2 तिलचूणविक्रयकथा


2 तिलचूण  विक्रय कथा

( शंकराच्या मठरूपी मंदिरात राहणार्‍या ताम्रचूड नावाच्या सन्याशाकडे अतिथी म्हणून आलेला त्याचा मित्र बृहत्स्फिक् सन्यासी ताम्रचूडाला सांगू लागला-----)

एकदा कधीतरी पावसाळा असताना, माझं चातुर्मासाचं व्रत असल्याने मी एका ब्राह्मणाला त्याच्या घरी माझी रहायची व्यवस्था व्हावी अशी विनंती केली होती. त्या ब्राह्मणाने माझी विनंती मान्य करुन त्याच्या घरी माझी रहायची व्यवस्था केली.  त्याच्या निस्वार्थ आदरातिथ्याने सन्तुष्ट होऊन मी आनंदानी त्याच्या घरी राहून माझ्या व्रतनियमांचं पालन आणि देवाची पूजा करत असे. एक दिवस मी पहाटेच उठत असताना त्या ब्राह्मण आणि ब्राह्मण पत्नीचा संवाद माझ्या कानावर पडला तो मी लक्ष देऊन ऐकू लागलो. तो ब्राह्मण आपल्या पत्नीला सांगत होता, ‘‘ ब्राह्मणी, दक्षिणायनात सूर्योदयाच्या  वेळी होणारी कर्क संक्रांत अत्यंत पुण्यदायी आणि इच्छिलेले फळ देणारी असते. आज मला दान घेण्यासाठी यजमानाकडे दुसर्‍या गावाला जावं लागेल. मी गेलो तरी तू भगवान सूर्याला दान देण्याच्या उद्देश्याने एखाद्या ब्राह्मणाला बोलावून त्याला भोजन दे.’’

ते ऐकून अत्यंत उपरोधिकपणे, मनाला झोंबेल अशा कठोर शब्दात ती आपल्या पतीला म्हणाली, ‘‘येथे तुमच्यासारख्या दरिद्री माणसाकडे भोजन कुठून मिळणार? तुम्हाला अशा प्रकारचे आदेश मला देताना काही लाजलज्जा वाटत नाही का हो? तुमची पत्नी म्हणून ह्या घरात आल्यापासून आज तगायत मला कणभर सुख मिळालं असेल तर शपथ! तुमच्या घरात रहायला आल्यापासून ना मला घासभर गोडधोड मिळालं ना माझ्या अंगावर गुंजभर सोनं पडलं.’’

ब्राह्मणीचे ते तापलेल्या शिशासारखे शब्द कानावर पडताच थोडसं घाबरत, शांतपणे ब्राह्मण म्हणाला, ‘‘अगं ब्राहमणी!  अशा प्रकारे बोलणं तुला शोभा देत नाही. असं सांगतातही की, तुमच्या घासातला अर्धा घास तर अर्धा घास! पण तो याचकाला का देऊ नये? आपल्या मनाप्रमाणे ऐश्वर्य, सुखसम्पत्ती कधी कोणाकडे असतं का? आपल्या मनोकामनेप्रमाणे हव ते ऐश्वर्य कोणाकडे नसतही आणि भविष्यकाळातही कोणाला मिळणार नाही. त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं दान एखाद्या गरजू याचकाला नेहमी देत रहावं. (73)

ग्रासादपि तदर्धं च कस्मान्नो दीयतेऽर्थिषु ।

इच्छानुरूपो विभवःकदा कस्य भविष्यति? ।। 73 ।।

कोणास प्राप्त होते का । ऐश्वर्य इच्छिले मनी ।

आजही ना उद्याही ना। वांछिले ते मिळे कधी ।। 73.1 ।।

म्हणून म्हणतो अर्धा । घास एकातला तरी ।

याचकासी न का द्यावा । आहे निकड ज्या खरी ।। 73.2 ।।

अगं बाई, आपल्या ऐपतीप्रमाणे जे दान शक्य आहे ते दान देत रहावे श्रुती शास्त्रानुसार असं ऐकिवात आहे की, कोट्यधीश लोक अपार दान देऊन जे फळ मिळवतात तेच फळ एखादा दरिद्री आपल्याकडची कौडी सुखाने दान देऊन मिळवतो. तुम्ही किती दिलत ह्या पेक्षा तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे, सामर्थ्याप्रमाणे दान दिले का नाही हे महत्त्वाचे आहे. (74)

