6 वृषभानुगश्रुगालकथा
6 वृषभानुगश्रुगालकथा
कुठल्याशा एका नगरामधे
तीक्ष्णविषाण नावाचा एक बैल रहात होता. माजावर आलेल्या
त्या बैलाने मोठ्या उन्मादामुळे त्याचा कळप सोडून दिला. कधी नदी किनार्याची जमिन आपल्या
शिंगांनी उकरत, तर कधी नदीच्या किनार्यावर उगवलेलं पाचूप्रमाणे दिसणारं हिरवगार, लुसलुशीत
ताजं ताजं गवत चरत चरत, तर कधी स्वच्छंदपणे नदीकिनारी असलेल्या वनात मनमुक्त एकटाच हिंडता हिंडता तो जंगली बैलच होऊन गेला होता. त्याच वनात
प्रलोभक नावाचा एक कोल्हा रहात असे. एक दिवस तो कोल्हा आपल्या पत्नीसह नदीच्या किनार्यावर
आरामात, आनंदात बसलेला असतानाच मधेच तो तीक्ष्णविषाण बैल पाण्यासाठी त्या नदीच्या काठावरील
पुळणीत येऊन हजर झाला. त्याच्या त्या लोंबणार्या बीजांडग्रंथी पाहून कोल्हीण कोल्ह्याला
म्हणाली, ‘‘बघा बघा ह्या बैलोबाला चिकटले हे मांसाचे तुकडे असे लोंबत आहेत की, तासाभरातच
ते नक्की गळून पडतील. आपण ह्या बैलाच्या मागावर राहिलं पाहिजे.’’
कोल्हा म्हणाला, ‘‘प्रिये! माहित नाही हे गळून पडतील का नाही. तू काही कारण नसताना मला का उगीचच कामाला लावून देत आहेस? मी येथे राहून येथे पाणी प्यायला येणार्या उंदरांना पकडून त्यांची शिकार करीन आणि खाईन. कारण उंदीर पाणी प्यायला येण्याचा हाच मार्ग आहे. आणि दुसरं असं की मी जर तुला सोडून त्या तीक्ष्णविषाणामागे फिरत बसलो तर दुसरा कुठला तरी प्राणी येथे येऊन ही जागा बळकावून बसेल. म्हणून माझ्या मते तरी त्या बैलोबाच्या पाठी पाठी फिरण्यात काही हशील नाही. जो माणूस खात्रीशीर प्राप्त झालेली गोष्ट सोडून एखाद्या शंकास्पद गोष्टीच्या मागे लागून ती प्राप्त होण्याचा अट्टाहास करतो, त्याचा भ्रमनिरास होऊन त्याला ती संशयास्पद गोष्ट तर मिळत नाहीच पण त्याच्या हातात असलेल्या खात्रीशीर गोष्टीकडे (दुर्लक्ष झाल्याने) ती गोष्टही हातून निसटून जाते. (144)
यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवाणि निषेवते
।
ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव
च ।। 144 ।।
हातात खात्रिने आहे । धावे ऐशास सोडुनी
अनिश्चिताचिया मागे । गमावे वस्तु दोन्हिही ।।
144 ।।
ते ऐकल्यावर रागावलेली कोल्हीण म्हणाली, अरे! तू तर नामर्द बुळा आहेस. जे काय थोडफार मिळेल त्यातच तुला महा आनंद मिळतो. जे म्हणतात ते खरच आहे; थोडिशी एक पावसाची सर काय आली की, छोटीशी
नदी पुराने दुथडी भरू वाहू लागते. उंदराची ओंजळ छोट्याशा गोष्टीने भरून जाते. काहीही
उद्दिष्ट नसलेला ध्येयहीन माणूसही काहीतरी किडुकमिडुक मिळताच संतुष्ट होतो.(145)
सुपूरा स्यात्कुनदिका सुपूरो मूषिकाञ्जलिः
।
सुसन्तुष्टः कापुरुषः स्वल्पकेनाऽपि
तुष्यति ।। 145 ।।
छोट्या नदीस ये पूर । सर येता लहानशी
अल्प स्वल्पचि अन्नाने । भरे मूषक अंजुली
।। 145.1 ।।
ध्येय कर्तृत्व ना अंगी । ऐसा तो नरही
