे पदे ।। 187

जोवरी न पडे खाली । चाले निःशंक तोवरी

अनायास जसा चाले । सपाट पथि कोणिही ।। 187.1 ।।

एकवेळा परी तोची । पडला जर खालती

वारंवार पडे खाली । लागे ठोकर सारखी ।। 187.2 ।।

कितीही मोठं संकट आलं तरी चांगल्या प्रकारच्या बांबूचं बनलेलं अत्यंत लवचिक, दृढ प्रत्यंचा बांधलेलं, धरल्यावर हात घामेजणार नाही असं, आपत्तिकाळात वेळेवर धोका न देणारं धनुष्य दुर्मिळ असतं. त्याच प्रमाणे नम्र, सरळ, कुलीन, आपत्तीतही घाबरून जाऊन साथ न सोडणारी पत्नी आणि मित्रही दुर्लभ असतात.(188)

यन्नम्रं सगुणं चाऽपि यच्चापत्सु न सीदति ।

धनुर्मित्रं कलत्रं च दुर्लभं शुद्धवंशजम् ।। 188

लवचीक धनुष्या ज्या । दोरी सुधृढ बांधली

घामेजेना करी घेता । लढता समरांगणी ।।

सयोग्य वेळुपासूनी । केलेले धनु श्रेष्ठ ते

तैसचि मित्र पत्नीही । सद्गुणी, नम्र धीर ते ।।

संकटा पाहुनी ज्यांसी । भीतीने घाम ना फुटे

विरळेच जगी ऐसे । धनु, मित्र, कलत्र ते ।। 188

माणूस जेवढा प्रगाढ विश्वास कायम आपल्या अगदी जवळच्या सुहृदावर  ठेवतो; तेवढा गाढ विश्वास तो आपल्या आईवर, पत्नीवर, सख्ख्या भावावर वा सख्ख्या मुलावरही ठेवत नाही. (189)

न मातरि न दारेषु न सोदर्ये नचात्मजे ।

विश्रम्भस्तादृशः पुंसां यादृङ् मित्रे निरन्तरे ।। 189

ठेवे मित्रावरी जैसा । गाढ विश्वास तो भला ।

तैसा विश्वास ना ठेवी। माता पत्नीवरी भला ।। 189.1 ।।

विश्वास जितुका राहे । नितांत सुहृदावरी

सख्या भावावरीही ना । तितुका ना मुलावरी ।।189.2 ।।

विधात्याने तर माझी सर्व सम्पत्ती काढून घेतलीच होती मग, माझ्या सारख्या दुःखी कष्टी जीवाला मंथरकाच्या रूपात लाभलेला आनंदाचा, सुखाचा, एकमेव विसावाही माझ्याकडून का हिरावून घेतला? अन्य मित्र असतीलही पण मंथरकासारखा मित्र असणं असंभव आहे. म्हटलच आहे, माणूस 1निर्धन असताना, दारिद्र्य काळी अचानक मोठा खजिना प्राप्त व्हावा तसा मित्र सहाय्यभूत होतो. 2 बाकी कोणाला आपण सांगू शकणार नाही अशा आपल्या मनातील गुप्त गोष्टी तो ऐकून घेतो त्याच्यावर योग्य तो उपाय सांगतो. 3 मित्रावर संकट आलं असता तो त्याला सर्वतोपरी संकटातून सोडवतो. सन्मित्राची साथ मिळाली तर हया तीन फळांचा लाभ होतो. (190 )