ईश्वरा भूरि दानेन यल्लभन्ते फलं किल ।

दरिद्रस्तच्च काकिण्या प्राप्नुयादिति नः श्रुतम् ।। 74 ।।

धनिका फळ जे लाभे । देउनी खूप दान जे

फळ तेच मिळे रंका । देउनी कवडी सुखे ।। 74.1

ऐकिवात असे आम्हा । श्रुती शास्त्रातले असे

ऐपतीयोग्य दानाने । समान फळ लाभते ।। 74.2


दाता मोठा किंवा छोटा नसतो.  त्याची दान देण्याची इच्छा मोठी असते. एखादा धनवान कृपण असला तर लोक त्याच्याकडे जातही नाहीत. समुद्र अपार जलाने कायम उचंबळत असतो. पण तहानेने व्याकूळ झालेला माणूस एका छोट्याशा विहीरीचे पाणी पिऊनच सुखावतो. समुद्राचं नाही. म्हणून दात्याची प्रशंसा होते. लोक त्याचं काम निरपेक्ष बुद्धीने करतात, त्याची सेवा करतात. पण श्रीमंत कंजुस व्यक्तीची निंदाच करतात. (75)

दाता लघुरपि सेव्यो भवति न कृपणो महानपि समृद्धया ।

कूपोऽन्तःस्वादुजलः प्रीत्यै लोकस्य न समुद्रः ।। 75 ।।

दात्याची करिती सेवा । रंक सामान्य तो जरी

प्रशंसति तया जैसे । न तैसे कृपणा धनी

पाणी छोट्या विहीरीचे । तृषार्ता सुखवी अती

असीम सिंधुचे पाणी । परि ना चाखते कुणी

अगं, खजिन्यावर नेमलेल्या पहारकर्‍याला कोणी राजराज म्हणत नाहीत. (कुबेराला राजराज म्हणतात.) जो दान देतो त्याला सन्माननीय संबोधन वापरलं जातं. उगीच बाकीच्यांना सन्मानाने वागविले जात नाही.(76)

अकृतत्यागमहिम्ना मिथ्या किं राजराजशब्देन?

गोप्तारं न निधीनां कथयन्ति महेश्वरं विबुधाः ।। 76 ।।

जो पहारेकरी रक्षी । कोशागार निशीदिनी

राजराजचि त्या खोटे । संबोधे ना जसे कुणी ।। 76.1 ।।

तैसे न कृपणा देती । मान सन्मान तो जनी

असला जरि कोणीही । बहु श्रीमंत तो धनी ।। 76.2 ।।

एखादा ऐरावतासारखा हत्ती माजावर आल्यावर त्याच्या गंडस्थळातून सतत वाहणार्‍या दानाने (हत्तीच्या गंडस्थळातून वाहणार्‍या द्रवाला दान वा दानोदक वा मद म्हणतात.) दुर्बळ असमर्थ जरी वाटला तरी तो प्रशंसनीय असतो. पण दुसर्‍याला काहीही न देणार्‍या धष्टपुष्ट गाढवाची मात्र कोणीही प्रशंसा करत नाहीत. ( येथे दान शब्दावर श्लेष आहे. ह्या शब्दाचे दोन अर्थ होतात. दुसर्‍याला दिले जाते ते दान आणि हत्तीच्या गंडस्थळातून वाहणार्‍या स्त्रावाला दान, दानोदक किंवा मद म्हणतात.)----(77)

सदा दानपरिक्षीणः शस्त एव करीश्वरः ।

अदानः पीनगात्रोऽपि निन्द्य एव हि गर्दभः ।। 77 ।।

पाझरूनचि ‘दानाने’ । हत्ती दुर्बल हो जरी

गुणगानचि हो त्याचे । गर्धभाचे न पुष्ट ही।। 77 ।।

घट किती गोलाकार, डौलदार, शीतल वाटला तरी तो फक्त पाणी साठवतो. म्हणून त्याला खाली ठेवतात. पण अभिषेकासाठी वापरली जाणारी भोकवाल्या वाकड्या तिकड्या आकाराच्या कर्करीला (अभिषेकपात्राला) मात्र  उंचावर स्थान मिळते; ते केवळ दुसर्‍याला सतत देण्याच्या तिच्या वृत्तीमुळेच!(78)