सुखी
संतुष्ट थोडक्याने हो । जिद्द ना त्याचिया
मनी ।। 145.2 ।।
म्हणून पुरूषाने कायम उत्साहाने सळसळत राहिलं पाहिजे. चटपटीत, उद्योगी असलं पाहिजे. जेथे आळस झटकून, मोठ्या उत्साहाने,
धाडस आणि योग्य निती नियमांची सांगड घालून न्यायाच्या आधारावर एखाद्या अभियानाची सुरवात
होते तेथे लक्ष्मी अत्यंत निश्चलपणे कायमची राहते हे सुनिश्चित आहे.(146)
यत्रोत्साहसमारम्भो यत्रालस्यविहीनता
।
नयविक्रमसंयोगस्तत्र श्रीरचला ध्रुवम्
।। 146 ।।
प्रारंभ होतसे कार्या । उत्साहानेच
वेगाने
न्याय धाडस दोघांची । योग्य सांगड ती
असे ।। 146.1 ।।
निष्क्रियताच सोडूनी । कर्त्याच्या
सर्व शक्तिने ।
लक्ष्मी राहतसे तेथे । अचला नित्य ती
तिथे ।। 146.2 ।।
कोल्हीण पुढे म्हणाली, नुसतं दैवाला दोष देत बसू नये. माझं नशीबच फुटकं म्हणून आपण
करत असलेलं काम तर कधीही अर्धवट सोडून देऊ नये. कष्ट हे करावेच लागतात. तीळांमधे प्रचूर मात्रेत तेल हे असतच
पण तेही मोठ्या खटपटीने काढावं लागतं. आयतं मिळत नाही. (147)
नदैवमिति सञ्चिन्त्य त्यजेदुद्योगमात्मनः ।
अनुयोगं विना तैलं तिलानां नोपजायते
।। 147 ।।
दैवाला दोष देऊनी । सोडावे कार्य ना
कधी
परिश्रमाविना कैसे । मिळे तेल तिळातुनी ।। 147 ।।
पण असं आहे ना! कोल्हीण पुढे
म्हणाली, ज्यांची आकलन शक्तीच कमी आहे (ते फार मोठी स्वप्न पाहू शकत नाहीत.) असे लोक थोडा जरी लाभ झाला तरी आनंदी होतात. संतुष्ट होतात. अशा दुर्भागी अल्पसंतुष्टांकडे लक्ष्मी आली तरी थांबत नाही. लगेचच निघुन जाते. (148)
यः स्तोकेनाऽपि सन्तोषं कुरुते मन्दधीर्जनः
।
तस्य भाग्य विहीनस्य दत्ता श्रीरपि
मार्ज्यते ।। 148 ।।
लाभ होताच थोडा जो । मूर्ख संतोषतो
मनी
अभाग्यासचि त्या लक्ष्मी । मिळूनी ना
उरे करी ।।148 ।।
कोल्हीण कोल्ह्याला डिवचत पुढे म्हणाली, तुम्ही किती धिप्पाड आहात, तगडे सशक्त आहात ह्यावर काही अवलंबून
नसतं. तुमच्या मतावर तुम्ही किती ठाम आहात, तुम्ही किती दृढनिश्चयी आहात ह्यालाच लोक
मानतात. अशांचच जगात कौतुक होतं. प्रशंसा होते. चातक हा केवढासा पक्षी पण ( मी ढगांमधून
बरसणारं पाणी पिईन, बाकी कुठलं नाही. ह्या ) त्याच्या निश्चयापुढे मान तुकवत इंद्रही
स्वतः त्याला पाणी पाजतो. (149)
कृतनिश्चयिनो वन्द्यास्तुङ्गिमा न प्रशस्यते
।
चातकः को वराकोऽयं यस्येन्द्रो वारिवाहकः
।। 149 ।।
प्रशंसनीय राहे तो । नर जो दृढनिश्चयी
धिप्पाड देह पाहूनी । ठरे ना वंद्य
तो कुणी ।। 149.1 ।।
दिसे दुर्बळ छोटासा । जरी चातक तो जगी
देई इंद्र स्वतः पाणी । त्याचा निश्चय
पाहुनी ।। 149.2 ।।
आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेच तेच उंदरांचं मांस खाऊन खाऊन
मला अगदी ते नकोसं झालं आहे. मांसाचे हे दोन तुकडे अगदी पडायला आले आहेत. म्हणून
म्हणते, तुम्ही माझं म्हणणं ऐका. टाळू नका.