असम्पतौ परो लाभो गुह्यस्य कथनं तथा ।

आपद्विमोक्षणं चैव मित्रस्यैतत्फलत्रयम् ।। 190 ।।

दारिद्र्यातचि लाभावा । विशाल खजिना जसा

आपत्तीत तसा देई । सुहृत् आधार तो महा ।। 190.1 ।।

ऐकूनी गुप्त गोष्टींसी । देई सल्ला सुयोग्य त्या

सोडवी संकटातूनी । समर्थ करुनी तया ।। 190.2 ।।

अशी तीन महा कार्ये । करे सुहृद चांगला

निभावे योग्य रीतीने । मैत्री मित्रासवे सदा।। 190.3 ।।

जो संकटकाळी मदतीसाठी धावून येईल असा मन्थरकाशिवाय दुसरा कोणी जिवलग मित्र मला मिळनार नाही. अरेरे! का हा विधाता माझ्यावर मर्मभेदी बाणासारख्या संकटांचा वर्षाव करत आहे; हे मला समजेनासं झालं आहे. सर्वप्रथम तर त्याने माझं सर्व धन हिरावून घेतलं. ते कमी की काय म्हणून माझ्या सर्व परिवाराचा विनाश केला. त्यानंतर मला माझं राहतं ठिकाण, माझा देश सोडावा लागला आणि आता त्यात मित्रवियोगाचीही भर घातली. मला वाटतं सर्व भूतमात्रांची हीच दशा होते. प्रत्येक जीव संकटांनी ग्रासलेलाच असतो. म्हटलच आहे की, प्रत्येक भूतमात्राचा देह नश्वर असतो. प्रत्येक देहधारी विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असतो. ऐश्वर्य क्षणभंगुर, तात्कालिक असतं. मिलन हे वियोगाने युक्तच असतं. सर्व प्राणीमात्रांची हीच दशा हीच गत असते! ।।191 ।।

कायः संनिहिताऽपायः सम्पदः क्षणभङ्गुराः ।

समागमाः साऽपगमाः सर्वेषामेव देहिनाम् ।। 191

देह आहे विनाशाच्या । उभा उंबरठ्यावरी

प्रत्येक देहधार्‍यासी । मृत्यू निश्चित ह्या जगी ।। 191.1 ।।

क्षणभंगुर सम्पत्ती । नष्ट हो निमिषातची

मिलनाच्या सवे राहे । वियोगचि सदा जगी ।। 191.2 ।।

आपत्तींची सदा चाले । मालिका ही सदा अशी

देहधारीच सारे हे । दशा ऐसीच भोगती ।। 191.3 ।।

अजून सांगायचे झालेच तर, एकदा झालेल्या जखमेवर परत परत लागून ती जखम आंधळी होते. जेव्हा  धनाचा अभाव असतो तेव्हाच पोटात भुकेचा आगडोंब उसळतो. आपत्ती आलेली असताना शत्रूंची संख्याही वाढीस लागते. माणूस संकटात सापडलेला असतानाच एकावर एक संकटमालिका अविरत चालू राहते.(192)

( वृत्त - उपजाति, इंद्रमाला )

क्षते प्रहारा निपतन्त्यभीक्ष्णं,

धनक्षये दीप्यति जाठराग्निः ।

आपत्सु वैराणि समुल्लसन्ति,

छिद्रेष्वनर्था बहुली भवन्ति ।।192

घावावरी लागुन काही बाही

पुन्हा पुन्हा खोल करे तयासी

दारिद्र्य येता उदरी उठे तो

महा भुकेचा नित आगडोंब ।। 192.1

येता महा संकट चालुनीया

उठाव शत्रू करिती समग्रा

होता जरी भोक लहानसे ते

आकाशही कोसळण्या पुरे ते ।। 192.2

अहो! कोणाचं तरी अत्यंत सुयोग्य असच हे वचन आहे की, शोक, शत्रू आणि भय ह्यापासून रक्षण करणारी, विश्वास आणि प्रेमाने संपृक्त असलेली मित्र ही दोन अक्षरं रूपी रत्नं कोणी बरं निर्माण केली असतील? (193)