सुशीतोऽपि सुवृत्तोऽपि यातयदानादधो घटः ।

पुनः कुब्जाऽपि काणाऽपि दानादुपरि कर्करी ।। 78 ।।

साठवे जल जो सारे । सुडौल घट तो जरी

शीतल जो स्वभावेची । ठेवती त्यास खालती ।। 78.1 ।।

वाकडी भोकवाली जी । करते अभिषेक जी

कर्करी ठेवती वरी । दानत पाहुनी तिची ।। 78.2 ।।

मेघ सर्वजण तृप्त होईतो निर्मळ गोड पणी देतो. त्यामुळे अशा मेघांकडे लोक अत्यंत स्निग्धतेने, प्रेमाने बघतात. आतुरतेने त्याची वाट बघतात. ह्या उलट सर्वांपुढे हात पसरल्याप्रमाणे कर/किरण पसरणार्‍या सूर्याला लोक पहायलाही तयार होत नाहीत,(सूर्याला पाहून त्याच्या तेजाने लोक डोळे मिटून घेतात.) (पाणी देणार्‍या एखाद्या क्षुल्लक नोकराचाही लोक मान ठेवतात पण आपल्याकडे पैसे मागणार्‍या मित्राला मात्र लोक टाळत राहतात. )(79)

यच्छञ्जलमपि जलदो वल्लभतामेति सकललोकस्य ।

नित्यं प्रसारितकरो मित्रोऽपि न वीक्षितुं शक्यः ।। 79 ।।

( वल्लभ- आवडता, प्रिय, कृपापात्र )

(आर्या – मात्रा - 12ः18 - 12ः15)

देई जल सर्वांना, तोचि जलधर आवडे सर्वांना

पसरे रवि-‘कर’ जोची, त्या पहाया कुणी धजेना ।। 79 ।।

इतकं सांगून ब्राह्मण ब्राह्मणीला म्हणाला, ‘‘हे जाणून तरी, गरीबी असली, फारसं धन नसलं तरी सुयोग्य सत्पात्र व्यक्ती पाहून वेळोवेळी यथाशक्ती दान आवश्य दिलं पाहिजे. कारण, देश, काळ, सुयोग्य सत्पात्र व्यक्ती पाहून विवेकी माणसाने श्रद्धेने दिलेल्या दानाचा चांगला परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो. ( जे दान ज्याला खरोखरच गरज आहे, जो मिळालेल्या दानाचा दुरुपयोग करणार नाही, योग्य कार्यासाठीच त्याचा वापर योग्यपणे करेल, अशा सुयोग्य याचकाला, योग्य स्थान/प्रदेश  पाहून योग्य ती काळवेळ पाहून श्रद्धेने, यथोचितपणे योग्य अयोग्याचा विचार करून दिले जाते; अशा दानाचा दीर्घकाळ चांगला परिणाम दसून येतो. (90) (भिकार्‍यांना दिलेले दान हे दान नव्हे तर पैशाचा अपव्यय आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. )

सत्पात्रे महती श्रद्धा देशे काले यथोचिते ।

यद्दीयते विवेकज्ञैस्तदानन्त्याय कल्पते ।। 80 ।।

देश, स्थानादि सर्वाचा । आढावा घेउनी मनी ।

विवेकानेच जाणोनी । काळवेळ परिस्थिती ।।

दिल्याने दान सत्पात्री । श्रद्धा ती ठेऊन मनी।

मिळतात फळे त्याची । दीर्घकाळच चांगली ।। 80 ।।

पराकोटीची धनलालसा बरी नाही. आणि अगदी मला काहीही नको असे विरागीपणही बरे नाही. कारण रोजची दिनचर्या चालण्यासाठी, काही प्राथमिक गरजा भागविण्यासाठी तरी काही गोष्टींची आवश्यकता असते. अति हावरेपणा मात्र काही भलतीच संकटं उत्पन्न करतो. असं म्हणतात, अति लोभी माणसाच्या डोक्यावर शेंडी उगवते. (81)

अतितृष्णा न कर्तव्या तृष्णां नैव परित्यजेत् ।

अतितृष्णाऽभिभूतस्य शिखा भवति मस्तके ’’ ।। 81 ।।

अति हाव बरी नाही । न व्हावे त्यक्तकामही ।

अति हाव जया चित्ती । फुटे शेंडी तया शिरी ।। 81 ।।

 ब्राह्मणीने विचारलं ती कशी काय?

ब्राह्मणाने उत्तरादाखल गोष्ट सांगण्यास सुरवात केली-------

--------------------------------

 


Comments

Popular posts from this blog

तंत्र 2 मित्रसम्प्राप्तिः (अनुक्रमणिका)

॥ मित्रसम्प्राप्तिः ॥ (कथामुख)

3 शबर-शूकर कथा