शेवटी कोल्हाही स्त्रीहट्टापुढे नमला आणि उंदीर येण्याजाण्याचा मार्ग सोडून
पत्नीच्या सांगण्याप्रमाणे त्या बैलाच्या पाठीमागे पाठीमागे चालू लागला. अगदी
बरोबरच म्हटलं आहे की, माणूस आपल्या मर्जीचा राजा
असल्याप्रमाणे आपल्या इच्छेनुसार सर्व कामे तोवरच करू शकतो जोवर, स्त्रीच्या
अंकुशाप्रमाणे विद्ध करणार्या वाक्यांनी तो तिच्या नियंत्रणात जात नाही. तिच्या
आधीन होत नाही.(150)
तावत्स्यात्सर्वकृत्येषु पुरुषोऽत्र
स्वयं प्रभुः ।
स्त्रीवाक्याङ्कुशविक्षुण्णो यावन्नो
ह्रियते बलात् ।। 150 ।।
मर्जीचा आपुल्या राजा । राहे पुरूष
तोवरी
स्त्री-वाक्य-अंकुशाच्या तो । नाही आधीन जोवरी ।। 150 ।।
(एकदा
का पुरूष स्त्रीच्या हातचं बाहुलं बनला की त्याची सारासार विचारशक्ती नष्ट होते.) तिच्या आदेशाने प्रभवित होऊन तो जे अयोग्य काम आहे त्याला योग्य समजतो. जिथे जाऊ नये अशा ठिकाणांनाही जाण्यास सुयोग्य समजतो. जे खाऊ नये असे अभक्ष्यही रुचकर मानतो. (ती जशी नाचवेल तसा नाचत राहतो. ती निर्देश देईल तसा चालत राहतो)(151)
अकृत्यं मन्यते कृत्यं कृत्यमगम्यं
मन्यते सुगम् ।
अभक्ष्यं मन्यते भक्ष्यं स्त्रीवाक्यप्रेरितो
नरः ।। 151 ।।
त्याज्य कर्मा म्हणे योग्य । जाऊ नये
तिथे जाय ।
खाऊ नयेचि ते खाय । बाईल-बुद्धिचा नर
।। 151 ।।
अशा प्रकारे स्त्रीच्या (तालावर नाचत) आदेशानुसार तो कोल्हा
आपल्या पत्नीसह त्या बैलाच्या मागे मागे खूप दिवस फिरत राहिला. ...पण! ते अंडकोश
काही पडले नाहीत. पंधरा वर्ष ते पडतील ते पडतील अशी प्रतीक्षा करत शेवटी उद्विग्न
होऊन आणि सर्व आशा सुटून तो आपल्या पत्नीला म्हणाला, ‘‘ प्रिये हे लोंबणारे
मांसाचे तुकडे कधी अत्यंत शिथील पडल्याने खाली पडतील तर कधी अत्यंत तटतटून
फुगल्याने आता तरी गळून पडतील ह्या आशेने पंधरा वर्ष मी त्यांच्यावर लक्ष ठेऊन
आहे. आणि ह्या बैलोबाच्या मागे मागे फिरत आहे. न जाणो ते मांसखंड कधी पडणार आहेत
का नाहीत. (152)
शिथिलौ च सुवृद्धौ च । पततः पततो न
वा ।
निरीक्षितौ मया भद्रे । दशवर्षाणि पञ्च
च ।। 152
पडतीलचि खाली हे । दोन्हीही अंडकोश
रे
होता शिथिल अत्यंत । वा तट्ट वाढुनी
पुरे ।।
आशा ठेउन ऐसी मी । आहे फिरत मागुती
पंध्रा वर्षे तया झाली । खाली ना पडती
परी ।। 152 ।।
मला तर वाटतय की हे नंतरही कधी गळून पडणार नाहीत. तू
ह्यांची आशा सोड. आपण परत आपल्या पूर्वीच्या जागी जाऊ या.