 शोकारातिभयत्राणं प्रीतिविश्रम्भभाजनम् ।

केन रत्नमिदं सृष्टं मित्रमित्यक्षरद्वयम् ।।193

रक्षितो सर्व सामर्थ्ये शत्रू, शोक, भयातूनी

विश्वासानेच स्नेहाने सदा ओथंबला मनी ।। 193.1 ।।

योग्यता थोर रत्नांची लाभलेलीच अक्षरे

‘‘मित्र’’ ही दोन सांगावे कोणी निर्मियली बरे? ।। 193.2 ।।

तेवढ्यात चित्रांग हरीण आणि लघुपतनक कावळा रडत रडत तेथे आले. त्यांना पाहून हिरण्यक म्हणाला, ‘‘ दोस्तहो! अशा ह्या निरर्थक रडण्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. म्हणून हा शिकारी जोपर्यंत आपल्या मंथरकाला घेऊन दृष्टिआड होत नाही त्यापूर्वीच आपण त्याला सोडवायचा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे.  म्हटलच आहे, संकट आल्यावर जो व्यक्ती मोहामुळे फक्त दुःखाने रडत राहतो, तो योग्य वागत नाही. कारण रडून भेकून दुःख वाढत जातं पण त्या दुःखाचा अंत होत नाही.’’ (194)

व्यसनं प्र्याप्य यो मोहात्केवलं परिदेवयेत् ।

क्रन्दनं वर्धयत्येव तस्यान्तं नाऽधिगच्छति ।। 194

रडे आपत्ति येता जो । भयाने ग्रासला कुणी ।

बुडे शोकात तो खोल । आपत्ती हो भयंकरी ।। 194 ।।

नीतीविषारद सांगतात, संकटावर जालीम औषध एकच आहे ते म्हणजे तातडीने संकट दूर करण्याचा उपाय आरंभ करणे! आणि दुःख विसरून जाणे हेच होय! (195)

केवलं व्यसनस्योक्तं भेषजं नयपण्डितैः ।

तस्योच्छेदसमारम्भो विषादपरिवर्जनम् ।। 195

येता चालून आपत्ती । उपाय शोक हा नसे

धैर्याने पाय रोवूनी । खंबीर राहणे उभे ।। 195.1 ।।

मूळापासून आपत्ती । उखडायास दुष्कर ।

प्रारंभ करणे हेची । एकमेवचि औषध ।। 195.2 ।।

त्यजावा दुःख आवेग । त्यजावा शोक संताप।

असे हे नीतितज्ज्ञांचे । निःसंदिग्ध खरे मत ।। 195.3 ।।

अजूनही सांगायचं झालच तर, आपण पूर्वी कमावलेल्याचे रक्षण, भविष्यात लाभ आणि आत्ता संकटातून वाचण्यााठी ज्या उपायाचा विचार केला जातो, ज्याची मंत्रणा केली  जाते, वास्तविक तोच खरा योग्य परामर्श/सल्ला असतो. (196)

( वृत्त- इंद्रमाला / उपजाति )

अतीतलाभस्य सुरक्षणार्थं,

भविष्यलाभस्य च सङ्गमार्थम् ।

आपत्प्रपन्नस्य च मोक्षणार्थं,

यन्मन्त्र्यतेऽसौ परमो हि मन्त्रः ।। 196 ।।

कमावलेल्या धन रक्षणासी

पुढे धनाची करण्यास प्राप्ती ।

आपत्तितूनी धन रक्षिण्यासी

करे विचारादि विमर्ष काही ।। 196.1 ।।

उपाय शोधून तयानुसारी

असे सदा सज्जचि जो कुणीही

तोची असे वास्तव योग्य मार्गी

सनम्त्र हा तो धन रक्षिण्यासी ।। 196.2 ।।

ते ऐकून कावळा म्हणाला, जर असं असेल तर आपण सर्वजण मी सांगतो तसं करावं. चित्रांग शिकार्‍याच्या मार्गात असलेल्या एका छोट्याशा तलावाकाठी मेल्याचे सोंग घेऊन पडून रहावं. मी त्याच्या डोक्यावर बसून हळुहळु  त्याला चोच मारून मांस उकरत राहिल्याप्रमाणे करत राहीन. त्यामुळे तो दुष्ट शिकारी चित्रांगाला मेलेला समजेल. मी चोच मारत मांस उकरत बसलेला पाहून तो तर पूर्णच विश्वस्त होऊन मंथरकाला जमिनीवर ठेऊन हरीण मिळण्याच्या लोभाने तिकडे धावेल. त्या मधल्या वेळात हिरण्यका, तू मंथरकाला बांधलेल्या गवताच्या दोराचे पाश कुरतडून टाक. त्यामुळे मंथरक तात्काळ तलावाच्या पाण्यात निघून जाईल.’’