वरील कथा समाप्त करून सोमिलक त्या पुरुषाला म्हणाला, ‘‘म्हणून
मी म्हणतो की हे कितीही शिथील पडले वा तटतटून फुगले तरी कधीही गळून पडणार नाहीत.’’
परूष म्हणाला, ‘‘तुझी जर का अशीच इच्छा असेल तर तू वर्धमान
नगरीला परत जा. तिथे वाण्याची दोन मुले राहतात.
एकाचं नाव आहे गुप्तधन(धनाचा
संचय करणारा ) तर दुसर्याचं नाव आहे, उपभुक्तधन.(खर्च करणारा )(एक स्वभावाने अत्यंत कृपण आहे तर दुसरा
खाऊन, पिऊन मजेत असलेला) त्या दोघांचे स्वभाव तू समजून घे. आणि मग त्यांच्यातील
तुला कोण व्हायच आहे तो वर तू मला माग. जर का तुला भोगहीन धनाची इच्छा असेल तर मी
तुला गुप्तधनासारखे बनवीन. आणि तुला जर
उपयोगात येईल असं धन पाहिजे असेल तर मी तुला उपभुक्तधनासारखं बनवीन. इतक बोलून तो
पुरूष अदृश्य झाला. आश्चर्यचकित झालेला सोमिलक परत वर्धमानपुरीला आला. संध्याकाळ
झाली होती. तोही खूप दमला होता. गुप्तधनाच्या घराचा ठावठिकाणा विचारत कसाबसा अंधार
पडत असतानाच तो गुप्तधनाच्या घरात घुसला. त्याला पाहून आपल्या पत्नी आणि
मुलांबरोबर गुप्तधन त्यालाही फटकारून बोलू लागला.
पण होणार्या अपमानाची चिंता न करता बळजबरीने तो त्याच्या घरात ठाण मांडून बसून
राहिला. जेवायची वेळ झाल्यावर गुप्तधनाने आगत्य प्रेम न दाखवता अत्यंत तुटकपणे
वागून त्याला थोडसं काहीतरी खायला दिलं. ते खाऊन सोमिलक तिथेच झोपला असता रात्री
त्याला दोन पुरूष एकमेकात काही बोलताना दिसले. त्यापैकी एकाने दुसर्याला विचारलं,
‘‘ हे कर्त! तू ह्या गुप्तधनाच्या प्रारब्धात काही अजून
व्यय लिहीला होतास का? नाहीतर तो सोमिलकला जेवण कसं देईल? आणि तू जर असं केलं
असशील तर ते पूर्णपणे अनुचित/ चुकीचं आहे.’’
त्यावर तो म्हणाला, ‘‘हे कर्मन्! ह्यात माझा काही दोष नाही.
माणसाला त्याचा लाभ अथवा हानी प्रदान करणं हे माझं कर्तव्य आहे. मी दिलेल्या लाभ
अथवा हानीच्या परिणामस्वरूप फळ देणं हे आपल्या आधीन आहे.’’
सोमिलक झोप झाल्यावर जेव्हा उठला तर त्याने पाहिलं की गुप्तधन पोट बिघडल्याने त्रस्त होऊन
पडला होता. जुलाब झाल्याने त्याने दुसर्यादिवशी जेवण घेतलं नाही. ( त्यानी जे
आदल्या दिवशी सोमलिकाला देऊन व्यय झालेले होते ते जेवण अशाप्रकारे वाचले होते.)
सोमिलक दुसर्या दिवशी सकाळीच उठून उपभुक्तधनाच्या घरी गेला. उपभुक्तधनाने त्याचं भव्य स्वागत केलं. त्याला भोजन, वस्त्र देऊन त्याचा सन्मान केला. त्या सर्वांचा स्वीकार केल्यानंतर सोमिलक तेथील एका भव्य पलंगावर झोपी गेला. रात्रीच्या वेळी त्यानी पाहिलं तर परत ते दोन पुरूष एकमेकात बोलत होते. एकानी दुसर्याल विचारलं,‘‘
हे कर्त! ह्यानी तर सोमिलकच्या
आदरातिथ्यात खूप धन खर्च केलं आहे. आता
आपणच सांगा की हा त्याचं व्याज कसं फेडणार? ह्यानी तर हे सगळं धन महाग कर्ज देणार्या
सावकाराकडून उधारीवर घेतलं होतं.
दुसरा म्हणाला, ‘‘हे कर्मन्! जे मी केलं ते माझं कर्तव्यच
होतं. पण ह्या परिणामाच फळ आपल्या हातात आहे.
सकाळी सकाळीच
राजाचा एक सेवक राजकोशातील धन घेऊन आला आणि ते धन त्यानि उपभुक्तधनाच्या
हाती सोपवलं. ते पाहून सोमिलक आपल्या मनात विचार करू लागला की, संचयरहित असलेलं हे
उपभुक्तधनाचं धनच श्रेष्ठ आहे; कारण हा गुप्तधनाप्रमाणे कंजूस नाही. म्हटलच आहे
की, अग्निहोत्र, यज्ञ हे वेदाध्ययन करण्याचे
योग्य फळ आहे. वेदाध्ययनाची पूर्ण
सार्थकता त्यात आहे. शास्त्राध्ययन केल्याचे फळ म्हणजे माणूस सदाचारी होतो. चारित्र्यसम्पन्न शीलवान
होतो, त्यातच त्याची सार्थकता आहे. सदाचारी पती मिळून उत्तम संतान प्राप्त
होण्याने नारी जन्म सार्थकी लागतो. तेच स्त्री जन्माचे उत्तम फळ आहे. ( आजही विचार
केला तर कितीही कर्तृत्त्ववान स्त्रीचा पती आणि पुत्र जर वाईट मार्गाने जाणारे
असतील तर त्या स्त्रीला जन्मभराची ती शिक्षाच असते. ) आणि योग्य मार्गाने
कमावलेल्या धनाचा खरा सदुपयोग ते सत्पात्री दान देणं वा त्याचा उपभोग घेण हाच आहे.
ह्या दोन मार्गांनी धन खर्च झालं तरच त्या धनाचं सार्थक झालं असं म्हणता
येईल. (153)
अग्निहोत्रफला वेदाः शीलवृत्तफलं श्रुतम्
।
रतिपुत्रफला दारा दत्तभुक्तफलं धनम्
।। 153 ।।
वेदाध्यन केल्याचे । फळ ते अग्निहोत्र
हे
शास्त्रांच्या बहु अभ्यासे । चारित्र्य
संपदा मिळे
सुपुत्र सुरती ह्याने । स्त्रीजन्म
सुफला घडे
फळ धनार्जानाचे ते । दान वा उपभोग हे ।। 153 ।।
‘‘तरी हे विधाता! मला दत्तभुक्तधन (धन दान देणारा अथवा
उपभोग घेणारा) बनव. मला गुप्तधनाशी काहीही प्रयोजन नाही.’’ असं सोमिलक म्हणाला आणि
त्या दिवसापासून सोमिलक दत्तभुक्तधन झाला.
वरची ही कथा सांगून झाल्यावर मन्थरक नावाचं ते कासव आपल्या उंदीर मित्राला म्हणालं, मित्रा हिरण्यका, उपभोगालाच महत्त्व देऊन गेलेल्या धनाच्या बाबतीत तू इतकं दुःख करू नकोस. कधी कधी धन असूनही त्या धनाचा मनासारखा उपभोग घेण्यामधे अनेक अडथळे असू शकतात. आणि त्यामुळे असलेल्या धनाला ते नाही असच मानावं लागतं. म्हटलच आहे की, घरामधे पुरून ठेवलेल्या धनामुळे जर कोणी स्वतःला धनाढ्य समजत असेल तर त्याच पुरून ठेवलेल्या धनाच्या जोरावर आपणही आपल्याला धनवान समजायला काय हरकत आहे?
----------------------------
खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा.
Comments
Post a Comment