चित्रांग म्हणाला, ‘‘मित्रा! तुला सुचलेला हा उपाय फारच नामी आहे ! ह्या उपायाने आपला मन्थरक मुक्त झालाच म्हणून समजलं पाहिजे. म्हटलच आहे की, कुठल्याही कार्याचा आरंभ करण्यापूर्वी माणसाच्या हृदयातून उसळणारा उत्साह पाहिल्यावरच एखादं कार्य तडीस जाणार का नाही  हे लक्षात येतं. पण हृदयाची ती तरल बोली तज्ज्ञांनाच कळते. सामान्य जनांना कळत नाही. (197)

सिद्धिं वा यदि वाऽसिद्धिं । चित्तोत्साहो निवेदयत् ।

प्रथमं सर्वजन्तूनां । तत्प्राज्ञो वेत्ति नेतरः ।। 197

अंकुरे हृदयातूनी । उत्साहाचाच अकुंर

पाहुनी जोम त्याचाची । कार्यारंभी निरंतर ।।

साफल्य वा असाफल्य । कार्याचे काय प्राक्तन

येई कळून प्राज्ञासी । जाणी ना इतरेजन ।। 197

तरी आपण सर्वांनी तू सांगितलेल्या उपायाची ताबडतोब अम्मलबजावणी केली पाहिजे. सागितलेल्या उपायाप्रमाणे सर्वांनी आपापली भूमिका योग्य रीतीने वटवली. व्याधाने तलावाजवळ मरून पडलेलं हरीण पाहिलं. कावळा त्याच्या डोक्यावर बसून त्याला चोच मारत होता.

ते पाहून अत्यंत आनंदित झालेला तो शिकारी विचार करू लागला, ‘पाशात अडकल्याच्या वेदनेने हा आगतिक झालेला मृग त्याच्या आयुष्याचे काही क्षण शिल्लक असल्याने पाश तोडून इथपर्यंत पळून येण्यात जरूर यशस्वी झाला पण जास्तच जखमी असल्याने इथवर पोचेते मरण पावला असावा. हे कासव तर मी चांगलं पक्क बाधून ठेवलं आहे. हे कुठे जाऊ शकणार नाही. त्यामुळे ते हरीण मी घेऊन येतो. असा विचार करून कासवाला जमिनीवर ठेऊन तो हरिण आणण्यासाठी पळत गेल्यावर त्या थोड्याशाच मधल्या वेळात आपल्या वज्रासारख्या कणखर दातांनी हिरण्यकानी ती गवताची दोरी कुरतडून टाकली. मंथरक गवताच्या आवरणातून बाहेर पडून जवळच असलेल्या तलावात शिरला. इकडे चित्रांगही व्याध येण्यापूर्वीच उठून कावळ्यासोबत पळून गेला.

हे सगळं असं घडलेलं पाहून चकित झालेला, अत्यंत दुःखी झालेला शिकारी परत फिरला तर कासवही पाण्यात निघून गेलं होतं. त्यामुळे हताश, दुःखी झालेला शिकारी डोक्याला हात लावून बसला आणि त्याच्या मुखातून खालील श्लोक बाहेर पडला, माझ्या जाळ्यात अडकलेल्या धष्टपुष्ट सांबराला  तू पहिल्यांदा माझ्याकडून हिरावून घेतलस, ह्यावेळी मला एक कासव हाती लागलं तेही तुझ्या आदेशानुसार पळून गेलं. बायकामुलांपासून दूर मी इथे तहानेने, भुकेने व्याकूळ होऊन इकडे तिकडे भटकत आहे. हे कृतांता ही सगळी तुझीच करणी आहे. आता आत्तापर्यंत जे करायचं राहिलं होतं तेही करून घे. तू जे जे करशील ते ते मला भोगावच लागेल. (198)

( वृत्त – शार्दूलविक्रीडित )

प्राप्तो बन्धनमप्ययं गुरुमृगस्तावत्त्वया मे हृतः,

सम्प्राप्तः कमठः सचाऽपि नियतं नष्टं तवादेशतः ।

क्षुत्क्षामोऽत्र वने भ्रमामि शिशुकैस्त्यक्तः समं भार्यया,

यच्चान्यन्न कृतं कृताान्त! कुरु ते तच्चाऽपि सह्यं मया ।। 198 ।।

होते पुष्ट हरीण जे अडकले पाशात माझ्या भले

ते आधीच हिरावुनी सहज हे दैवा कसे घेतले

होते कासव जे मला गवसले तेही पळाले सुखे

रे आदेश तुझाचि पाळुन करी देई तुरी सत्वरे ।। 198.1 ।।

ताटातूटचि होउनी मम अशी पत्नीमुलांपासुनी

झाला व्याकुळ जीव हा कळवळे भूके-तहानेमुळे

मृत्यो ! दाट वनात मी भटकतो जैसे तुवा वांछिले

केले ना अजुनीच ते करि यमा!, सोसीन तेही भले ।। 198.2 ।।

असा अनेक प्रकारे आपल्या नशिबाला दोष देत शेवटी तो शिकारी आपल्या घरी निघून गेला.

तो शिकारी बराच दूर निघून गेल्यावर ते सगळे कावळा कासव, सांबर आणि उंदीर आनंदने एकमेकांना मिठी मारू लागले. सगळेजण वर सांगितलेल्या संकटातून वाचल्यामुळे जणु काही पुनर्जन्म झाल्यासारखे आपल्याला मिळालेले हे  दुसरे जीवन स्वीकार करून पुन्हा ते त्या पहिल्या तलावाच्या काठी आले जिथे ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. तलावाच्या काठावर पूर्वीप्रमाणे एकत्र येऊन ते विविध कथा सांगत, गप्पागोष्टी करत, मनोविनोद करत सुखाने काळ घावू लागले.

हे लक्षात घेऊन विवेकी माणसाने मित्रांचा संग्रह करावा. यांच्यासोबत मनात कपट बाळगू नये. म्हटलच आहे, जो अनेकांसवे मैत्री करत जातो. त्यांच्याशी अत्यंत विश्वासूपणे वागतो, त्यांच्याशी कधी फसवाफसवी करत नाही तो संकटात अडकला असता मित्र त्याच्या मदतीला धावून येतात. त्यामुळे तो कधी पराभूत होत नाही.(199)

यो मित्राणि करोत्यत्र । न कौटिल्येन वर्तते ।

तैः समं न पराभूतिं सम्प्राप्नोति कथञ्चन ।। 199

जाय जोडीत मित्रांसी । तोडी विश्वास ना कधी

पराभूत न होई तो । शत्रूच्याकडुनी कधी ।। 199

असे महामहोपाध्याय विष्णुशर्मा ह्यांनी रचलेले पंचतंत्रातील मित्रसंप्राप्ती नावाचे दुसरे तंत्र समाप्त झाले.

----------------------------------------------

 ज्येष्ठ शु. सप्तमी / 2 जून 2025






खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा -


 मित्रसम्प्राप्तिः कथामुख

 हिरण्यक-ताम्रचूड कथा

 तिलचूण-विक्रय कथा

 शबर-शूकर कथा

 वणिक्पुत्र कथा

 मन्दभाग्य सोमिलक कथा

 वृषभानुगशृगाल कथा

 मित्रसम्प्राप्ती तंत्राची समाप्ती

 

Comments

Popular posts from this blog

तंत्र 2 मित्रसम्प्राप्तिः (अनुक्रमणिका)

॥ मित्रसम्प्राप्तिः ॥ (कथामुख)

3 शबर-शूकर कथा